न्हावरे – रांजणगाव एमआयडीसीकडून सरदवाडीला पिण्यासाठी शुद्ध पाण्याचा करण्याचा सूचना औद्योगिक विभागाच्या अधिकाऱ्यांना राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी (बुधवार दि. 4) दिली आहे. या संदर्भात शिरूरचे आमदार अशोक पवार यांनी पाठपुरवठा केला होता. त्यामुळे सरदवाडी गावाला पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळणार असून ग्रामस्थांची अशुद्ध पाण्यापासून सुटका होणार आहे.
औद्योगिक वसाहतीतून प्रक्रिया केल्यानंतर बाहेर येणारे दूषित पाणी सरदवाडी परिसरातील ओढे-नाले यांमध्ये येत असल्याने परिसरातील विहिरी व कुपनलिका दूषित झाल्या होत्या. सरदवाडी गाव व परिसरात अनेक दिवसांपासून पिण्याचा पाण्याचा मोठा प्रश्न उपस्थित झाला होता. येथील ग्रामस्थ व पदाधिकारी यांनीही पिण्यासाठी शुद्ध पाण्याचा पुरवठा व्हावा, अशी मागणी आमदार पवार यांच्याकडे केली होती.
आमदार पवार यांनी तातडीने राज्यमंत्री अदिती तटकरे यांच्याकडे सरदवाडीच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवावा व रांजणगाव एमआयडीसीने सरदवाडी गावाला पिण्यासाठी शुद्ध पाणीपुरवठा करावा, अशी मागणी केली होती. त्यानुसार मंत्री अदिती तटकरे, आमदार पवार व औद्योगिक विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांच्यामध्ये बुधवारी (दि.04) मुंबई येथील मंत्रालयात बैठकीचे आयोजन ककरण्यात आले होते.
या बैठकीमध्ये मंत्री तटकरे यांनी औद्योगिक विभागाच्या अधिकाऱ्यांना सरदवाडी गावाला रांजणगाव एमआयडीसीने शुद्ध पाणीपुरवठा करावा, अशा सूचना दिल्या आहेत. यावेळी शिरूर तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष रवींद्र काळे उपस्थित होते.