पुणे – संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या पुण्यात सोमवारी रात्री उशिरा मुक्कामी पोहोचल्या. यामुळे “घ्या विठू नाम, हरपून देहभान…’, “तुजवीण ठाव न दिसे त्रिभुवनी…’ अशी काहीशी स्थिती पुणेकरांची झाली. आता दोन दिवस हा भक्तीचा सोहळा पुणेकरांना अनुभवता येणार आहे.
जगद्गुरू श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या अनुक्रमे रविवार आणि शनिवारी आषाढी एकादशीनिमित्त आळंदी आणि देहूहून निघाल्या. दोन्ही पालख्यांचा पहिला मुक्काम झाल्यानंतर त्या सोमवारी पुण्यात आल्या. दिंडेकरी, टाळकरी टाळ-मृदंगाचा नादघोष करत आणि जयघोष करत पालख्यांबरोबर शहरात प्रवेशले.
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे स्वागत कळस येथे दुपारी 12 वाजून 20 मिनिटांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी केले. तर जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे स्वागत दुपारी दीड वाजता बोपोडी येथे अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे आणि डॉ. कुणाल खेमनार यांनी केले. तत्पूर्वी पालखीच्या पुढे असलेल्या दिंडेकऱ्यांचा त्यांनी सन्मान केला.
वाकडेवाडी येथे नागरिकांतर्फे दोन्ही पालख्यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर संचेती चौकातून पालख्या फर्गसन कॉलेज रस्त्याला लागल्या. तेथे संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज पादुका चौकात आरती होऊन त्या पुढे मार्गस्थ झाल्या. खंडोजीबाबा चौकात आरती होऊन पालख्या लकडी पुलावरून लक्ष्मी रस्त्यावर आल्या. तेथून पुढे शेडगे महाराजांच्या समाधीजवळ आरती होऊन, पुढे श्रीमंत दगडूशेठ गणपती आणि पालखी विठोबा मंदिर या ठिकाणी आरती होऊन पालख्या मुक्कामाच्या दिशेने निघाल्या. या रस्त्यावर शहरातील हजारो भाविकांनी दर्शनासाठी दुतर्फा गर्दी केली होती. दिंडेकरी, वारकऱ्यांसाठी अनेक संस्था, संघटनांनी खानपानाची सोय केली. त्यानंतर दिंड्या इच्छितस्थळी मुक्कामासाठी गेल्या. तसेच भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची आणि नाना पेठेतील निवडुंग्या विठोबा मंदिरात जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी मुक्कामी पोहोचल्या.
यंदाही भेट नाहीच…
पाटील इस्टेट चौकात संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांची पालखी 12 वाजून 20 मिनिटांनी आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी त्यानंतर एक तासाने आल्याने दोन्ही पालख्यांची यंदाही भेट झालीच नाही. पाटील इस्टेट येथे संत तुकाराम महाराजांची पालखी सायंकाळी पाच वाजून 24 मिनिटांनी आली तर सहा वाजून 36 मिनिटांनी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे आगमन झाले. पुणेकर नागरिकांतर्फे स्वागत करण्यात आले.