स्टार प्रवाहवरील ‘फुलाला सुगंध मातीचा’ मालिकेत संक्रांतीचा सण साजरा होणार आहे. कीर्तीची पहिलीच संक्रांत असल्यामुळे काळी साडी, हलव्याचे दागिने अशी साग्रसंगीत तयारी करण्यात आली आहे. जीजी अक्कांनी कीर्तीला स्वत:ला सिद्ध करण्यासाठी १५ दिवसांची मुदत दिली आहे. या पंधरा दिवसांत जर कीर्ती स्वत:ला सिद्ध करु शकली नाही तर तिला घर सोडून जावं लागणार आहे. कीर्तीसाठी हे १५ दिवस निर्णायक असणार आहेत.
या पंधरा दिवसांचं काऊण्टडाऊन याआधीच सुरु झालं आहे. त्यामुळे कीर्तीकडे आपला खरेपणा सिद्ध करण्यासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. खर तर संक्रांतीचा सण म्हणजे आपापासातले हेवेदावे विसरायला लावणारा दिवस. तीळगुळाच्या गोडीप्रमाणेच नात्यातलाही गोडवा वाढवणाऱ्या या सणाचं विशेष महत्त्व आहे. संक्रांतीच्या मुहुर्तावर कीर्ती जीजी अक्कांचं मन जिंकू शकेल का हे पहाणं उत्सुकतेचं असणार आहे.