नवी दिल्ली : केंद्र सरकारने तातडीने संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. या अधिवेशनात नेमके कोणते मुद्दे मांडण्यात येणार आहेत हे अजून तरी कोणाला माहिती नाही. मात्र अधिवेशनात ‘इंडिया’ या नावावर शिक्कामोर्तब करण्यात येणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. त्यातच आता या अधिवेशनावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी खोचक टीका केली आहे. हे बारश्याचं की लग्नाचं निमंत्रण आहे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
संजय राऊत यांनी अधिवेशनावर बोलताना केंद्र सरकारवर टीका केली. याविषयी बोलताना, “सरकारनं अचानक विशेष अधिवेशन का बोलावलं आहे? फक्त अनन्यसाधारण परिस्थितीतच अधिवेशन बोलावलं जातं. हे निमंत्रण बारश्याचं आहे का? लग्नाचं आहे का? मोदींच्या वाढदिवस साजरा केला जातोय? की भाजपचा निरोप समारंभ आहे? या अधिवेशनाचा नक्की अजेंडा काय आहे. हे काय सुरू आहे देशात?” असा सवाल यावेळी त्यांनी उपस्थित केला.
तसेच त्यांनी देशातील परिस्थितीवर बोलताना,” देशात मणिपूरमध्ये हिंसाचार सुरू आहे, बेरोजगारी आहे, चीन देशात घुसलेला आहे, असे अनेक प्रश्न आहेत. सोनिया गांधी केंद्र सरकारला याबाबत पत्र लिहिणार आहेत. महाराष्ट्रात मराठा, धनगर आरक्षणाचा, दुष्काळाचा प्रश्न पेटलेला असून सरकार याकडे दुर्लक्ष करत असल्याचे म्हटले आहे.
दरम्यान, देशाचे ‘इंडिया’ नाव रद्द करण्यात येऊन केवळ ‘भारत’ हेच नाव ठेवण्याची चर्चा सुरु आहे. हा एक फ्रॉड आहे. आम्ही इंडिया आघाडी स्थापन केल्यापासून सरकारला भीती वाटत आहे, घटनेतील नावाबद्दल भीती वाटत आहे. हा कद्रुपणा आहे, अशा शब्दांत राऊत यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.