नवी दिल्ली : राष्ट्रपतींच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जी 20 परिषदेच्या रात्रीच्या मेजवानीच्या निमंत्रणात प्रेसिडेंट ऑफ इंडिया ऐवजी राष्ट्रपतींचा उल्लेख इंग्रजीत प्रेसिडेंट ऑफ भारत असा करण्यात आला आहे. त्यावरून सध्या वाद सुरू झाला आहे. विरोधकांकडून केंद्र सरकारवर टीका केली जात आहे. यातच आता आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. मोदी सरकार आता तिसरी नोटबंदी करेल, कारण आपल्या चलनी नोटा आहेत, त्यावर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया असं लिहिलेलं आहे, असे म्हणत त्यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे.
आप खासदार संजय सिंह म्हणाले की, “गेल्या अनेक दिवसांपासून एक वाद निर्माण केला जात आहे. भाजप आणि मोदी सरकारला राज्यघटनेतून ‘इंडिया’ हा शब्द काढून टाकायचा आहे, याची सुरुवात आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांनी केली होती. ‘इंडिया’ हा शब्द काढून टाकला पाहिजे, असं ते म्हणाले होते. त्यानंतर घटनेतूनच ‘इंडिया’ हा शब्द काढून टाकावा, अशा बातम्या मोदी सरकार प्रायोजित करत आहेत. मोदी सरकार आता तिसरी नोटबंदी करेल, कारण आपल्या चलनी नोटा आहेत, त्यावर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया असं लिहिलेलं आहे. त्यामुळे ते नोटांवरुनही इंडिया हटवतील आणि लोकांना पुन्हा नोटा बँकांमध्ये जमा करण्यास सांगितल.
बाबासाहेबांचा इतका तिरस्कार का?
आप खासदार संजय सिंह पुढे म्हणाले की, “मला त्यांना सांगायचं आहे की, ते बाबासाहेबांचा इतका तिरस्कार का करतात? आरएसएस आणि भाजपमध्ये अशी निराशा आहे की, त्यांच्याशी संबंधित कोणीही विचारवंत बनलं नाही. त्यांना काहीही लिहिता आलं नाही, त्यामुळेच बाबासाहेबांचं लिखाण कसं काढायचं असा विचार ते सातत्यानं करत असतात. राज्यघटनेच्या पहिल्या कलमात म्हटलं आहे की, ” India Did Is Bharat Will Be Union of States.”
पुढे ते म्हणाले, “आयआयएम, एम्स आणि इस्त्रो या सर्व संस्थांच्या नावांमध्येही इंडिया आहे. हा मोदी सरकारचा नापाक हेतू आहे. आम्ही याला विरोध करू आणि ज्यांची बाबासाहेबांवर श्रद्धा आहे ते हे नक्कीच खपवून घेणार नाहीत.” तर, दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आप नेते अरविंद केजरीवाल यांनाही केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. जर इंडिया आघाडीने आपलं नाव बदलून भारत केलं तर सरकार देशाचं नाव बदलून बीजेपी करणार काय, असा खोचक सवाल अरविंद केजरीवाल यांनी केला.