Sanjay Raut : ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं मुंबईतील निवासस्थान असलेल्या मातोश्रीबाहेर मोठा घातपाताचा प्रयत्न करणार असल्याचा फोन महाराष्ट्र नियंत्रण कक्षाला आल्याची माहिती मिळत आहे. धमकी देणारे 4 ते 5 जण उर्दूत बोलत होते, अशी माहिती कंट्रोल रुमला फोन करणाऱ्या व्यक्तीनं दिली आहे.
फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीनं दिलेल्या माहितीनुसार, मुंबईहून गुजरातला जाणाऱ्या ट्रेनमध्ये 4 ते 5 जण प्रवास करत असून ते मातोश्रीबाहेर घातपात घडवून आणण्याबाबत बोलत होते. त्यांचं संभाषण कानावर पडल्यानं त्या व्यक्तीनं ही संपूर्ण माहिती तात्काळ महाराष्ट्र नियंत्रण कक्षाला फोन करुन दिली.
मुंबहून गुजरातला जाणाऱ्या ट्रेनमधून प्रवास करणारे 4 ते 5 जण उर्दू भाषेत बोलत होते. तसेच, मुंबई भायखळ्यातील मोहम्मद अली रोडवर एक खोली भाड्यानं घेण्याबाबतही ते बोलत होते, असा दावाही फोन करणाऱ्या व्यक्तीनं केला आहे. या माहितीनंतर मुंबई पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
दरम्यान, या प्रकरणावर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठं विधान केलं आहे. मातोश्रीबाहेर मोठा कांड होण्याची शक्यता असा फोन आलेला त्याबद्दल संजय राऊत यांना प्रश्न विचारला. ते म्हणाले की, “हे जे कोणी तरुण आहेत, काय आहेत, ते आम्हाला माहिती आहे. राम मंदिर उडवून देण्याची धमकी देणारे विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते होते.
त्यांनी मुस्लिम नाव धारण केली होती. लोकसभा निवडणुकीआधी धार्मिक तेढ निर्माण करुन निवडणूक जिंकायची हे भाजपाच षडयंत्र आहे. ठाकरे कुटुंबाच्या सुरक्षेची जबाबदारी केंद्र सरकारची आहे. महाराष्ट्राच्या डाऊटफुल सरकारची नाही, ते सूडाने पेटलेले आहे’. असं संजय राऊत यावेळी म्हणाले.