कोल्हापूर – संजय राऊत हे उद्धव ठाकरेंचे कमी आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जास्त आहेत. राऊत हे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या “पे रोल’वर काम करत आहेत’, अशी जोरदार टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. मुंबई मेट्रो उद्घाटनाच्या कार्यक्रम पत्रिकेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे नाव देण्यात आलेले नाही. त्यामुळे भाजपने पोस्टरबाजी करत महाविकास आघाडीवर टीका केली आहे.
“पुणे मेट्रोच्या उदघाटनावेळी आम्ही असे केले का? या सरकारचे मन मोठे नाही. त्यांना केवळ मोदी नावाची ऍलर्जी आहे. फडणवीसांना कार्यक्रमाला बोलावले असते तर चालले असते,अशा शब्दामध्ये चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.
महाविकास आघाडीत सध्या गृहखात्यावरुन नाराजी असल्याचे बोलले जात आहे. शिवसेनेच्या नेत्यांकडून वळसे-पाटलांचे नाव न घेता टीका होते आहे. तसेच गृहखाते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वत:कडे घेण्याची मागणीही शिवसेना नेत्यांनी केली आहे. त्याबाबत विचारले असता, “गृहमंत्री म्हणून वळसे-पाटील लेचेपेचे आहेत. व्यक्ती म्हणून खूप चांगले आहेत. पवार कुटुंबातूनही वळसे-पाटलांचे नाव समोर आणले गेले आहे. उद्धव ठाकरे यांना सल्ला देण्याची वेळ निघून गेली आहे.
मी सांगितले होते की गृहमंत्रीपद तुम्ही राष्ट्रवादीकडे देऊ नका. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष मातोश्रीलाही कॅमेरे लावतील. पण त्यावेळी माझ्या बोलण्यावर हसले होते. असा टोलाही पाटील यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीला लगावला.
कोल्हापूर उत्तरमध्ये भाजप एक हाती बाजी मारेल, असा दावा पाटील यांनी केला. माझी एखादी क्लिप मोडून तोडून व्हायरल केली जाते आहे. धनंजय महाडिक यांनी महिलांचा अपमान केला असा व्हिडीओ व्हायरल केला जातो आहे. या सगळ्याबाबत आम्ही सायबर सेलकडे तक्रार करणार आहोत.
कोल्हापुरात विद्यार्थ्यांच्या माध्यमातून माहिती भरुन घेतली जाते आहे. ऍप वरुन पैसे पोहोचवण्याचा प्रयत्न कोल्हापुरातूनही सुरु केला आहे. भाजपने कधीही प्रचाराची पातळी सोडली नाही. जाणीव नसलेल्या नेत्यांची यादी मोठी आहे. त्यात सतेज पाटील टॉपला आहेत, असा टोलाही चंद्रकांतदादांनी लगावला.