मुंबई – चंद्रकांतदादा पहाटे पुन्हा भूकंप होणार असल्याचं म्हणाले. त्यांनी गजर लावला आहे का?, असे म्हणत शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली.
राज्यात सध्या मध्यावधी निवडणुका होणार नाहीत, असं चंद्रकांत पाटील म्हणाले होते. त्यावर बोलताना, चंद्रकांत पाटील यांच्या विधानाकडं मी सकारात्मक दृष्टीने पाहतो. राज्यात निवडणुका होणार, की नाही होणार? हे सांगण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची असते.
निवडणुका कधी होणार हे जर चंद्रकांत पाटील यांना माहित असेल आणि निवडणूक आयोगाची जबाबदारी चंद्रकांत पाटील यांच्याकडं आली असेल, तर त्याचं स्वागत केलं पाहीजे अशी खोचक टीप्पणीही त्यांनी केली.
संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर राज्यात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं होतं. या भेटीबाबत विचारले असता, त्यांना भेटलो तर एवढं वादळ निर्माण झालं. यापुढेही आम्ही अधूनमधून भेटत राहू.
आमच्या भेटीमुळे कुणी नाराज असेल असं मला वाटत नाही, असं ते म्हणाले. तसेच बाळासाहेबांच्या विरोधक आणि टीकाकारांशी सर्वाधिक संवाद असावा, या शिकवणीचा दाखला देत, राजकीय विचार सारखे नसतील तर त्यांना भेटू नये, असं संविधानात लिहलंय का?असा प्रतिप्रश्नही त्यांनी विचारला.
सुशांतसिंह प्रकरणावर दात उचकणाऱ्यांचे दात घशात जातील
सुशांतसिंह प्रकरणावर अनेकांनी महाराष्ट्र सरकार आणि मुंबई पोलिसांवर टीका केली होती. बिहारचे तत्कालीन पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनीही मुंबई पोलिसांनी बोटचेपी भूमिका घेतली, असा आरोप केला होता. त्याबाबत राऊत यांनी विचारले आसता, गुप्तेश्वर पांडेंसारखे अनेक अधिकारी राजीनामा देऊन निवडणूक लढवतात. त्यांनी कोणत्या पक्षात जावे?, निवडणूक लढवावी की नाही?, हा त्यांचा प्रश्न आहे. पण सुशांतसिंह प्रकरणात राज्य सरकारवर आणि आमच्या प्रमुख नेत्यांवर जी चिखलफेक झाली, ती चुकीची असल्याचं ते म्हणाले.
त्याचबरोबर महाराष्ट्र पोलिसांच्या बदनामीवर आक्षेप नोंदवत ज्यांनी या प्रकरणात दात उचकटले, त्यांचे दात घशात जातील असाही त्यांच्यावर पलटवार केला.