-अमित डोंगरे
कॅप्टन कुल अशी सार्थ ओळख असलेला भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आयपीएल स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यापासून चेन्नई सुपर किंग्ज संघाचा कर्णधार आहे. पदार्पणापासून त्याच्याकडे भावी कर्णधार म्हणूनच पाहिले जात होते. त्याने देखील भारतीय संघात पदार्पण केल्यापासून आपल्या क्रिकेटच्या ज्ञानाची वारंवार प्रचिती दिली.
त्याचवेळी आयपीएल स्पर्धेची घोषणा झाली. बीसीसीआयचे तत्कालीन अध्यक्ष एन. श्रीनीवासन यांनी चेन्नई सुपर किंग्ज संघाची मालकी असल्याने धोनीसाठी फिल्डिंग लावली व त्याला आपल्या संघात घेतले. तिथून धोनीचा महानतेकडे जाण्याचा प्रवास सुरू झाला. त्याने दरवर्षी वर्चस्व राखताना चेन्नईला तीनवेळा विजेतेपद मिळवून दिले. मात्र, गेल्या वर्षी इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यात तो धावबाद झाला व तिथेच भारताने विश्वकरंडक गमावला. त्याचवेळी त्याच्या निवृत्तीच्या चर्चांना उधाण आले. त्यानेही नवोदितांना संधी मिळावी यासाठी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून विश्रांती घेतली.
ऑस्ट्रेलियातील टी-20 विश्वकरंडक स्पर्धेद्वारे भारतीय संघात पदार्पण करण्याचे लक्ष्य त्याने ठेवले होते. मात्र, करोनाचा धोका सुरू झाला व स्पर्धांना ब्रेक लागला. त्याचवेळी निवड समितीने त्याला आयपीएल स्पर्धेत सरस कामगिरी केली तरच पुनरागमनाची संधी मिळू शकते, असे संकेत दिल्याने त्यानेही आयपीएलसाठी कंबर कसली होती, पण करोनामुळे ही स्पर्धाही धोक्यात आली. त्याचवेळी अमिराती सरकारने बीसीसीआयला प्रस्ताव दिला व अखेर आखातात ही स्पर्धा सुरू झाली.
या स्पर्धेत सरस कामगिरी करत पुनरागमन करेल अशी शक्यता व्यक्त होत होती. मात्र, त्याने प्रत्यक्ष
स्पर्धेपूर्वीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमघून निवृत्ती जाहीर करत चाहत्यांनाच नव्हे, तर अवघ्या जागतिक क्रिकेटला धक्का दिला. आयपीएल स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात त्याच्या नेतृत्वाखालील चेन्नई संघाने मुंबई इंडियन्सचा पराभव केला. मात्र, त्यानंतर राजस्थान, दिल्ली या संघाविरुद्ध पराभूत झाल्यावर धोनीच्या नेतृत्वावर तसेच संघाच्या कामगिरीवरही टीका सुरू झाली. त्यातच धोनीचा कॅप्टन कुल हा चेहराही गळून पडला. पंचांच्या निर्णयांवर भर मैदानावरच नाराजी व्यक्त करताना धोनी अवघ्या जगाने पाहिला. हे दृष्य खूपच दुर्मीळ आहे.
आजवरच्या कारकिर्दीत त्याने हा प्रकार कधीही केलेला नाही. मात्र, यंदाच्या स्पर्धेतील धोनी खूपच वेगळा भासत आहे. त्याची फलंदाजी काही फटक्यांवरून चाहत्यांना गतकाळात घेऊन जात आहे. मात्र, त्यात फिनिशर दिसत नाही. त्याची देहबोली देखील नकारात्मक वाटत आहे. दोन पराभवानंतरच त्याने आपल्या संघाने फलंदाजी व गोलंदाजी चांगली केली नाही अशी कबुली दिली. तसेच संघाला ड्वेन ब्राव्हो, अंबाती रायडू व सुरेश रैना यांची अनुपस्थिती जाणवली, असे मतही व्यक्त केले त्यावरून तो पूर्वीचा सिद्धहस्त धोनी कुठेतरी गायब झाला की काय, असा प्रश्नही पडत आहे. त्याचा तो मैदानातील वावर, त्याच्या गोलंदाजंना दिल्या जाणाऱ्या सूचना, त्याचे पंचांशी अत्यंत मार्दवतेचे वर्तन कुठेतरी हरवले असल्याचीही जाणीव होत आहे.
एकूणच हा पूर्वीचा धोनी नसून कारकीर्द संपल्याचे संकेत देणारा धोनी वाटू लागला आहे. आता त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याने तसेही त्याच्या समोर कोणतेच उद्दिष्ट नसल्याने यंदाच्या मोसमाबरोबरच कदाचित पुढील एखादा मोसम खेळून कोणत्या तरी संघाचे प्रशिक्षकपद हाती घ्यायचे असाच विचार त्याच्या देहबोलीतून जाणवत आहे. एखाद्या नवख्या खेळाडूप्रमाणे किंवा हताश व्यक्तीप्रमाणे त्याचा वावर दिसत आहे व हीच गोष्ट त्याच्या चाहत्यांना खटकत आहे. आता धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दिसणार नाही हे स्पष्ट झालेच आहे. मात्र, आता तो पुढील वर्षीच्या आयपीएलमध्ये तरी दिसेल का, अशी शंका त्याच्या नकारात्मक मानसिकतेतून जाणवत आहे.