वीसगाव खोरे – रायरेश्वराच्या पठारावरून दक्षिणेस सहज दृष्टिपथास येणारा, कणखर, खडी चढाई असणारा, शत्रूच्या मनात धडकी भरवणारा, शूरवीरांच्या पराक्रमांची साक्ष असणारा, कृष्णा आणि नीरा या दोन नद्यांच्या खोऱ्यातील महादेव डोंगररांगेवरील एका उत्तुंग नाकाडावर उभारलेला, एका भल्या मोठ्या पहाडाच्या डोक्यावर टोपीच्या आकाराचा, इतिहासाच्या पाऊलखुणांचा साक्षीदार, अभेद्य असा किल्ला केंजळगड पर्यटकांना भुरळ घालणारा आहे.
या किल्ल्याचे नाव शिवाजीमहाराजांनी मनमोहनगड असे ठेवले. पुणे ते भोर हे अंतर 51 कि. मी. आणि भोरहून कोर्ले अंतर 25 कि. मी आणि पुढे किल्ल्यापर्यंत 8 कि. मी.अंतर कापल्यावर या किल्ल्याच्या पायथ्याशी आपण पोहोचणतो. या पठारावर जाण्यासाठी असलेल्या गणेशदरा, गायदरा, कागदरा, लोहदरा, वाघदरा, सुणदरा अशा वाटा आहेत. सुमारे दोन तासांच्या चढाईनंतर केंजळगडावर आपण जाऊन पोहचतो. केंजळगडच्या भला मोठ्या काळ्या पहाडाच्या माथ्यावर मजबूत झाडी व गवताचे रान माजलेले दिसते.
चुन्याचा घाणा, दारू गोळ्याचे कोठार, थंड पाण्याचे तळे येथे आहे. डोंगर शिखरावरील कातळात पूर्ण लांबीच्या 55 पायऱ्या आहेत. केंजळगड समुद्रसपाटीपासून 4 हजार 269 फूट उंचीवर पठार आहे, त्या उंचीवरून कमळगड, कोल्हेश्वर, तोरणा, पाचगणी, पांडवगड, पुरंदर, महाबळेश्वर, राजगड, रोहिडा, लिंगाणा, वज्रगड, वैराटगड आदी दुर्ग दिसतात आणि याबरोबरच धोम धरणाचे विहंगम दृश्य पाहण्यास मिळते,
निसर्गाचे वरदान लाभलेले मात्र पुरातत्व विभागाकडून विकासकामांसाठी दुर्लक्षित असलेले असे हे पर्यटन क्षेत्र आहे. अजूनहू या किल्ल्याबाबत बऱ्याच जणांना माहिती नसल्यामुळे गिर्यारोहक प्रेमी व पर्यटक यांच्यापासून हा किल्ला दूरच आहे. अशा या पर्यटन क्षेत्रास सौंदर्यसंपन्न, वैभवशाली इतिहास, पराक्रमाची गाथा, समृद्ध वन्य जीव, पशुपक्ष्यांचा किलबिलाट अनुभवण्यासाठी करोना संकट थांबल्यावर एकदा तरी भेट देण्यास हरकत नाही