मुंबई – अंमलबजावणी संचालनालयाने (ED) संजय राऊतांशी संबंधित अलिबागमधील 8 जमिनीचे प्लॉट आणि मुंबईतील फ्लॅट जप्त केला आहे. पत्राचाळ घोटाळा प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई संजय राऊतांसाठी मोठा धक्का मानला जात आहे. या प्रकरणी संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“अशा कारवायांनी संजय राऊत किंवा शिवसेना झुकणार नाही, वाकणार नाही. याच घरात येऊन काही महिन्यांपूर्वी भाजपाच्या लोकांनी महाराष्ट्रातलं सरकार पाडण्यासाठी मदत करा, अशा धमक्या दिल्या होत्या. नाहीतर तुम्हाला खूप संकटांना सामोरं जावं लागेल, असं म्हटलं होतं”, असं राऊत यांनी म्हंटले आहे.
राऊत म्हणाले, 2009 साली हा व्यवहार झाल्यानंतर त्याविषयी कुणी काही विचारणा केली नाही. “कुठली मालमत्ता? आम्ही काय मालमत्तावाले लोक आहोत का? आमच्या कष्टाच्या पैशातून घेतलेली ही जागा आणि घर आहे त्याची आमच्याकडे साधी चौकशी कुणी केली नाही. विचारणा केली नाही. आता मी टीव्हीवर पाहिलं की मालमत्ता जप्त केली”, असे राऊत म्हणाले. तसेच या कारवाईनंतर राऊतांनी “असत्यमेव जयते” असे सूचक ट्वीट केले आहे.
“हे काय आर्थिक गैरव्यवहार वगैरे म्हणतात ना, एक रुपया जरी अशा गैरव्यवहारातला आमच्या खात्यात आला असेल आणि त्यातून आम्ही मालमत्ता खरेदी केली असेल, तरी सर्व मालमत्ता आम्ही भाजपाला दान करायला तयार आहोत. आमचं राहतं घर जप्त केलंय. त्यावर भाजपाचे लोक उड्या मारत आहेत. बघितलं मी.. फटाके वाजवत आहेत. मराठी माणसाचं हक्काचं राहतं घर जप्त केल्याबद्दल. आनंद आहे. असंच करत राहिलं पाहिजे. यातून लढण्याची अजून प्रेरणा मिळते”, असं राऊत म्हणाले आहेत. दरम्यान, या संजय राऊत यांच्यावरील कारवाईनंतर राज्यातील राजकारण तापलं आहे.