मुंबई – शिवसेनेचे खासदार संजय राउत यांनी बुधवारी मनी लॉन्डरिंग प्रकरणी सक्तवसुली संचलनालयाच्या चौकशीला उपस्थित राहणे टाळले. सध्या संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू असल्यामुळे आपण त्या कामात व्यस्त असल्याचे कारण राउत यांनी दिले असल्याचे समजते आहे.
राउत यांचे लेखी पत्र घेऊन त्यांचे वकील ईडीच्या कार्यालयामध्ये गेले होते. चौकशीसाठी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यानंतरचा कालावधी त्यांनी मागितला आहे. राउत यांच्या पत्राचा अभ्यास केल्यानंतर ईडीकडून राउत यांना नव्या तारखेचे नवे समन्स बजावण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
राष्ट्रपती निवडणुकीचा निकाल गुरुवारी होणार जाहीर
यापूर्वी ईडीने 1 जुलै रोजी राउत यांची सुमारे 10 तास चौकशी केली आहे. राउत यांचे निवेदन ईडीने नोंदवून घेतले आहे.
संसद अधिवेशनासाठी दिल्लीमध्ये असल्यामुळे मुंबईत ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी येऊ शकत नसल्याचे राउत यांनी आपल्या पत्रामध्ये म्हटले आहे. आपण काहीही चुकीचे केलेले नाही आणि केवळ राजकीय सूडबुद्धीने आपल्याला लक्ष्य केले जात असल्याचे राउत यांनी म्हटले आहे.