नागपूर – श्रीधर पाटणकर यांच्यावर अंमलबजावणी संचनालयाने केलेली कारवाई फक्त राजकीय दबाव, सूडबुद्धी आणि कोणतीही बाजू मांडण्याची संधी न देता सनसनाटी निर्माण करण्यासाठी करण्यात आली. केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून तुम्हाला झुकवू शकतो, नमवू शकतो हे राजकीय विरोधकांना दाखवण्यासाठी जिथे जिथे भाजपाची सत्ता नाही, अशा प्रत्येक राज्यात अशा कारवायांना ऊत आला आहे. ही रक्षसी हुकूमशाहीची नांदी आहे, अशा शब्दात शिवसेना नेते संजय राऊत यांनी आपला रोष व्यक्त केला आहे.
शिवसेनेच्या शिवसंवाद यात्रेच्या निमित्त राऊत विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. त्यावेळी त्यांनी पत्रकारांसमोर शिवसेनेची भूमिका मांडली. पत्रकारांनी पाटणकर यांच्यावरील कारवाईचा प्रश्न उपस्थित केल्यानंतर राऊत कडाडले. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचा भाचा अभिषेक बॅनर्जी आणि त्यांच्या पत्नीलाही नोटीस आली आहे.
आपण एखाद्या राज्यात निवडणूक हरलो, म्हणून ज्यांनी पराभव केला, त्यांच्यावर केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून अशा प्रकारे दबाव आणणं ही रक्षसी हुकूमशाहीची नांदी आहे. संसदेमध्ये कालच जी माहिती आली, त्यानुसार ईडीच्या सर्वाधिक कारवाया जिथे भाजपाचे सरकार नाही तिथे झाल्या आहेत.
यूपीएच्या 11 वर्षांच्या काळात 22 ते 23 कारवाया झाल्या आहेत. मोदींचं सरकार आल्यापासून साधारणपणे 2500 कारवाया झाल्या आहेत. त्यातल्या अनेक कारवाया चुकीच्या असल्याचे नंतर स्पष्ट झाले आहे. केंद्रीय तपास यंत्रणा हुकूमशाही पद्धतीनुसार गुलामासारख्या वागवल्या जात असल्याचे स्पष्ट झाल्यचा आरोप राऊत यांनी केला.
झोपेतून जागे व्हा!
अशा कारवाई करून येथील सरकार पडेल आणि राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होईल, असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही झोपेतून जागे व्हा. असे काहीही होणार नाही. आम्ही लढत राहू आणि तुमची सुडाची भावना लोकांसमोर आणू. महाराष्ट्रातली जनता ठाकरे सरकारला, आम्हाला सगळ्यांना ओळखते. कधी ना कधी या राजकीय कारवाईचे उत्तर सगळ्यांना द्यावे लागेल. याची किंमत चुकवावी लागेल, असेही संजय राऊत म्हणाले.