मुंबई :- भारतात येत्या काळात होत असलेल्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक स्पर्धेसाठी अनुभवी फलंदाज व सलामीवीर शिखऱ धवनला संधी मिळावी, असे मत भारताचे माजी कसोटी क्रिकेटपटू व समालोचक संजय मांजरेकर यांनी व्यक्त केले आहे.
विश्वकरंडक ही मोठी स्पर्धा आहे व त्यासाठी केवळ नवोदितांनावरच मदार ठेवून चालणार नाही. धवनकडे सातत्याने दुर्लक्ष करण्यात येत असून त्याचा भारतीय संघाला विश्वकरंडक स्पर्धेत फटका बसू शकतो. धवनसारखा अनुभवी सलामीवीर फलंदाज संघात असणे अत्यंत गरजेचे आहे. त्याचबरोबर जर कर्णधार रोहित शर्मा व शुभमन गिल हेच डावाची सुरुवात करणार असतील तर धवन हा सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. मधल्या फळीत विराट कोहली, लोकेश राहुल, इशान किशन व अष्टपैलु हार्दिक पंड्या अशी भक्कम फलंदाजी असेल तर समोरच्यासंघावर दडपण येइल, असेही मांजरेकर म्हणाले.
गोलंदाजीबाबत बोलायचे तर महंमद शमीसह महंमद सिराज तसेच पूर्ण तंदुरुस्त असेल तर प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह असा ताफा आवश्यक आहे. त्यांच्या जोडीला फिरकी गोलंदाजीसाठी यजुवेंद्र चहल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा यांच्या जोडीला प्रसिद्ध कृष्णाही आहेतच त्यामुळे भारतात होत असलेल्या या स्पर्धेत हेच फिरकी गोलंदाज वर्चस्व राखू शकतात, असेही त्यांनी म्हटले आहे.
एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक स्पर्धेला येत्या 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार असून 19 नोव्हेंबरला अंतिम सामना रंगणार आहे. हा अंतिम सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. या स्पर्धेतील सामन्यांचे आयोजन देशातील एकूण 10 शहरांमधील स्टेडियममध्ये करण्यात आल आहे. या स्पर्धेत बारताच्या मोहिमेची सुरुवात 8 ऑक्टोबरला होत असलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्याने होणार आहे.
मांजरेकर यांनी निवडलेला संघ – रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, शिखर धवन, विराट कोहली, लोकेश राहुल, इशान किशन, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, महंमद शमी, महंमद सिराज, कुलदीप यादव, यजुवेंद्र चहल, संजू सॅमसन, प्रसिद्ध कृष्णा.