– माधव विद्वांस
यष्टीरक्षक, फलंदाजी, गोलंदाजी करणारे क्रिकेटपटू, स्वतंत्र भारताचे पहिले कसोटी क्रिकेट कर्णधार आणि पत्रकार लाला अमरनाथ भारद्वाज यांचा आज स्मृतिदिन. अमरनाथ यांचा जन्म पंजाबमधील कपूरथला येथे एका गरीब पंजाबी भाषिक कुटुंबात 11 सप्टेंबर 1911 रोजी झाला. किशोरवयात क्रिकेटमध्ये आपले स्थान निर्माण करण्याआधी अमरनाथ हॉकी आणि ऍथलेटिक्समध्ये गुंतले होते. त्यांच्यातील खेळाची चमक पाहून एका क्रिकेटप्रेमी मुस्लीम कुटुंबाने त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली.
अमरनाथ यांनी वर्ष 1933-34 मध्ये दक्षिण पंजाबसाठी एमसीसी विरुद्ध तिसऱ्या प्रथमश्रेणी सामन्यात 109 धावा केल्या. या वेळी ते यष्टीरक्षक आणि सलामीवीर म्हणून खेळले. त्यांच्या पाचवे प्रथमश्रेणी सामन्यामध्ये बॉम्बे जिमखाना येथील कसोटीत अमरनाथ शतक करणारे पहिले भारतीय फलंदाज ठरले. या वेळी प्रेक्षकांनी बॅंड वाजवत शतकाचे स्वागत केले. वर्ष 1933-34 मधील मालिकेमध्ये चेन्नई येथे त्यांनी 4 बळी घेतले व गोलंदाजीत आपले नैपुण्य सिद्ध केले. वर्ष 1936च्या इंग्लंड दौऱ्यात कर्णधारासोबत झालेल्या मतभेदामुळे त्यांना दौऱ्यातून परत पाठवण्यात आले.
त्याआधी या दौऱ्यात 12 सामन्यात 3 शतकांसह 613 धावा केल्या होत्या आणि 32 बळी घेतले होते.वर्ष 1946 मधे लॉर्डसवर, 118 धावा देऊन 5 बळी घेतले व स्वतः 50 धावा पण केल्या. वर्ष 1946च्या इंग्लंड दौऱ्यात सॉमरसेटविरुद्धच्या सामन्यात अमरनाथ गोलंदाजीत धाव रोखणारे प्रभावी गोलंदाज ठरले. सॉमरसेटविरुद्धच्या सामन्यात हॅरोल्ड गिम्बलेटसारख्या षटकार मारणाऱ्या फलंदाजाला अनेक निर्धाव षटके टाकली. तो अखेर वैतागला व अमरनाथना विचारले, तू कधी हाफ-व्हॉली टाकत नाहीस कां? लगेचच अमरनाथने उत्तर दिले, अरे हो, मी 1940 मध्ये एकदा गोलंदाजी केली होती.
ऑस्ट्रलियाच्या दौऱ्यात त्यांनी विजय मर्चंटच्या अनुपस्थितीत भारताचे नेतृत्व केले. हा दौरा निराशाजनक असला तरी त्यांनी केलेल्या फलंदाजीमुळे ते लोकप्रिय झाले. व्हिक्टोरियाविरुद्ध नाबाद 228 आणि क्विन्सलॅंडविरुद्ध नाबाद 172 धावा केल्या. यावर एका वृत्तपत्राने ऑस्ट्रेलियातील लोक ब्रॅडमनची बॅट पाहण्यासाठी नव्हे तर अमरनाथला पाहण्यासाठी येत आहेत, असे छापले होते. 1949 मध्ये झालेल्या दौऱ्यात काळजीवाहू कर्णधार म्हणून अमरनाथ यांच्यावर बोर्डाचे अध्यक्ष अँथनी डी मेलो यांनी 10 एप्रिल 1949 रोजी सर्वसाधारण सभेत शिस्तभंगाच्या आरोपासह 23 आरोप केले व अमरनाथ यांना भारतासाठी किंवा भारतातील कोणत्याही प्रांतासाठी क्रिकेट खेळण्यापासून निलंबित केले.
त्यानंतर एप्रिल 1950 मध्ये लॅंकेशायरसाठी खेळायला निघण्यापूर्वी अमरनाथने ठामपणे सांगितले, डी मेलोने माझे खूप नुकसान केले आहे. पण मी माझ्या प्रतिष्ठेला पूर्णतः सिद्ध केले आहे. डी मेलोने मला क्रिकेटमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला होता, पण यश आले नाही. एक दिवस लवकरच, मला खात्री आहे की, तो माझ्याकडे रेंगाळत येईल आणि त्याला पुन्हा मदत करण्याची विनंती करेल.
खेळातील निवृत्तीनंतर अमरनाथ यांची पाकिस्तान दौऱ्यावर व्यवस्थापक म्हणून नियुक्ती करण्यात आली. वर्ष 1982 मध्ये पाकिस्तानच्या दौऱ्यावेळी ते पीटीआयसाठी रिपोर्टर म्हणून गेले होते. 5 ऑगस्ट 2000 रोजी त्यांचे निधन झाले.