इस्लामपूर (प्रतिनिधी) – पुणे पदवीधर मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून क्रांती शिक्षण व उद्योग समूहाचे अध्यक्ष अरुण लाड यांनी तर भाजपकडून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी आज अर्ज भरला. वंचित कडून प्रा.सोमनाथ साळुंखे, ‘आप ‘ तर्फे डॉ. अमोल पवार, जनता दलाच्या वतीने प्रदेशाध्यक्ष प्रा. शरद पाटील , श्रमुद कडून अॅड. कृष्णा पाटील, रयत क्रांती संघटनेने प्रा. एन डी चौगुले यांना मैदानात उतरवले आहे. पुणे पदवीधर मतदारसंघ हा पाच जिल्ह्याचा असला तरी राज्यातील प्रमुख पक्षांनी सांगली जिल्ह्यातील उमेदवारांना पसंती दिली आहे.
यावरून पदवीधर निवडणूकीचा केंद्रबिंदू सांगली ठरला आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यातूनच मुख्य लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अरुण लाड व सतिश चव्हाण यांच्या नावाची घोषणा केली होती. स्वतः प्रदेशाध्यक्ष म्हणून उपस्थित राहून गुरुवारी जयंत पाटील यांनी विधान परिषद निवडणुकीसाठी पदवीधर मतदारसंघातून औरंगाबाद विभागात सतिश चव्हाण तर पुणे मतदारसंघातून अरुण लाड यांचे अर्ज दाखल केले. राष्ट्रवादीचे दोन्ही उमेदवार निवडून येतील असा विश्वास व्यक्त केला.
भाजपाचे उमेदवार देशमुख यांना राजकारणाचा मोठा वारसा पुढे आहे. वडील संपतराव देशमुख हे १९९५ ला आमदार होते. त्यांच्या पुढाकाराने टेंभू योजनेचा जन्म घेतला होता. चुलत बंधू पृथ्वीराज देशमुख हे विधानपरिषदेचे आमदार व भाजपाचे जिल्हाध्यक्ष आहेत. शिवाय देशमुख हे स्वत : जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष आहेत. जिल्हा परिषद अध्यक्ष असताना त्यांनी लोकाभिमुख कामे केली आहेत.
लाड यांनी क्रांती साखर कारखान्याच्या माध्यमातून राज्यस्तरावर नवी ओळख निर्माण केली आहे. क्रांतिअग्रणी जी.डी. बापू लाड यांच्या विचारांचा वसा व वारसा लाभला आहे. गतवेळी त्यांनी पदवीधर ची अपक्ष निवडणूक लढवली होती. यंदा महाविकास आघाडी तर्फे उमेदवारी दिली आहे. पक्षांचा असणारा नेटवर्क चा लाभ होईल असा त्यांचा अंदाज आहे.
प्रा. पाटील यांनी पदवीधर साठी नशिब आजमावले आहे. आप चे डाॅ. पवार यांनी महापूर , राष्ट्रीय महामार्ग चा बाबत विविध आंदोलने करुन पदवीधरांच्यात चर्चेत आहे. पुणे पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून सांगली जिल्ह्यातील उमेदवारातच तुल्यबळ लढत होणार आहे. प्रथमदर्शनी भाजपचे संग्रामसिंह देशमुख आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण लाड यांच्यातच मुख्य लढत होईल अशी अपेक्षा आहे.
पदवीधर मतदारसंघातील अनुभवी उमेदवार माजी आमदार शरद पाटील तसेच वंचित बहुजन आघाडीचे प्रा. सोमनाथ साळुंखे हे दोन्ही उमेदवार चमत्कार दाखवणार का ? याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटने कडून कोल्हापूर जिल्ह्यातील प्रा. एन डी चौगुले यांचा उमेदवारी अर्ज भरला आहे.