मुंबई – मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढल्यास मुंबई ही आर्थिक राजधानी राहणार नाही, असे वादग्रस्त वक्तव्य महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केल्यानंतर त्यांच्यावर सर्व स्तरातून टीका करण्यात येत आहे. त्यांच्या या वक्तव्यावर अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. याच पार्श्वभूमीवर संभाजीराजे छत्रपती यांनी ट्विट करत राज्यपालांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला आहे. शिवाय कोश्यारी यांना महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावरून हटविण्याची आणि याठिकाणी महाराष्ट्राची परंपरा जाणणारा व त्याबद्दल आदर असणारा योग्य व्यक्ती नेमावा, अशी मागणी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.
“विद्यमान राज्यपाल महोदयांची जीभ वारंवार घसरते आहे. शिवरायांबद्दलचे वक्तव्य असो, महात्मा फुले व सावित्रीबाईंबद्दल पातळी सोडून बोलणे असो, अथवा मुंबई बद्दल वक्तव्य करून मराठी माणसाची अस्मिता दुखावणे असो, हे महाशय केवळ राज्यपाल पदाचीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राची प्रतिमा डागाळत आहेत, असे ट्विट संभाजीराजे छत्रपती यांनी केले आहे.
‘राष्ट्रपती द्रौपती मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तत्काळ या विषयात गांभीर्याने लक्ष घालून महाराष्ट्राच्या ऐतिहासिक व सांस्कृतिक परंपरेचे भान असणारा व त्याबद्दल आदर असणारा एखादा सुयोग्य व्यक्ती महाराष्ट्राचा राज्यपाल म्हणून नियुक्त करावा, असे ट्विट संभाजीराजे छत्रपती यांनी केले आहे.
“भगतसिंह कोश्यारी यांची राज्यपालपदावरून उचलबांगडी करावी”; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले