पुणे – राज्यातील सर्वसामान्य जनतेला न्याय मिळून देण्यासाठी पंचसूत्री कार्यक्रमातून राज्यात स्वराज्य आणण्यासाठी लोकसभेच्या 2024 मध्ये होणाऱ्या निवडणुकीच्या मैदानात आता “स्वराज्य’ पक्षही उतरणार आहे. स्वराज्य संघटनेचे संस्थापक आणि माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या संघटनेचे पहिले अधिवेशन बालगंधर्व रंगमंदिर येथे पार पडले. यावेळी बोलताना त्यांनी ही घोषणा केली.
दरम्यान, अधिवेशनापूर्वी संभाजीराजे छपत्रतींच्या हस्ते पक्षाच्या पुण्यातील शिवाजीनगर येथील मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन सर्वसामान्य जनतेच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर, कार्यालयापासून ते बालगंधर्व रंगमंदिरापर्यंत ढोलताशांच्या गजरात तसेच मैदानी खेळांचे प्रात्यक्षिक सादर करत शोभायात्रा काढण्यात आली. पक्षाचे सरचिटणीस डॉ. धनंजय जाधव, उपाध्यक्ष रघुनाथ चित्रे पाटील, राजेंद्र कोंढरे, श्रीमंत कोकाटे,संयोगीताराजे भोसले, शहाजीराजे भोसले, माधव देवसरकर, विनोद साबळे, करण गायकर,अंकुश कदम,फत्तेसिंग सावंत यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलताना संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, सध्याची राजकारणाची पातळी घसरलेली आहे. राज्यकर्त्यांना सत्तेचा माज चढलेला असून राज्यातील सुसंस्क़ृतपणा संपलेला आहे. राज्यात केवळ खोके आणि बोके, अशा विषयांवर चर्चा केली जाते. महापुरूषांच्या नावावरून राजकारण केले जाते. पण त्यांनी शिकविलेल्या मार्गावर चालत नाही. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत पक्ष लढणार असल्याची घोषणा संभाजीराजे छत्रपती यांनी केली.
सरकारचाही घेतला समाचार
दरम्यान, या वेळी बोलताना संभाजीराजे छत्रपती यांनी राज्य शासनावरही जोरदार टीका केली. आपल्या देशातील समुद्र सुंदर आहे. बाहेरून येणारे लोक गोव्याला जातात. मात्र, आपले लोक समुद्र पाहायला परदेशात जातात. राज्यात मी अनेक ठिकाणी फिरतो तेथे उत्तर मिळते कारखाने बंद. अनेक मोठे उद्योग राज्यातून का बाहेर जात आहेत?, शेतकऱ्यांची उपेक्षा यावरूनही त्यांनी सरकारवर टीका केली.