बाहरीच (उत्तर प्रदेश) – उत्तर प्रदेशच्या निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यापर्यंत समाजवादी पार्टीला जागांची “डबल सेंच्युरी’ मिळेल, अशी आशा समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनी व्यक्त केली आहे. सपाच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारला या निवडणूकीत ऐतिहासिक विजय मिळवून द्यावा, असे आवाहन त्यांनी जनतेला केले.
इयत्ता 12 वी नंतर इंटरला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना लॅपटॉप देण्याचे आश्वासन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नुकतेच दिले होते. त्यावरही अखिलेश यांनी जोरदार टीका केली आहे. “इंटर’ हे “इंटरमिजीएट’चे लघुरुप आहे आणि त्याचाच अर्थ इयत्ता 11 वी आणि 12 वी असा आहे. या विद्यार्थ्यांचा उल्लेख इंटरचे विद्यार्थी करणाऱ्या भाजपच्या नेत्याचे वक्तव्य ऐकून “लोटपोट’ व्हायला होते, असे अखिलेश म्हणाले.
या नेत्याने “इंटर’ केल्यावर इयत्ता 10 वी ला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना लॅपटॉप देण्याचे आश्वासन दिले नाही, हे नशीब म्हणावे लागेल, अशी पुस्तीही अखिलेश यांनी जोडली. लखीमपूर खेरी प्रकरणी मंत्र्याच्या मुलाला जरी जामीन मिळाला असला तरी जनतेच्या न्यायालयात जामीन मिळणार नाही. भाजपच्या उमेदवारांची डिपॉझिट जप्त होतील, असे भाकितही त्यांनी वर्तवले.