नगर – महिला बचतगटांच्या माध्यमातून महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करणे ही काळाची गरज बनली आहे. त्यांना आर्थिकदृष्टया सक्षम करण्यासाठी बचत गट हे महत्वाचे साधन असून या बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध झाल्यास महिलांचा आत्मविश्वास दुणावतो.
नगरमध्ये यंदा साईज्योती स्वयंसहाय्यता बचत गटाचे 11 वे प्रदर्शन होत आहे. या महोत्सवामुळे बचत गटाच्या महिलांना आधुनिक काळातील मार्केटिंग कौशल्य शिकण्यास मदत झाली आहे. सावित्रीच्या लेकी आज फक्त शिकल्याच नाही तर राजकारण, समाजकारण, नोकरी, उद्योग,व्यवसाय या सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहेत. महिलांना खऱ्या अर्थाने उन्नत व सक्षम करणारी बचत गट चळवळ अधिकाधिक व्यापक होण्यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आपण कटिबध्द आहोत, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राजश्री घुले यांनी केले.
गुलमोहोर रोडवरील तांबटकर मळा येथील मैदानावर राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत ग्रामीण विकास विभाग व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने साई ज्योती स्वयंसहाय्यता यात्रा-2020 चे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा घुले यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रताप पाटील शेळके, आमदार आशुतोष काळे, मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक परिक्षित यादव, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, सदस्य सुप्रिया पाटील, सुवर्णा जगताप, उज्ज्वला ठुबे, सुजाता तनपुरे, विमल आगवन, सोनाली साबळे, सोनाली रोहमरे, महेश सूर्यवंशी, शारदा लगड किरण साळवे आदी उपस्थित होते. मान्यवरांनी उदघाटनानंतर विविध स्टॉल्सना भेटी देवून पाहणी केली.
अध्यक्षा घुले पुढे म्हणाल्या की, नगर जिल्ह्याला अकरा वेळा बचत गटांच्या उत्पादनांचे विक्री प्रदर्शन भरविण्याची संधी मिळाली आहे. सहा वेळेस जिल्हा स्तरावर तर पाच वेळेस विभागीय प्रदर्शन याठिकाणी भरविण्यात आले. या सर्व प्रदर्शनांना नगरकरांचाही मोठा प्रतिसाद मिळाला. महिलांच्या सक्षमीकरणासाठी आवश्यक त्या सर्व गोष्टी करण्याचा आपला कायम प्रयत्न असतो. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या विशेष प्रयत्नातून महिलांना राजकीय आरक्षण मिळाल्याने आज स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिला सक्षमपणे विविध पदे भूषवून ठसा उमटविणारे काम करीत आहेत. महिला धोरणामुळे ग्रामीण भागातील महिलांच्या जीवनात आमूलाग्र बदल झाले आहेत.
मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील म्हणाले की, नगरमधील या जिल्हास्तरीय प्रदर्शनात 400 हून अधिक महिला बचत गटांच्या 800 हून अधिक महिला सहभागी झाल्या आहेत. त्यांनी निर्माण केलेली गृहपयोगी वस्तू, सौंदर्यप्रसाधने, लोकरीची उत्पादने, मसाले, सेंद्रीय उत्पादने, कडधान्ये, लाकडी वस्तू, हस्तकला वस्तू, वनौषधी आदी गोष्टी प्रदर्शनात आहेत. प्रदर्शनात सहभागी महिलांच्या निवासाची व्यवस्था करण्यात आलेली आहे.