राहुरी (अनिल देशपांडे) – तालुक्यातील टाकळीमियाँ येथे आयोजित एका लग्नसमारंभात सुमारे शंभर जणांना अन्नातून विषबाधा झाली. त्यातील 35 जणांना येथील विवेकानंद नर्सिंग होम येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दोघांची प्रकृती गंभीर असून, त्यांना लोणी येथील प्रवरा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तसेच इतर रुग्णांवर राहुरी येथील ग्रामीण रुग्णालय व देवळाली प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, टाकळीमियाँ येथे आज एका लग्नसमारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोठ्या संख्येने नातेवाईक व आप्तेष्ट या सोहळ्यास उपस्थित होते. लग्नसोहळा पार पडल्यानंतर उपस्थितांनी भोजन घेतले. त्यानंतर काही वेळाने त्यातील सुमारे शंभर जणांना उलट्या, जुलाब, चक्कर येणे अशी लक्षणे जाणवू लागली.
त्यानंतर या सर्वांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. अस्वस्थ वाटू लागलेल्या 35 जणांना राहुरी येथील विवेकानंद नर्सिंग होम येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यातील दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना लोणी येथील प्रवार रुग्णालयात हलविण्यात आले आहे. काहींना राहुरी ग्रामीण रुग्णालयात, तर काहींना देवळाली प्रवरा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे.
विवेकानंद नर्सिंग होममध्ये दाखल करण्यात आलेल्या रुग्णांवर तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ. विलास कड यांनी उपचार सुरू केले आहेत. त्यांनी या रुग्णांना अन्नातून विषबाधा झाली असल्याचे यावेळी सांगितले. विषबाधा झालेल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात लहान मुलांचा समावेश आहे.