सातारा: पंचवीस लाखांच्या खंडणीसाठी तेजस विजय जाधव (वय 17, रा. आष्टे, ता. सातारा) या युवकाचा खून केल्याप्रकरणी पोलिसांच्या ताब्यात असलेल्या साहिल रुस्तूम शिकलगार ( रा. नागठाणे, ता. सातारा) याने आज पोलीस कोठडीतून पळून जाण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी त्याच्याविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, आष्टे ( ता. सातारा) येथील तेजस जाधव या युवकाचा खंडणीसाठी अपहरण करुन खून करण्यात आला होता. या गुन्ह्यात साहिल शिकलगारसह अन्य तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावल्यानंतर सातारा शहर पोलीस ठाण्याच्या लाॅकअपला ठेवण्यात आले होते. आज सायंकाळी यातील एका संशयिताला चौकशीसाठी बाहेर काढण्यासाठी पोलिसांनी लाॅकअपचा दरवाजा उघडला होता. यावेळी साहिल शिकलगार याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याठिकाणी बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांनी साहिलच्या जाग्यावरच मुसक्या आवळल्या.