नाशिक – शिवसेनेने केलेल्या कामांच्या आणि शिवसैनिकांच्या मेहनतीच्या जोरावर महाराष्ट्र पुन्हा भगवा होणार आहे, असा विश्वास युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. नाशिकमध्ये शिवसेनेकडून विजय संकल्प मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यादरम्यान आयोजित कार्यक्रमात आदित्य ठाकरे बोलत होते.
मालेगावातून बिनविरोध निवडून आणू’
आदित्य ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक लढवावी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे, अशी सध्या चर्चा सुरु आहे. या चर्चेला पुष्टी जोडत ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी आदित्य ठाकरे यांनी मालेगाव विधानसभा निवडणूक लढवावी, अशी मागणी केली आहे. मालेगाव विधानसभा मतदारसंघातून आदित्य ठाकरे यांना बिनविरोध निवडून आणू शकतो असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. तसेच आदित्य ठाकरे यांना एक लाख मतांचे मताधिक्क मिळवून देवू, असा दावाही दादा भुसे यांनी केला आहे.
नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात हा विजय संकल्प मेळावा पार पडला. यावेळी आदित्य ठाकरे यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन केले. “1995 मध्ये नाशकात शिवसेनेचे अधिवेशन झाले. त्यावेळी शिवसेनेचे सरकार आले, म्हणूनच आज त्यासाठी नाशिकला आलो आहे, असे ते म्हणाले.
यावेळी शिवसैनिकांचे कौतुक करत ते म्हणाले की, “शिवसैनिक आणि कार्यकर्ते जनतेची कामे करतात. जनतेची मदत करतात म्हणून आज मला प्रचंड प्रेम मिळत आहे. कार्यकर्त्यांचा जोश आणि जल्लोषच महाराष्ट्र भगवा करणार आहे.
लोकसभा निवडणुकीत शिवसेनेची मते तीन टक्क्यांनी वाढली आहेत. आम्ही दिलेली वचन बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलेल्या 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण याप्रमाणे पाळत आहोत. मी आश्रम शाळेत, आधार केंद्रात गेलो होतो. तिथं आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची मुले भेटली. त्यांच्या इच्छा पूर्ण करायच्या आहेत. विरोधकांची मनं जिंकायची आहेत, असे आदित्य ठाकरे म्हणाले.