नवी दिल्ली – येत्या लोकसभा निवडणुकीत पक्षाकडून उमेदवारी घेण्याची कॉंग्रेसच्या अनेक बड्या नेत्यांची तयारी नाही. यातील काही नेते मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगढ या कॉंग्रेसचा भारतीय जनता पार्टीशी थेट मुकाबला असलेल्या राज्यांतील आहेत.
त्यामुळे पक्षानेही हा मुद्दा प्रतिष्ठेचा केला असून पक्षाच्या उमेदवार निवड समितीने या नेत्यांच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे या नेत्यांना निवडणूक लढवावीच लागेल असा स्पष्ट संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचला आहे.
पक्षातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार छत्तीसगढचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि राज्यातील ज्येष्ठ नेते ताम्रध्वज साहू यांच्या नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. जिंकण्याची शक्यता असलेल्या नेत्यांच्या नावावरच फोकस ठेवण्याचा कॉंग्रेसचा प्रयत्न आहे. २०२४ ची निवडणूक ही केवळ निवडणुकीची लढाई नसून त्यापूर्वी मानसिक स्तरावरील लढाई सुरू झाली आहे.
मानसिक दबावाचा खेळ जर भारतीय जनता पार्टीकडून खेळला जात असेल तर आम्हीही पूर्ण तयार आहोत हे पक्षाला दाखवावेच लागणार असल्याचे सूत्रांनी नमूद केले. बघेल, साहू आणि ज्योत्स्ना महंत यांना कोणते मतदार संघ दिले जाणार आहेत त्याची नावेही निर्धारित करण्यात आली आहे.
या तीन नेत्यांना काही पर्याय ठेवलेला नाही. तसेच यातून पक्षाने मध्य प्रदेशातील ज्येष्ठ नेते कमलनाथ, दिग्विजय सिंह आणि जीतू पटवारी यांनाही संदेश दिला आहे की त्यांना निवडणूक लढवावीच लागेल. राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि त्या राज्यातील विधानसभेचे माजी अध्यक्ष सी. पी. जोशी यांच्यावरही अनुक्रमे जोधपूर आणि जयपूर ग्रामीण येथून रिंगणात उतरण्याचा दबाव आहे.
माजी उपमुख्यमंत्र सचिन पायलट यांच्यासमोरही त्यांच्या पारंपरिक मतदार संघातून उतरण्याचा पर्याय ठेवण्यात आला आहे तर राजस्थान प्रदेश कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष गोविंदसिंह डोटासरा हेही निवडणूक लढवू शकतील.