नवी दिल्ली – भारतीयांचे श्रद्धास्थान असलेल्या पवित्र गंगेचे अस्तित्व राहावे, तिचे रक्षण व्हावे, या मागणीसाठी 15 डिसेंबर 2019 पासून गंगेच्या काठावर हरिद्वार येथे बेमुदत उपोषण करणाऱ्या साध्वी पद्मावतीच्या या आंदोलनाची दखल उत्तराखंड आणि केंद्र सरकारनेही घेतलेली नाही, हे दुर्दैव होय. काही दिवसांपूर्वी प्रक़ृती खालावलेल्या पद्मावती यांना अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत दाखल केले होते. कालच त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले असून, आता त्यांच्या उपोषणाची धुरा स्वामी शिवानंद यांनी पुढे सुरु ठेवली आहे.
जागतिक पर्यावरण परिषदेत भाषण केलेल्या ग्रेटा थनबर्गला जेवढी प्रसिद्धी मिळाली, त्याच्या एक टक्काही प्रसिद्धी साध्वी पद्मावतीच्या कार्याला मिळाली नाही, हे दु:खद आहे.
गेली शंभर वर्षे गंगेच्या वाढत्या प्रदूषणाचा प्रश्न गाजतो आहे. गंगेच्या प्रवाहात स्नान केल्यावर सर्व पापांचा नाश होतो, अशी भारतीयांची पारंपरिक श्रद्धा. पण, गेल्या 50 वर्षात कानपूर, अलाहाबाद, बनारस या मोठ्या शहरांच्या सांडपाण्यासह औद्योगिक कारखान्यांचे विषारी सांडपाणीही थेट गंगेच्या प्रवाहात सोडले जात असल्याने, गंगेचे पाणी प्रदूषित-विषारी झाले आहे. गंगेच्या प्रवाहातल्या हजारो जीवजंतूंचे अस्तित्वही धोक्यात आले आहे.
पवित्र गंगेत सोडल्या जाणाऱ्या मोठ्या गटारींचे प्रवाह रोखावेत, या सांडपाण्यावर प्रक्रिया व्हावी, कारखान्यांचे सांडपाणी गंगेत सोडले जावू नये, अशा उपाययोजनांची मागणी करीत पर्यावरण संरक्षक आणि साधूंनी अनेक आंदोलने केली. गेल्याच वर्षी आयआयटी कानपूरचे माजी प्राध्यापक एम. डी. अगरवाल यांनी गंगेच्या अस्तित्वासाठी 111 दिवस उपोषण करून प्राण सोडले. पण, त्यांच्या बलिदानानंतरही गंगा शुद्धीकरणाचा केंद्र सरकारने घोषित केलेला प्रकल्प गेल्या वीस वर्षात पूर्ण झालेला नाही. गंगेचे प्रदूषण सातत्याने वाढते आहे आणि शुद्धीकरणाच्या प्रकल्पावर खर्च झालेले हजारो कोटी रुपये गंगेच्या पाण्यातच बुडाले आहेत.
अगरवाल यांच्या बलिदानातून प्रेरणा घेऊन बिहारच्या नालंदा विद्यापीठातून तत्त्वज्ञान विषयाची एम. ए. पदवी मिळवलेल्या 24 वर्षीय साध्वी पद्मावती यांनी हरिद्वारच्या मातृसदन आश्रमात बेमुदत उपोषणाला प्रारंभ केला होता. गंगेचे प्रदूषण थांबवा, तिचे पावित्र्य टिकवा, पुढच्या पिढ्यांचे भविष्य उद्वस्त करू नका, या मागण्यांसाठीच 24 वर्षे वयाच्या या युवतीने आपले प्राण पणाला लावले होते. पण, राज्य आणि केंद्र सरकारने त्यांच्या उपोषणाची साधी दखलही घेतलेली नाही.
हिमालयातून वाहणाऱ्या नद्यांचे प्रवाह गंगेत येतात. या नद्यांवरच धरणे बांधल्यामुळे गंगेचा प्रवाह खंडित झाला आहे. तिचे भविष्यातले अस्तित्व धोक्यात आले आहे. गंगेच्या पात्रात मोठ्या प्रमाणावर वाळूचा उपसाही सुरूच आहे. तिच्या काठावर अक्राळविक्राळ अतिक्रमणेही झालेली आहेत, याकडे लक्ष वेधण्यासाठी आणि कायमस्वरुपी योजनांसाठी हे उपोषण आता स्वामी शिवानंद यांनी सुरु ठेवले आहे.