मुंबई : राज्यात ऐन दिवाळसणाच्या काळात एसटी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे.त्यामुळे राज्यातील जनतेचे हाल मोठ्या प्रमाणात होत आहेत.दरम्यान, हे आंदोलन थांबावे व एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर रूजू व्हावे,यासाठी सरकारकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र, एसटी कर्मचारी आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनाला रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष व माजी कृषी मंत्री सदाभाऊ खोत यांनी पाठिंबा दिला आहे.
सदाभाऊ खोत एसटी कर्मचाऱ्यांसह मंत्रालयावर मोर्चा काढण्यासाठी मुंबईत आले होते. मात्र, मोर्चेकऱ्यांमुळे वाहतूक कोंडी झाल्याने त्यांना वाशी चेकनाक्याजवळ थांबवण्यात आले आहे. “हे आंदोलन चिघळवण्याचे काम राज्य सरकारने केल. शांततेच्या मार्गाने आझाद मैदानावर एसटी कर्मचारी येतील, मंत्रालयालयाऐवजी आझाद मैदानात येण्याचे आवाहन प्रशासनाने केले होते. त्यांच्या आवाहनाला आम्ही संमती दिली होती. पंरतु त्यापूर्वीच आम्हाला अडवण्यात आले आहे.
राज्यभरातून जवळपास ५० हजार एसटी कर्मचारी रस्त्यावर उतरले आहेत. मात्र, सर्वांनाच कुठेना कुठे पोलीस बॅरिकेड्स लावून अडवत आहेत. ही लढाई एसटी कर्मचाऱ्यांच्या हक्काची लढाई आहे. आपण त्यांना त्यांचा हक्क मागण्यापासून थांबवू शकत नाही,” असे सदाभाऊ खोत यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटले.
“दोन दिवसांपूर्वी शरद पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांची बैठक झाली. या बैठकीत पोलिसांच्या बळाचा वापर करून हे आंदोलन मोडून काढायचे ठरल्याचा आरोप सदाभाऊ खोत यांनी केला. ड्रग्ज प्रकरणावरून रोज पत्रकार परिषद घेऊन तुम्ही ड्रग्ज माफियांना वाचवण्यासाठी टाहो फोडता. मात्र, ४० एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या करून देखील तुम्ही या विषयावर बोलायला तयार नाही. त्यामुळे एसटी जोपर्यंत मला मुंबईत जाऊ देणार नाही, तोपर्यंत इथेच अन्नत्याग आंदोलन करणार आहे,” असे सदाभाऊ खोत यांनी सांगितले.