नवी दिल्ली :– मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने भारताचा कर्णधार रोहित शर्मा व वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यांचे कौतुक केले आहे. ज्या खेळपट्टीवर सुरुवातीला केवळ फलंदाजांना मदत मिळत होती, तीथे बुमराहने अफलातून गोलंदाजी केली. त्यानेच अफगाणिस्तानला रोखले व चार गडी बाद केले. त्यानंतर कर्णधार रोहितने आपला दर्जा सिद्ध करणारी शतकी खेळी केली. दुसऱ्या डावात वातावरण बदललेले असते, चेंडूला मदतही मिळते मात्र, त्यावर टीच्चून खेळत रोहितने शतक फटकावले. अशी प्रत्येक सामन्यात प्रगती होत राहीली तर भारतीय संघाचे विश्वकरंडक विजयाचे स्वप्न निश्चितच पूर्ण होइल, असा विश्वासही सचिनने व्यक्त केला.
दरम्यान, बुधवारी झालेल्या सामन्यात टीम इंडियाने अफगाणिस्तानचा आठ गडी राखून पराभव केला. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 8 गडी गमावून 272 धावा केल्या. कर्णधार हशमतुल्ला शाहिदीने 80 धावांची तर अजमतुल्ला उमरझाईने 62 धावांची खेळी खेळली. प्रत्युत्तरात भारताने 35 षटकांत दोन गडी गमावून लक्ष्य गाठले. भारताकडून जसप्रीत बुमराहने 10 षटकांत 39 धावा देत सर्वाधिक 4 गडी बाद केले. बुमराह याने इब्राहिम झद्रान,मोहम्मद नबी,नजीबुल्ला झदरन आणि रशीद खान यांना बाद करत महत्वपूर्ण योगदान दिले.
कर्णधार रोहित शर्माने 84 चेंडूत 16 चौकार आणि पाच षटकारांच्या मदतीने 131 धावांची खेळी केली. या खेळीसाठी रोहितला सामनावीर म्हणूनही गौरविण्यात आले. तर विराट कोहली 56 चेंडूत 55 धावा करून नाबाद राहिला. त्याने 35व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर चौकार मारून टीम इंडियाला विजय मिळवून दिला. भारताचा पुढचा सामना आता 14 ऑक्टोबरला अहमदाबादमध्ये पाकिस्तानशी होणार आहे.