जयपूर – मोदी सरकारच्या काळात देशाच्या अर्थकारणाची पुरती वाट लागली असून त्याचा फटका देशातील युवक व सर्वसामान्य नागरिकांना बसला असल्याची जी टीका कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली आहे. ती अतिशय रास्त असून गेल्या काही दिवसांतच देशातील दोन कोटी दहा लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या असल्याचा अधिकृत अहवाल आला आहे.
कामगारांचे पगार कापले जात असून मोठ्या प्रमाणावर कंपन्या बंद पडत चालल्या आहेत. त्यातच चीनने भारताचा भूभागही बळकावला आहे. ही सारी भीषण स्थिती असल्याचे नमूद करीत सचिन पायलट यांनी मोदी सरकारवर प्रथमच जाहीर निशाणा साधला आहे. राजस्थान विधानसभेत आपल्याच सरकारच्या विरोधात बंड करून भाजपच्या गोटात जाण्याच्या तयारीत असलेल्या पायलट यांनी आपली बंडाची तलवार मान्य करून पुन्हा कॉंग्रेस मध्येच राहण्याचा निर्णय घेतला त्यानंतर प्रथमच त्यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.
ते म्हणाले की, सीमेवर निर्माण झालेला तणाव आणि देशापुढील महत्त्वाच्या विषयावरून लोकांचे लक्ष अन्यत्र वळवण्यासाठी सध्या देशात भलत्याच विषयांची चर्चा पुढे केली जात आहे. चीनच्या संबंधात सरकारने काही कारवाई केली तर संपूर्ण देश सरकारच्या पाठीशी उभा राहील, असे वक्तव्यही त्यांनी केले.