जुन्नर -एखाद्या चित्रपटात फ्लॅशबॅक दाखवतात, त्याचप्रमाणे आपले आयुष्य वीस ते पंचवीस वर्ष मागे गेल्यासारखी सध्याची परिस्थिती आहे. करोना संचारबंदीत नागरिकांना आपले जुने दिवस-बालपण आठवत आहे. सध्या टीव्हीवर रिऍलिटी शो, डेली सोप्सची जागा रामायण, महाभारत, बुनियाद आदी जुन्या मालिकांनी घेतली आहे.
सर्व कुटुंब एकत्र बसून टीव्हीवर या मालिकांचा आनंद घेऊ लागली आहेत. “डोमिनो’ज, पिझ्झा हट, मॅकडॉनल्स, चायनीज फूड आदींची जागा आता घरातल्या विविध पौष्टिक पदार्थांनी घेतली आहे. कोल्डड्रिंक्सची जागा हळदीच्या दुधाने, काढ्याने घेतली आहे. व्हिडिओ गेम्स, मोबाइल गेम्स, पब्जी आदी खेळांमधील युवा पिढीचा पगडा कमी होऊन कॅरम, बुद्धिबळ, सापशिडी, व्यापार, पत्ते आदी जुन्या इनडोअर गेम्स खेळल्या जात आहेत.
बालवाडीपासूनच्या सर्व मित्रमैत्रिणींशी घरातूनच का होईना. पण बोलणं सुरू झाले आहे. जुन्या शाळा-कॉलेजच्या आठवणींना उजाळा मिळत आहे. मोबाइल-इंटरनेट विश्वाच्या बाहेर येऊन घरच्यांशी मनमुराद गप्पा होऊ लागल्या आहेत. पूर्वीसारखेच आताही सहपरिवार एकत्र येऊन सकाळी-संध्याकाळी जेवण करू लागली आहेत. त्या काळात मोलकरीणी नसल्याने घराची सफाई सर्वांनी मिळून केली जायची, तशीच आताही होऊ लागली आहे.
बाहेरून आल्यावर अंगणात हात-पाय धुतल्यावर घरात प्रवेश करायचे. तसेच आजही सांगितले जात आहे. जुन्या काळाप्रमाणेच आताही रस्त्यावर धावणाऱ्या गाड्या कमी झाल्या आहेत. चिमण्यांचा किलबिलाट ऐकू येत आहे. त्याकाळात कामानिमित्त गावाबाहेर जाणाऱ्यांना कधी एकदा गावाला जातो, असं वाटायचं आणि आजही तेच घडले आहे.
शहरीबाबू हजारोंच्या संख्येने गावाकडे परतले आहेत. ते आता जमिनीवर आले असून शहरी थाटातील हस्तांदोलन विसरून लांबून नमस्कार करीत आहेत. घरात सकाळ-संध्याकाळ दिवा, अगरबत्ती लावली जात आहेत. आजी-आजोबांकडून लहानांना शुभंकरोती, मनाचे श्लोक, अकबर-बिरबलाच्या गोष्टी आदी ऐकावयास मिळत आहेत.