विनाकारण फिरणे पडले महागात; दुचाकीचालकांचे लायसेन्स होणार रद्द
नगर – करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशासह जिल्ह्यात संचार बंदी असतांनाही काही नागरिक विनाकारन रस्त्यवर फिरत असल्याने पोलीस प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारत आज सकाळपासून पोलीस प्रशासनाने जिल्ह्यात दोन हजार जणांवर कारवाई करून त्यांची वाहने जप्त केली आहेत. तसेच त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत. 500 दुचाकी, चारचाकी वाहनचालकांवर तोफखाना, कोतवाली, भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्वच पोलीस ठाण्यांच्या हद्दीत आज सकाळपासून ही कारवाई करण्यात आली. तसेच शहरात शहर पोलीस उपविभागीय अधिकारी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली तोफखना, कोतवाली, भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीत विनाकारण फिरणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात आली. शहरात डीएसपी चौक, प्रोफेसर चौक, चितळे रोड, पत्रकार चौक, भिस्तबाग चौक, बालिकाश्रम रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली.
गेल्या काही दिवसांपासून करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरात सर्वत्रच लॉकडाऊन करण्यात आले आहे. मात्र काही समाजकंटक विनाकारण रस्त्यावर फिरत असल्याचे पोलीस प्रशासनाच्या लक्षात आल्याने त्यांनी आज सकाळपासूनच कडक भूमिका घेत विविध चौकांत थांबून विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई केली. तसेच त्यांची वाहने जप्त करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
तसेच त्यांचे वाहनपरवाना रद्द करण्याचे प्रस्ताव ही तयार करण्यात येणार असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी मिटके यांनी सागितले. कोतवाली पोलिसांनी 150, तोफखाना पोलिसांनी 250, तर भिंगार कॅम्प पोलिसांनी 110 दुचाक्या जप्त केल्या आहेत.
…तर कडक कारवाई करणार : मिटके
करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे. विनाकारण नागरिकांनी बाहेर पडू नये, पडल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. त्यांची वाहनेही जप्त केले जाणार आहेत, असा इशारा पोलीस उपविभागीय अधिकारी संदीप मिटके यांनी दिला आहे.
सोशल मीडियावर अफवा पसरविणाऱ्यांवर होणार कारवाई
करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्यासाठी पोलीस प्रशासन दिवस-रात्र काम करत आहे. मात्र, सोशल मीडियावर काही जण अफवा पसरवित आहेत. दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करत आहेत. त्यामुळे पोलिसांनी आता अशा व्यक्तींकडे लक्ष केंद्रित केले असून, अफवा पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे, असे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.