15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सध्या सुरू आहे. या दिवशी मोठ्या अभिमानाने घराघरांवर, इमारतींवर, शासकीय, निमशासकीय कार्यालयांवर फडकणारा आपला तिरंगा ध्वज पाहिला की आपले मन देशाभिमानाने भरुन येते. कळत-नकळत आपल्या ओठी “विजयी विश्व तिरंगा प्यारा, झॅंडा उँचा रहे हमारा’ हे बोल येतात आणि आपण राष्ट्रध्वजाला सलामी देतो. तिरंग्याचा सन्मान चित्रपटांतूनही केलेला दिसतो. चित्रपटाचा नायक हा प्रसंगी प्राणाची आहूती देऊन तिरंग्याची शान राखतो, असे वर्णन चित्रपटात असते. तसेच या तिरंग्याची महती सांगणारी गीतेही आहेत.
तिरंगा
सिनेमा केवळ मनोरंजनाचे माध्यम नसून ते प्रबोधन करण्याचे देखील महत्त्वाचे साधन आहे. सिनेमाद्वारे जनसामान्यांपर्यंत संदेश सहजतेने पोहोचविता येतो हे बऱ्याच वेळा सिद्ध झालेले आहे. मनोरंजनात्मक चित्रपटांसोबतच प्रबोधनात्मक चित्रपटांची निर्मिती देखील आपल्याकडे झालेली आहे. त्यातील देशभक्तिपर चित्रपटांतून तर आपल्या देशाचे आणि तिरंग्याचे वर्णन पाहतांना निश्चितपणे आपला देशाभिमान जागृत होतो. त्यासाठी प्रसंग आणि गीत, संगीतही कारणीभूत ठरते. आता हेच पाहा ना नाना पाटेकर यांचा “तिरंगा’ हा चित्रपट. चित्रपटाचे कथानक, प्रसंग काहीही असो पण यातील मोहम्मद अजीज यांच्या आवाजातील “ये आन तिरंगा है, ये शान तिरंगा है, मेरी जान तिरंगा है, मेरी जान तिरंगा है’ हे गीत ऐकताना, पाहताना भारतीय असल्याचा अभिमान वाटतो. गीतकार संतोष आनंद यांची दमदार शब्दरचना आणि लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचे संगीत धमालच.
फरिश्ते
रजनीकांत, धर्मेंद्र, विनोद खन्ना, जयाप्रदा, श्रीदेवी, सदाशिव अमरापूरकर, स्वप्ना आदी कलावंत असलेल्या 1991 यावर्षी प्रदर्शित झालेल्या फरिश्ते चित्रपटातील शब्बीर कुमार यांनी गायलेले “झॅंडा उँचा रहे हमारा…विजयी विश्व तिरंगा प्यारा’ हे गीतही आपल्या तिरंगी ध्वजाचा सन्मान करणारे असे आहे. रजनीकांत, स्वप्ना, श्रीदेवी व इतर कलावंतांवर चित्रीत या गीतात सर्वांच्या हाती तिरंगा ध्वज दाखवून देशभक्तीचे वातावरण निर्माण करण्यात दिग्दर्शक अनिल शर्मा यशस्वी झालेले आहेत. गीतकार शामल गुप्ता प्रसाद यांनीही गीतरचना उत्तम केली असून बप्पीदांचे साजेशे संगीत याला लाभले आहे. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी ध्वजारोहण करुन तिरंग्याला सलामी देणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला त्या भागातील दहशतवाद माजविणारा एक गुंड मारतो पण तो पोलीस अधिकारी आपल्या प्राणाची आहुती देऊन आपल्या तिरंग्याची शान राखतो असे काहीसे सिच्युऐशन. रजनीकांत यांनी पाहुणा कलावंत म्हणून केलेली ही भूमिका प्रेक्षकांना आवडली.
दिलजले
या 1996 यावर्षी प्रदर्शित झालेल्या अजय देवगण अभिनीत चित्रपटात देखील भारतीय तिरंग्याचे व देशाचे वर्णन करणारे अतिशय सुरेख असे गीत आहे. झेंडावंदनाचा प्रसंग निळ्या आकाशात फडफडणारा आपला तिरंगा ध्वज आणि त्याच्या सोबत उडणारे शांतीचे प्रतीक असणारे शांतीदूत कबूतर असा प्रसंग. तर “मेरा मुल्ख मेरा देश मेरा ए वतन, शांती का उन्नती का प्यार का चमन’ हे गीताचे बोल. एक गंभीर व भावपूर्ण असे देशभक्तीचे वातावरण. अशी सिच्युऐशन असलेले हे गीत कुमार सानू व आदित्य नारायण यांच्या आवाजात आहे. गीतकार जावेद अख्तरजींनी अतिशय उत्तम दर्जाची शब्दरचना या गीताच्या रूपाने दिली आहे. तर अन्नु मालिक यांनी संगीतबद्ध करताना त्यास आगळावेगळा साज चढविलेला असल्याने हे गीत मनास व हृदयास भिडते.
दस
वाघा बॉर्डरवरील रिट्रिट समारंभासाठी हजारो भारतीय दररोज उपस्थित राहतात आणि आपल्या तिरंग्याला सलामी देतात. त्या ठिकाणी हजारोंच्या मुखातून गायले जाणारे, आपल्या देशाची महती सांगणारे जोशपूर्ण गीत म्हणजे “सुनो गौर से दुनियावाले, बुरी नजर ना हम पे डाले, चाहे जितना जोर लगा लो, सबसे आगे होगे हिंदुस्तानी’ हे मी स्वानुभवावरून सांगतो. 1997 यावर्षी प्रदर्शित झालेल्या दस या मुकूल आनंद यांच्या चित्रपटातील हे गीत आहे. उदित नारायण, शंकर महादेवन, महालक्ष्मी अय्यर यांनी या गीताला अत्यंत जोशपूर्ण असे गायल्याने हे गीत ऐकताना व पाहताना देखील आपण त्यात सहभागी होतो. वाघा बॉर्डरवर तर या गीताच्या वेळी होणारा भारतीयांचा जल्लोश अवर्णनीयच. शंकर एहसान लॉय यांनी अतिशय तालबद्ध रितीने या गीताला संगीत दिलेले आहे. तर गीतकार समीर यांचे शब्दही देशभक्तीचे रोमांच उभे करणारे आहेत. त्यामुळे या गीताची अनुभूती पाहून, ऐकून तर होतेच पण वाघा बॉर्डरवर एकदा जायलाच हवे.
परदेस
शोमॅन सुभाष घई यांनीही आपल्या चित्रपटातून देशभक्तीपर अथवा त्या प्रकारची गाणी दिलेली आहेत. कर्मा या चित्रपटातील गाणे सर्वांना परिचित असे लोकप्रिय आहे. त्यांचा 1997 यावर्षी प्रदर्शित झालेला परदेस हा एक छान चित्रपट. या चित्रपटातील आदित्य नारायण, हरिहरण, कविता कृष्णमुर्ती, शंकर महादेवन यांनी गायलेले “ये दुनिया एक दुल्हन, दुल्हन के माथे की बिंदीया, ये मेरा इंडिया, आय लव्ह माय इंडिया’ हे एक आपल्या देशाचे सुरेख वर्णन करणारे गीत आहे. अमरिश पुरी, महिमा चौधरी व इतर बाल कलाकारांवर चित्रीत झालेले हे गीत पहातांना निश्चितपणे आपल्याला आनंद मिळतो. गीतकार आनंद बक्षी यांनी केलेले देशाचे वर्णन पहिल्या वाक्यातून सुस्पष्ट असे होते. ते म्हणतात की, हे जग जर दुल्हन असेल तर आमचा भारत त्या दुल्हनच्या कपाळावरील बिंदीया आहे. संगीकार नदीम श्रवण यांनीही या गाण्याला उत्तम चाल दिली तर अमरिश पुरींचा उत्साहपूर्वक अभिनय पाहून आनंद मिळतो.
दिवार
महानायक अमिताभ बच्चन यांचा दिवार (जुना) हा लोकप्रिय चित्रपट. याच नावाने 2004 यावर्षी दिग्दर्शक मिलन लुथरिया यांनी भारत व पाकिस्तान युद्धकैद्यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारा अतिशय उत्तम असा चित्रपट निर्माण केला. यातही अमिताभ बच्चन यांनी प्रमुख भूमिका केली. या चित्रपटातील “लेके आई है हवाये ये इशारा, चलिये वे चलिये वतन मेरे यारा, वंदे मातरम, वंदे मातरम’ हे उदित नारायण यांनी गायलेले गीत जोशपूर्ण असे आहे. पाकिस्तानच्या जेलमध्ये बंदी असलेले भारतीय जवान आपल्या मेजरसोबत एक आनंदाचा संदेश मिळाल्यानंतर हे गीत गातात, अशी काहिशी सिच्युऐशन. या गीताचे गीतकार नुसरत तर संगीतकार आदेश श्रीवास्तव हे आहेत.
बोस, द फॉरगॉटन हिरो
भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये ज्या महान सेनानींनी आपले योगदान दिले त्यातील एक महत्त्वाचे नाव म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस. त्यांच्या जीवनावर ज्येष्ठ दिग्दर्शक श्याम बेनेगल यांनी 2005 यावर्षी बोस, द फॉरगॉटन हिरो या चित्रपटाची निर्मिती केली. मराठी कलावंत सचिन खेडेकर यांनी या चित्रपटात नेताजी सुभाषचंद्र बोस ही मध्यवर्ती भूमिका अतिशय समर्थपणे साकारली. या चित्रपटात देशाभिमान जागविणारे “कदम कदम बढाऐ जा, खुशी के गीत गाये जा, ये जिंदगी है कौम की, तू कौम पे लुटाये जा’, हे गीत आहे. गायक विजय प्रकाश यांनी हे गीत गायले असून संगीतकार ए. आर. रहेमान आहे. स्वातंत्र्य लढ्यासाठी नेताजींनी केलेल्या कार्याचे यथार्थ दर्शन दाखविण्यासाठी या गीताचा सुंदर वापर करण्यात आलेला आहे. हे गीत पाहून याची प्रचिती येऊ शकते.
इंडियन
धर्मेंद्र सुपुत्र असलेला डॅशिंग पोलादी हिरो म्हणून सनी देओलकडे पाहिले जाते. सनी देओलने देखील देशभक्तीचे महत्त्व दर्शविणारे बरेच चित्रपट केले. बॉर्डर, मॉं तुझे सलाम, गदर एक प्रेम कहाणी, सोबतच 2001 यावर्षी इंडियन हा एक जबरदस्त चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे टायटल गीत खूप सुरेख असे आहे, “वतन वालो वतन ना बेच देना, ये धरती ये गगन ना बेच देना’ हे त्या गीताचे बोल. आनंद बक्षी यांनी हे गीत लिहिले असून आनंदराज आनंद यांच्या संगीतात रुप कुमार राठोड यांनी गायले आहे. मॉं तुझे सलाम… हे टायटल सॉंग असल्याने स्वातंत्र्यलढ्यातील अनेक घटना आपणास या गीतात पहावयास मिळतात. हे गीत ऐकताना व पाहताना देशभक्तीने आपले मन भरून येते असे आहे.
हिंदुस्तान की कसम
अजय देवगणचा डबल रोल असलेला विरु देवगण दिग्दर्शित हिंदुस्तान की कसम हा चित्रपट 1999 यावर्षी प्रदर्शित झाला होता. यात महानायक अमिताभ बच्चन यांची महत्त्वाची भूमिका आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन, नवीन निश्चल, प्रेम चोप्रा, यांच्यावर चित्रीत झालेले ऐ वतन ऐ वतन, जान-ए-जा-जान-ए-मन ये समा, ये बहार, दिल फिदा जा निसार, जलवा तेरा जलवा जलवा, ओ तेरा जलवा जलवा, हे सुरेख गीत आहे. देशाच्या रक्षणार्थ तैनात असलेले सैनिक आपल्या कुटुंबासमवेत स्नेहमिलन कार्यक्रमात भारतमातेची महती सांगतात, अशी या गीताची सिच्युऐशन. गायक जसपिंदर नरुला, सुखविंदर सिंग, उदित नारायण तर गीतकार आनंद बक्षी. संगीतकार सुखविंदर सिंग यांनी खूप सुरेख संगीत दिल्याने हे गीत ऐकावयास व पाहवयास छान वाटते व देशभक्ती जागृत होते.
या खेरीज सारे जहॉं से अच्छा, हिंदोस्ता हमारा, ऐ मेरे वतन के लोगो, कर चले हम फिदा, ये देश है वीर जवानो का, जहॉं डाल डाल पर सोने की चिडिया, मेरे देश की धरती, अपनी आजादी को हम हरगीज मिटा सकते नही, भारत हमको जान से प्यारा है, हर करम अपना करेंगे ऐ वतन तेरे लिए, मेरा रंग दे बसंती चोला ही गाणी देखील देशभक्तिपर गीत म्हणून लोकप्रिय आहेत. प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्यदिन अशा राष्ट्रीय सणांच्या दिवशी हमखासपणे ही गीते सर्वत्र वाजवून संपूर्ण देशभरात देशभक्तीपर वातावरण निर्माण करण्यात येते आणि आपण सर्व भारतीय आपल्या अभिमानाचा, सन्मानाचा असलेल्या तिरंग्यास सलामी देतो.
डॉ. राजू पाटोदकर