प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 14 -स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली “आजादी गौरव पदयात्रा’ काढण्यात आली.ही रॅली कॅपिटल थिएटर, कॅम्प ते लोकमान्य टिळक, मंडईपर्यंत काढण्यात आली.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश महिला कॉंग्रेसच्या अध्यक्षा संध्या सव्वालाखे, आमदार संग्राम थोपटे, संजय जगताप, प्रदेश उपाध्यक्ष रमेश बागवे, शहराध्यक्ष अरविंद शिंदे, उल्हास पवार, मोहन जोशी, ऍड. अभय छाजेड, कमल व्यवहारे, बाळासाहेब शिवरकर, वीरेंद्र किराड, संजय बालगुडे, आबा बागुल, अजित दरेकर, चंदूशेठ कदम, अविनाश बागवे, रवींद्र धंगेकर, रफिक शेख, लता राजगुरू, सुजाता शेट्टी, बाळासाहेब मारणे, दीप्ती चवधरी, संगीता तिवारी, रजनी त्रिभुवन, संगीता पवार, बाळासाहेब दाभेकर, मुख्तार शेख, मंजूर शेख, अनिल सोंडकर आदींसह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भाजपकडून तिरंग्याचा अवमान ः पटोले
कॉंग्रेसच्या काळामध्ये प्रत्येकाच्या मनात तिरंगा अभिमानाने डौलत होता. आता जाती धर्माचे तेढ निर्माण करून तिरंगा आपल्या घरावर लावावा म्हणून सांगितले जात आहे. भारतीय जनता पक्ष मात्र “हर घर तिरंगा’ अभियानाच्या माध्यमातून तिरंगा झेंड्याचा अवमान करत आहे. चीनमधून हे झेंडे आयात करण्यात आलेले आहेत. या झेंड्याचा आकार व्यवस्थित नाही, चक्र व्यवस्थित नाही. भाजपने तिरंग्याचा कधीच सन्मान केला नाही, त्याला ठेच पोहचवण्याचे काम केले. भाजपाला तिरंग्याचे महत्व माहीत नसावे. तिरंगा देशाची शान आहे, करोडो भारतीयांची प्रेरणा आहे. पण भाजपाने त्याचा बाजार मांडला आहे. तिरंग्याचा कोणीही अवमान करू नका, असे नाना पटोले यांनी स्पष्ट केले आहे.