हल्लीचे युग हे स्पर्धेचे युग मानले जाते. प्रत्येकाला पुढे जायचं आहे. कोणाच्या तरी पुढे. ही स्पर्धा सुरू आहे ती भौतिक गरजा पूर्ण करून आत्मसमाधान मिळविण्याची. परंतु हे आत्मसमाधान मिळणे तितके सोपे राहिले नाही. कारण ताणतणाव नामक पंचाक्षरीने मानवी जीवनाचा पोतच बिघडवून टाकला आहे. आजची, रोजची आणि भविष्याची नाहक चिंता तणाव वाढीला खतपाणी घालत आहे. यातून कुटुंबातील सुख हरवले असून ते मिळविण्याच्या रम्यस्वप्नाने माणूस पुन्हा धावत आहे.
कुटुंबातील आनंदाची, जिव्हाळ्याची जागा राग, चिडचिड आणि ताणतणावाने घेतली आहे. म्हणूनच आजच्या जगात समाधानाने जगण्यासाठी ताणतणावाचे व्यवस्थापन आपल्याला करावे लागणार आहे. ताणतणाव हा नैसर्गिक नाही तर मानवनिर्मित आहे. वाढत्या अपेक्षांतून मानव आपल्या आयुष्यात याची आयात करीत आहे. हा आयात केलेला ताणतणाव निर्यात करण्याची कला माणसाला अवगत असायला हवी. तरच यातून सुखी, समाधानी आणि आनंदी कुटुंबाची स्वप्ने खऱ्या अर्थाने साकार होणार आहेत.
याबाबत एक गोष्ट खूपच उद्बोधक आहे. एका उच्चभ्रू वस्तीत एक हर्षद नामक तरुण आपल्या कुटुंबासह राहायचा. तो एका कंपनीत सेल्स मॅनेजर म्हणून कामाला होता. त्यामुळे तो सकाळी लवकर जाऊन रात्री उशिरा घरी येत असे. एकदा काही चोरट्यांनी हर्षदच्या घरी चोरी करण्याचे ठरवले. चोरीच्या दोन-चार दिवस आधीपासून ते त्याच्या घराभोवती फिरून त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवू लागले.
एके दिवशी चोरट्यांनी एक विचित्र गोष्ट पाहिली. संध्याकाळी हर्षद घरी परतल्यावर घरात शिरण्यापूर्वी दारासमोरील एका झाडाजवळ जाऊन उभा राहिला. त्यानंतर त्याने आपल्या पिशवीतून एक एक करून काहीतरी काढून झाडात कुठेतरी ठेवले. मात्र अंधार असल्याने त्याने नेमके काय बाहेर काढले आणि कुठे ठेवले हे चोरांना समजले नाही.
चोरांचे डोळे चमकले. हर्षदने तेथे काही मौल्यवान वस्तू किंवा पैसे लपवले असावेत अशी त्यांची खात्री झाली. मध्यरात्री सर्वजण गाढ झोपेत असताना चोरटे त्या दारासमोरील मोठ्या झाडापाशी आले आणि शोधाशोध करू लागले. खूप शोधाशोध करूनही त्यांना तिथे काहीच मिळाले नाही. शेवटी हार पत्करून चोर निघून गेले. दुसऱ्या दिवशी ते पुन्हा लपून बसले आणि हर्षदच्या ऑफिसमधून परत येण्याची वाट पाहू लागले.
नेहमीप्रमाणे हर्षद पुन्हा उशिरा घरी आला. आजही घरात शिरण्यापूर्वी त्याच झाडाजवळ जाऊन बॅगेतून काही वस्तू काढून त्यात ठेवल्या. सर्वजण झोपी गेल्यानंतर पुन्हा एकदा चोरटे झाडाजवळ गेले आणि मनापासून शोधू लागले. मात्र आजही त्यांच्या हाती काहीच लागले नाही. चोर पुरते चक्रावले. चोरीपेक्षाही त्याच्या या कृतीचे रहस्य जाणण्याची उत्सुकता त्यांना लागली. दुसऱ्या दिवशी ते थेट त्याला रस्त्यात भेटले. त्यातील एकजण म्हणाला, “साहेब, बघा, वाईट वाटू नका… खरं तर आम्ही चोर आहोत! आम्ही अनेक दिवसांपासून तुमच्या घरात चोरीचा बेत करतोय. पण तुम्ही त्या झाडापाशी काय लपवत आहात हे आम्हाला खूप प्रयत्न करूनही समजले नाही. गेल्या दोन रात्री आम्ही झोपलो नाही आणि त्या वस्तू शोधून काढायचा प्रयत्न केला. पण आता आम्ही ते सोडून दिले आहे. कृपया आम्हाला या झाडाचे रहस्य सांगा!’
ते ऐकून हर्षद मोठ्याने हसला आणि सांगू लागला, “अरे भाऊ! मी तिथे काहीही लपवत नाही! मी खासगी कंपनीत सेल्समध्ये नोकरीस आहे. माझ्या कामाचा इतका ताण आहे, की तुम्ही कल्पनाही करू शकत नाही! रोज मला संतप्त ग्राहकाचे टोमणे सहन करावे लागतात. दररोज बॉस ओरडतात आणि ऑफिसचे राजकारणही त्रास देते. या सर्व नकारात्मक गोष्टींचा माझ्या प्रिय मुलांवर आणि कुटुंबावर परिणाम होऊ नये असे मला वाटते! म्हणून जेव्हा मी संध्याकाळी या सर्व गोष्टी घेऊन परत येतो तेव्हा घरात प्रवेश करण्यापूर्वी या झाडाला मी एक एक करून लटकवतो. आश्चर्याची गोष्ट म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा मी या झाडावरून या वस्तू उचलतो. तेव्हा अर्धे आधीच गायब झालेले असतात, म्हणजेच मी त्यांना विसरतोसुद्धा. आणि जे उरले आहे ते मी माझ्यासोबत घेतो आणि ते कमी करण्याचा प्रयत्न करतो.’
चोरांना त्या झाडाचे रहस्य समजले होते. चोरी करण्यात त्यांना यश आले नाही, पण आज ते एक मोठा धडा घेऊन घरी परतत होते.
आजच्या या ताणतणावाच्या काळात आपल्याकडेही एक असे तणावमुक्तीचे झाड असायला हवे. मग ते मेडिटेशन, योग, प्राणायाम, छंद, सकारात्मकता असे कोणत्याही स्वरूपात असो. ऑफिसला ऑफिसमध्येच ठेवा, घरी आणू नका! तणावमुक्तीच्या झाडाच्या सावलीने कुटुंबात आनंदाची उधळण करा. आयुष्य खूप सुंदर आहे ते मनमुरादपणे आणि आनंदाने जगा. रोजरोजच्या निराशेचा आता न लागो ठाव, घरामध्ये जाताना बाहेर लटकवा तो ताणतणाव
– सागर ननावरे