राजेंद्र भुजबळ
शिर्डी – काका, आमच्या गावात कोणतीही एसटी बस थांबत नाही. कॉलेजला जाण्यासाठी वेळेचं बंधन आम्हाला पाळावे लागते. त्यासाठी खासगी वाहनातून दाटीवाटीत बसून आम्हाला प्रवास करावा लागतो, कधी वेळेवर वाहन न आल्याने कधी कॉलेजला तर कधी घरी येण्यासाठी उशीर होतो आणि त्यामुळे आमच्या आई बाबांचा जीव भांड्यात पडतो! पण काय करणार कारण आमच्या व्यथा कोणी ऐकूनच घेत नाही, असे सांगून विद्यार्थ्यांनी भावनांना अश्रूंसोबत वाट मोकळी करून दिली.
एकीकडे शिंदे सरकारने महिलांसाठी एसटी प्रवासात पन्नास टक्के सूट दिली, तर दुसरीकडे देशाचं भविष्य असणारे तरुण विद्यार्थ्यांची कुचंबणा एसटी महामंडळ कशी करत आहे याचे उदाहरण शिर्डी मतदारसंघातील सावळीविहिर, तीनचारी या गावातील विद्यार्थ्यांचे हाल बघितल्यावर समजते. उच्च शिक्षणासाठी शेतकऱ्यांचे, हातावर पोट भरणाऱ्या गरिबांच्या कुटुंबातील मुले-मुली कोपरगाव येथे सौमया कॉलेज व एस. एस. जी. एम. कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन शिक्षण घेत आहेत. सध्याच्या महागाईच्या काळात दररोज खासगी प्रवास भाडे त्यांना परवडत नाही. पालकांनी पोटाला चिमटा घेऊन आपल्या मुलामुलीचं मोठा अधिकारी होण्याचं स्वप्न उराशी बाळगून ते हा आर्थिक बोजा सहन करत आहे. याकडे मतदारसंघातील कोणताही स्थानिक नेता, सरपंच, सामाजिक संघटना यांचे लक्ष नसल्याने विद्यार्थ्यांना नाहक आर्थिक बोजा सहन करावा लागत आहे.
हे वास्तव पाहून शिर्डीच्या एसटी कार्यालयात फोन केला, तर तेथील साहेब म्हणाले की, हा कोपरगाव येथील साहेबांच्या अखत्यारीतला विषय आहे.म्हणून त्यांनाही फोन केला तर नेहमीप्रमाणे फोन बंद होता. वास्तविक जिल्ह्यातील शिर्डीतील साईसमाधी मंदिरामुळे एसटी महामंडळाला मोठा फायदा होतो. मात्र, शिर्डीसारख्या आंतरराष्ट्रीय तीर्थस्थळी एसटी डेपोसाठी आरक्षित जागा असूनही फक्त कोपरगाव डेपोला आर्थिक फायदा व्हावा या उद्देशाने डेपो होऊ दिला जात नाही.
त्यामुळे इंधनाच्या अतिरिक्त खर्चामुळे कोट्यवधींचे नुकसान होत आहे. याच बसेस जर सावळीविहिर, तीनचारी याठिकाणी थांबल्या, तर विद्यार्थ्यांचे आर्थिक व वेळेचे नुकसान थांबू शकते. त्यासाठी एसटी बसचा थांबा करावा ही कळकळीची मागणी विद्यार्थी करत आहे. एसटी महामंडळाच्या हात दाखवा व गाडी थांबवा या पाट्या नामशेष झाल्या आहेत. मात्र, साईंच्या परिक्षेत्रातील विद्यार्थ्यांना न्याय कोण आणि कधी देणार? हाच महत्त्वाचा प्रश्न उभा ठाकला आहे.
खासगी वाहनांतून शालेय विद्यार्थी प्रवास करताना अपघात होऊन दुर्दैवाने सात जणांचा बळी गेला होता. या घटनेला वर्ष झाले असले, तरी एसटी महामंडळाला अजून किती बळी पाहिजे आहेत? आमच्या गावात एसटी थांबा करा व विद्यार्थ्यांचे जीव वाचवा हीच विनंती.
जयश्री पवार, विद्यार्थिनी, सावळीविहीर