अर्धशतकाहून अधिक काळाचा अभिनयप्रवास करणाऱ्या आणि रंगभूमी, मालिका, सिनेमा असा चौफेर संचार करणाऱ्या जयंत सावरकर (अण्णा) यांचे निधन तमाम मराठी रसिकांना चटका लावून जाणारे आहे. अखिल भारतीय नाट्यसंमेलनाचे बिनविरोध अध्यक्ष झालेल्या अण्णांचा बॅकस्टेज कलावंतापासूनचा प्रवास अचंबित करणारा आहे. रसिकांना आपल्या भूमिकेत गुंतवून ठेवण्याची किमया अण्णांनी गेल्या सहा दशकांच्या रंगभूमीवरील सातत्याच्या वावरातून आणि निरीक्षणातून साधली.
तब्बल 60 वर्षांची अभिनय कारकीर्द असणाऱ्या जयंत सावरकर (अण्णा) यांचे नुकतेच निधन झाले. रंगभूमी, मालिका, सिनेमा असा चौफेर संचार करणाऱ्या अण्णांचा अनुभव खूप दांडगा होता. हिंदी चित्रपटसृष्टीतही त्यांनी आपल्या अभिनयाची छाप पाडली होती. 2016 मध्ये पार पडलेल्या अखिल भारतीय नाट्यसंमेलनाचे ते अध्यक्ष होते. ही निवड त्यांच्या आजवरच्या कारकिर्दीतील मुकुटमणी ठरली. मुळातच, अण्णा हे अभ्यासक होते. माणसे जोडण्याची, त्यांना आपलेसे करण्याची वृत्ती त्यांच्यामध्ये होती. जुन्या जमान्यातील नाटकांपासून ते आजच्या काळातील रंगभूमीपर्यंतच्या सर्व स्थित्यंतरांचे अण्णा साक्षीदार होते. अभिनयाच्या क्षेत्रातील तीन पिढ्यांबरोबर त्यांनी काम केले असल्यामुळे तीनही पिढ्यांच्या अडचणी त्यांना योग्य प्रकारे ज्ञात होती. नाटकात येण्यापूर्वी अण्णा कमानी इंजिनिअरिंग कंपनीमध्ये स्टेनोग्राफर म्हणून काम करत होते. आपण जे करू त्यामध्ये प्रावीण्य मिळालेच पाहिजे, हा त्यांचा सुरुवातीपासून मूलमंत्र होता आणि तो शेवपटपर्यंत त्यांनी जपला होता. जवळपास 12 वर्षे अण्णांनी बॅकस्टेज आर्टिस्ट म्हणून काम केले होते.
हौशी नाट्यसंस्थांमधून त्यांनी सुरुवातीला लहानसहान कामे केली. मुंबई मराठी साहित्य संघात स्वयंसेवक, कार्यकर्ता म्हणूनही अण्णा काही काम करत होते. त्यांनी अनेकदा प्रॉम्टिंग केले, प्रॉपर्टी मांडण्याचे काम केले, पार्श्वसंगीत देखील वाजवले. रंगभूमीवरचे कुठलेही काम त्यांनी वर्ज्य मानले नाही.
बॅकस्टेज कलावंतापासून नाट्यसंमेलनाध्यक्ष बनण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास अचंबित करणारा होता. त्यांची कारकीर्द नुसतीच प्रदीर्घ नव्हती तर त्या कारकिर्दीला लोकाश्रयही लाभला होता. इतका मोठा अभिनयप्रवास असूनही अण्णा नेहमीच साधे राहिले. “मी एक छोटा माणूस’ नावाचे त्यांचे पुस्तकही प्रकाशित झाले होते. कलाकार हा उत्तम माणूस असेल तरच तो उत्तम कलाकार होऊ शकतो, असे अण्णा नेहमी सांगायचे. अत्यंत चतुरस्र असा हा कलावंत होता. पुलंच्या “व्यक्ती आणि वल्ली’ या पुस्तकावर आधारित नाटकात अण्णांनी साकारलेला अंतू बर्वा अनेकांच्या आजही स्मरणात असेल.
मला आठवतंय, अखिल भारतीय नाट्यसंमेलनाचा संमेलनाध्यक्ष होण्याबाबतही अण्णांची काही मते होती. बिनविरोध निवड झाली तरच मी अध्यक्ष होईन, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली होती. ती तशीच पूर्ण झाल्याचे अण्णांना समाधान होते. अण्णांची अनुभवसंपन्नता आणि अभ्यासूवृत्ती यामुळे संमेलनाध्यक्ष बनल्यानंतर त्यांना काही भूमिका घ्यायच्या होत्या; परंतु त्यावेळचे संमेलन तीन-चार महिने पुढे गेल्यामुळे त्यांच्या हाती सात-आठ महिन्यांचा काळ राहिला. संमेलनाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर बोलताना अण्णांनी “अध्यक्षपदाचा कार्यकाळ कमी असला तरी योग्य व्हिजन असेल तर कामे नक्कीच पूर्ण करता येतात’ असे मत नोंदवले होते. त्यातून रंगभूमीसाठी बरंच काही करण्याची त्यांची तळमळ दिसून आली. अण्णांनी तीन पिढ्यांबरोबर काम केले असल्यामुळे नाट्यसृष्टीच्या, कलावंतांच्या सर्व प्रश्नांची जाणीव त्यांना होती. आम्ही खूप वर्षे एकत्र काम केले आहे. या काळात त्यांच्या बोलण्यातून अण्णांना या प्रश्नांची जाणीव आणि कणव असल्याचे मी अनुभवले होते.
वयाच्या विसाव्या वर्षीपासून अण्णांची अभिनयाची कारकीर्द सुरू झाली आणि सहा दशकांच्या या प्रवासात अण्णांनी 100 पेक्षा जास्त मराठी चित्रपट आणि नाटकांमध्ये काम केले. हिंदी चित्रपट आणि मलिकांमध्येही आपला वेगळा ठसा उमटला. विशेष म्हणजे, त्यांच्या नाटकात जाण्याला घरच्यांचा विरोध होता. मध्यमवर्गीय सामान्य कुटुंबातले असल्याने मध्यमवर्गीय विचारसरणीनुसारच जीवनक्रम असावे, असे त्यांच्या घरच्यांना वाटत होते. यावर उपाय म्हणून अण्णांनी नियमितपणे नोकरीही केली आणि उर्वरित वेळ नाटकांसाठी घालवू लागले. त्याकाळात रंगभूमीविषयक काम करणारी सर्वच माणसे व्यासंगी, उच्चशिक्षित होती. त्याचा त्यांना फायदा झाला असल्याचे ते सांगत. त्या सर्वांच्या सहवासातून मी शिकत गेलो असल्याचे प्रांजळपणाने सांगताना त्यांची जीभ कधी अडखळली नाही.
इना मिना डिका, कुरुक्षेत्र, गुलाम-ए-मुस्तफा, तेरा मेरा साथ रहें, प्रतिसाद : द रिस्पॉन्स, बडे दिलवाला, युगपुरुष, रॉकी हॅन्डसम, लव्ह का तडका, वास्तव : द रिलिटी, सिंघम आदी हिंदी चित्रपटांतील त्यांच्या भूमिका उल्लेखनीय राहिल्या. अलीकडच्या काळातील उदाहरणे सांगायची झाल्यास “समांतर’ या सुहास शिरवाळकरांच्या कादंबरीवर आधारित वेबसिरीजमध्ये त्यांनी एका ज्योतिषाची भूमिका केली होती. याखेरीज “अपराध मीच केला’, “अपूर्णांक’, “आम्ही जगतो बेफाम’, “एकच प्याला’, “लग्नाची बेडी’, “व्यक्ती आणि वल्ली’, “सूर्यास्त’, “सूर्याची पिल्ले’ अशा एकाहून एक गाजलेल्या नाटकांमधील त्यांच्या भूमिकाही प्रेक्षकांची दाद मिळवून गेल्या. “एकच प्याला’ हे राम गणेश गडकरी यांचं गाजलेलं नाटक 1918 मध्ये पहिल्यांदा रंगभूमीवर आले. त्या नाटकात “तळीराम’ची भूमिका अण्णांच्या आधी कितीतरी दिग्गजांनी साकारली. पण तरीही त्यांची भूमिका सर्वाधिक पसंती मिळवून गेली. जुन्या काळातील अनेक नाटकांमधून त्यांनी काम केले. “सौजन्याची ऐशी-तैशी’मधली मंडलेकर नावाची भूमिकाही अण्णांनी गाजवली.
“शारदा’, “मृच्छकटिका’, “एकच प्याला’, “भावबंध’, “राजसंन्यास’, “प्रेमसंन्यास’ या जुन्या नाटकांमध्येही त्यांनी काम केले. विशेष म्हणजे, या सगळ्या भूमिका करताना आधीच्या कलाकारांकडून काय घेता येईल, हे आपण पाहिल्याचे आणि त्यातून काही ना काही शिकल्याचे ते सांगत. “तुझं आहे तुजपाशी’ हे नाटक 1957 मध्ये रंगभूमीवर आले तेव्हा “अण्णा’ या नाटकासाठी बॅकस्टेजला काम करत होते. मी या नाटकात काम करीन, तर श्यामचीच भूमिका करीन, असे ठरवले होते. अखेरीस त्यांना श्यामचीच व्यक्तिरेखा मिळाली आणि 700-800 प्रयोगांमध्ये त्यांनी हा श्याम स्टेजवर साकारला. पुढे याच नाटकात आचार्यांची भूमिकाही त्यांनी केली.
संवादफेक, शब्दोच्चार, चेहऱ्यावरील हावभाव, हातवारे या अभिनयाच्या बारकाव्यांबाबत अण्णा नेहमी दक्ष असत. नाटकातला प्रत्येक शब्द लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. त्यासाठी भाषेवर विशेष लक्ष द्या असे ते सांगत. नैसर्गिक अभिनयावर त्यांचा विशेष भर होता. “मी दामू केंकरेंचा शिष्य आहे’ असे ते सांगत. छोट्या-मोठ्या कोणत्याही भूमिकेत असले तरी त्यांची अभिनयाची स्मृती रसिकांच्या मनात उमटली हेच त्यांचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. रसिकांना आपल्या भूमिकेत गुंतवून ठेवण्याची किमया अण्णांना गेल्या सहा दशकांच्या रंगभूमीवरील सातत्याच्या वावरातून आणि निरीक्षणातून साधली. त्यांच्या जाण्याने मराठी रंगभूमी, सिनेमा आणि मालिका विश्वातील एक चतुरस्र कलावंत हरपल आहे. अण्णांना भावपूर्ण श्रद्धांजली.
(शब्दांकन ः आशिष जोशी)
– अरुण नलावडे