पाऊस कसाही, केव्हाही बरसला, कोसळला तरी तो हवाहवासा वाटतो. सगळ्यात आवडता मौसम म्हणजे पाऊस. कारण, पावसात एक जबरदस्त अनामिक आकर्षण आहे. तो कसा पडतो, कसा तयार होतो हे सारं लहानपणी आपण शिकलेलो आहोत. नदीच्या, तलावाच्या, समुद्राच्या पाण्याची उन्हाळ्यात वाफ बनते. ती वाफ आकाशात जाऊन पाण्याचे ढग तयार होतात. थंड हवा लागल्यावर त्या वाफेचे पाण्यात रूपांतर म्हणजेच पावसात रूपांतर होते आणि जमिनीवर पाऊस पडतो. ही झाली पावसाची जन्मकहाणी.
आजही शाळेत शिकवलेला पावसाचा इतिहास स्मरणात आहे. कारण, तो आपला जिव्हाळ्याचा विषय आहे. म्हणून कित्येकदा उन्हाळ्यात नदीकिनारी तलावाच्या काठी बसून खरंच का पाण्याची वाफ होते हे बघायचा एक द्राविडी प्राणायाम करावा वाटतो. ते काहीही असलं तरी काहीतरी खास आणि अप्रूप असं पावसात आहे हे नक्की! एक प्रकारची रोमॅंटिक बैठक त्याच्या स्वभावात आहे. तो येताना कधीच एकटा येत नाही. गरम कांदा भजी, मक्याचे भुट्टे सोबत घेऊन येतो आणि हो खूप साऱ्या सुखद आणि तरुण आठवणी!
परवा व्हॉट्सऍपवर एक सुंदर क्लिप आली. एक व्हिडिओ होता. गाणं होतं रिमझिम गिरे सावन! अमिताभ बच्चन आणि मौसमी चटर्जी या दोघांचे खूप आवडीचे गाणे. आवडीचे कलाकार आणि आवडीचा पाऊस. अमिताभ तसा ऑल टाइम वेलकम! त्याच्यासारखा फक्त तो आणि तोच! पण विशेष म्हणजे त्या व्हिडिओमध्ये केवळ अमिताभ आणि मौसमी हे दोघेच नव्हते; तर एक सीनियर वयाचे जोडपेही होते. इन्सॅटमध्ये अमिताभ आणि मौसमी बाकी हे दोघे.
त्यांचं गाणं आणि त्यांच्या ऍक्शन जशाच्या तशा हे सीनियर करीत होते. त्यांच्या ऍक्शन आणि भावमुद्रा बघण्यासारख्या होत्या. खरोखरच आश्चर्य वाटलं. कारण या वयामध्ये कोवळ्या आणि तरुण भावनांचे प्रगटीकरण करणं तसं जोखमीच असतं; पण ते त्यांनी फार सुंदररित्या चेहऱ्यावर दाखवले. मुंबईचा उसळता पाऊस, आकाशात पावसाची वृष्टी, पार्श्वसंगीत आणि ते दोघे असा सुंदर मिलाप होता. अगदी साधेसे ते जोडपे. विदाऊट मेकअप चेहरे; पण चेहऱ्यावर सोबत घालविलेल्या तरुणपणापासून ते आजपर्यंतच्या आठवणींचा मनोरम पावसाळी हिंदोळा त्यांचे सौंदर्य वाढवत होता. खरोखरच ही क्लिप बघताना खूप आनंद आणि छान वाटत होतं.
हा असाच असतो पाऊस. कोणत्याही वयात तारुण्य जपणारा. व्हिडिओ करणाऱ्याला 100 सलाम आणि एवढ्या पावसात अमिताभ मौसमीची कॉपी करणाऱ्या त्या जोडप्याला माझा वाकून नमस्कार. कारण मौसमीची लाडीक अदा चेहऱ्यावर दाखवणं फार कठीण आहे. ते धनुष्य त्यांनी फार सुंदररित्या पेललं होतं. तरुणपण दाखवण्यापेक्षा ते मनात जपणं हे तरुणपणाचं योग्य लक्षण आहे. पावसाचं एक वैशिष्ट्य असं की तो कोणालाही आपल्या तारुण्यातून फिरवून आणू शकतो आणि ज्यांना पाऊस आवडतो, उनका तो क्या कहना! म्हणून पाऊस स्वतः वेड्यासारखा वागतो आणि आपल्याला देखील वय विसरून त्याच्यात सामील व्हायला भाग पाडतो.
तो आपला लहानपणापासूनचा सखा, मित्र, सहोदर आहे. शाळेत जाताना जोरदार बरसून शाळा बंद पाडण्याची ताकद त्याच्यात असते. शाळेतून भिजत घरी आल्यावर आईच्या पदरानं डोकं पुसून घ्यायची, तिच्या कुशीत शिरायची तो संधी देतो. तरुणपणात तर तो आपला जिवलग सखा मित्र असतो आणि तरुणपणातील मैत्री तो आपल्या वयाच्या पुढच्या अगदी शेवटच्या वळणापर्यंत जपतो. आज अशा जीवनावर आपल्या मराठी हिंदी चित्रपटसृष्टीने किती प्रेम केले आहे. केवढी गीते तयार झाली आहेत याची मोजदाद करता येत नाही. प्रत्येक मराठी किंवा हिंदी चित्रपटात एक तरी पावसाळी गीत असायलाच पाहिजे. कारण, चित्रपट हा तेव्हाही आणि आजही सर्वसामान्य लोकांच्या स्वप्नपूर्तीचा बोलका आरसा आहे. प्रत्येक पिढी ही चित्रपटांची चाहती आहे. त्यातील नायक नायकांचे अनुकरण आजही मोठ्या आवडीने केले जाते.
अगदी दिलीपकुमार, देवानंद, राजकपूर हे त्रिदेव होते. त्यांचे गारूड आजच्या ही पिढीवर कायम आहे. यांच्याही चित्रपटात पावसाळी गीतं असायचीच आणि ती अजरामर आहेत. आजच्या गाण्याच्या, गाण्यावरच्या कार्यक्रमांमध्ये दूरदर्शनवरील कार्यक्रमात उमलती आणि तरुण पिढी ही गाणी मोठ्या आवडीने गातात. याच गाण्यांमध्ये त्यांची आवड आणि रुची दिसून येते. यातच या गाण्यांचे यशाचे गमक आहे. त्या काळातल्या तारका अभिनेत्रींविषयी काय बोलावं? प्रत्येक सौंदर्यवतीची अदा वेगवेगळी. मोहकता वेगळी, अभिनय वेगळा होता. एकापेक्षा एक वरचढ अशा त्या अभिनेत्री. त्यांची तुलना करता येणं शक्य नाही. प्रत्येक नायिकेवर पावसाळी गीतं चित्रित झालेली आहेत आणि तो एक अप्रतिम नयन सोहळा आहे. चित्रपटातला कृत्रिम पाऊसदेखील त्यांच्यावर आकर्षित व्हावा इतका त्यांचा अभिनय मोहक असायचा.
अशा पावसात नखशिखांत भिजलेल्या आरसपानी सौंदर्याच्या मानकरी, पण कुठेही अश्लीलता किंवा वाजवी देहप्रदर्शन दिसून येत नव्हते. त्यांच्या सौंदर्याला निरागसतेचा स्पर्श होता. आज तो प्रकार जरासा वेगळा झालेला आहे. पाऊसही काळानुसार थोडा धिट आणि मगरूर झाला आहे. पावसात भिजलेली आजची तारका मादक सौंदर्यवती दिसते, त्यापेक्षा अधिक ती आवाहनात्मक वाटते. मात्र, पूर्वीच्या तारका खरोखरच देखण्या आणि सुंदर होत्या. आजही त्यांच्या कपड्यांची, त्यावेळच्या त्यांनी घातलेल्या साड्यांविषयी चर्चा होते. कारण, ते सारं अजूनही स्मरणात आहे. पावसाची कधी गंमत तर कधी हेवा वाटतो. तो आपला सर्वांना एकसारखा बिलगतो, भिजवतो, चिंब चिंब करतो. कधी त्यालाही या देखण्या ओलत्या स्त्री सौंदर्याची भुरळ पडली नसावी का? याचे उत्तर तोच देऊ शकतो. विचारूया का त्याला?
पाऊस, रोमॅंटिक पाऊस, पावसाची गाणी, आणि चित्रपटसृष्टी यांच्याशी एक घट्ट नातं असलेली सौंदर्यवती जिचा उल्लेख किंवा स्मरण केले नाही तर खुद्द पावसालाच राग येईल.
ती म्हणजे मधुबाला! दोघेही फार प्रिय जिवलग. मी म्हणेन पाऊस म्हणजेच मधुबाला आणि मधुबाला म्हणजेच पाऊस. तिचा कोणताही चित्रपट असो त्यामध्ये तिच्या निरागस सौंदर्याला पावसाचा स्पर्श झाला नाही असं झालेलं नाही. ब्लॅक अँड व्हाइट चित्रपट मग तो बरसात की एक रात असो किंवा मिस्टर अँड मिसेस 55 असो अक्षरशः त्यातील पावसाळी गीतांनी त्या काळातल्या तरुणांची दैना केलेली आहे. आजही कधी “भुले बिसरे गीत’मध्ये अशा गाण्यातील मधुबाला दिसते तेव्हा मनावर हलव्याचा काटा फुलतो. अप्रतिम शब्द, सुंदर चाल, त्याहून सुंदर मधुबाला आणि सर्वांगसुंदर पाऊस हे सगळं कालातीत आहे. ती काळाच्या आड गेली पण तिचे स्वर्गीय सौंदर्य, अभिनय मागे ठेवून गेली आणि पावसाच्या मनात स्वतःला घर करून गेली. म्हणूनच पाऊस आला बरसला, कोसळला, रिमझिमला तर त्याच्या सकट मधुबाला पुन्हा मनात, ओठावर नावासकट आठवते.
– अर्चना कुलकर्णी