भारतीय क्रीडा क्षेत्रात गेल्या दशकापासून आपले खेळाडू यशाची नवनवी शिखरे पादाक्रांत करत आहेत. हे यश कठोर मेहनतीने मिळत असले तरीही त्यावर काही काळे डाग पडले आहेत. कामगिरीत वाढ होण्यासाठी काही खेळाडूंनी बंदी असलेल्या उत्तेजक द्रव्यांचे सेवन केल्याचे समोर येत आहे. अर्थात, हे नवे नाही; पण आपल्या क्षमतेपेक्षा जास्त विश्वास या बंदी असलेल्या औषधांवर आहे हे समोर आल्यावर मात्र, अशा खेळाडूंवर अत्यंत कठोर कारवाई करा, असेच सांगावेसे वाटते. भारताचा स्टार भालाफेकपटू शिवपाल सिंगच्या प्रकरणाचे हाच प्रश्न पुन्हा एकदा एैरणीवर आला इतकेच.
भारताचा नवोदित स्टार भालाफेकपटू शिवपाल सिंग उत्तेजक द्रव्य सेवन चाचणीत दोषी आढळल्यामुळे राष्ट्रीय उत्तेजक द्रव्य सेवन विरोधी समितीने (नाडा) त्याला चार वर्षांसाठी निलंबित केले आहे. ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा याच्यानंतर शिवपाल सिंग हा दुसरा मानांकित खेळाडू आहे. मात्र, आता या निलंबनामुळे त्याची संपूर्ण कारकीर्दच संकटात आली आहे.
टोकियो ऑलिम्पिकमध्ये भाग घेतलेल्या शिवपालला गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये स्पर्धाबाह्य चाचणीत अपयश आल्यामुळे तात्पुरत्या निलंबनात ठेवण्यात आले होते. त्याच्या चाचणीत बंदी असलेल्या मेथेंडिएनोनचे अंश आढळले. स्टेरॉइड मेथेंडिएनोन चाचणीत तो पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले. तो टोकियो ऑलिम्पिकमध्ये 27 व्या स्थानावर राहिला. आता त्याच्यावरील हा निलंबनाचा कालावधी 2025 सालापर्यंत राहील.
गेल्या वर्षी 15 ऑक्टोबर ते 31 डिसेंबर या कालावधीत झालेल्या शिबिरासाठी भारतीय क्रीडा प्राधिकरणाने जाहीर केलेल्या खेळाडूंच्या यादीत त्याचे नाव होते. मात्र यंदा शिबिराची मुदत 31 मार्चपर्यंत वाढवण्यात आल्याने त्यांचे नाव वगळण्यात आले. शिवपालने दोहा येथील 2019 सालच्या आशियाई स्पर्धेत 86.23 मीटर भालाफेक करून रजतपदक जिंकले होते. हीच त्याची वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी होती. ऑलिम्पिकनंतर त्याने कोणत्याही स्पर्धेत भाग घेतला नसला तरीही जागतिक स्तरावरील पदक विजेत्या खेळाडूंची चाचणी सातत्याने केली जाते. शिवपालने नीरजसह खेळताना नवोदितांनाही या खेळाची गोडी निर्माण केली होती. इतकेच नव्हे तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही एकदा मन की बात या कार्यक्रमात शिवपालचे कौतुक केले होते. मात्र, त्याच्यावर आता कारवाई झाल्याने या सगळ्या यशावर पाणी फेरले गेले आहे.
पूवम्मामुळे मानहानी
क्रीडा प्रकार मैदानी असो, सांघिक असो किंवा वैयक्तिक त्यात आपल्या स्वतःच्या क्षमतेनुसार यश मिळाले तर त्याचे महत्त्व असते. आपली गुणवत्ता, क्षमता, तसेच सराव व आपल्या गुरूंचे मार्गदर्शन यांच्या जोरावर मिळवलेले यशच चिरकाल टिकते. जागतिक उत्तेजक द्रव्य सेवन विरोधी समिती (वाडा) व राष्ट्रीय उत्तेजक द्रव्य सेवन विरोधी समितीने (नाडा) यांनी बंदी घातलेल्या स्टेरॉइडचे तसेच अन्य काही एनर्जी घटकांचे सेवन करून केलेली कामगिरी कायम टिकत नाही. आपले पितळ कधी ना कधीतरी उघडे पडतेच. शिवपालच नव्हे तर भारताची अनुभवी एमआर पूवम्मा ही देखील गेल्या वर्षी झालेल्या डोपिंग चाचणीत दोषी ठरल्याने तिच्यावर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली होती. एनडीएच्या (अँटी-डोपिंग) उत्तेजक चाचणी विरोधी अपिल पॅनेलने तिच्यावरील तीन महिन्यांचे निलंबन रद्द केले व आता केलेली कारवाई योग्य ठरवली. पूवम्मा 32 वर्षांची असून तिच्यासमोर अद्याप किमान दोन ते चार वर्षांची कारकीर्द होती. तिच्या नमुना अ चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला त्यामुळे तिची कामगिरीही आता रद्द केली जाणार आहे.
गेल्या वर्षी 18 फेब्रुवारीला पटियाला येथे झालेल्या इंडियन ग्रांप्री स्पर्धेदरम्यान तिची चाचणी करण्यात आली होती. या चाचणीत तिने बंदी असलेल्या मेथिलहेक्सानामाइन या द्रव्याचे सेवन केल्याचे सिद्ध झाले होते. पूवम्मा 2018 सालच्या आशियाई स्पर्धेत 4 बाय 400 मीटर महिला आणि मिश्र रिले शर्यतीत विजेत्या भारतीय संघात सुवर्णपदक जिंकणारी सदस्या होती. 2014 सालच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत याच प्रकारात सुवर्णपदक विजेत्या संघाचाही ती एक भाग होती. 2012 सालच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत तिने वैयक्तिक 400 मीटरमध्ये ब्रॉंझपदकही मिळवले होते. तिला 2015 साली अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. आता देशाने तिला या पुरस्कारासह जे काही दिले त्याची परतफेड तिने कशी केली ते देखिल पाहिले पाहीजे. डोपींगमध्ये दोषी असल्याचे सिद्ध झाल्यावर तिने माध्यमांसमोर नक्राश्रू काढून दाखवले. आपण बंदी असलेले द्रव्य सेवन केल्याचे माहिती असतानाही हे असे रडणे म्हणजे आधीच्या केलेल्या चुकीपेक्षाही मोठी चूक ठरते. कोणाकडून सहानुभूती हवी आहे अशा खेळाडूंना.
रग्बीपटू अंतिमा कुमारी
भारताची रग्बीपटू अंतिमा कुमारीदेखील दोषी असल्याचे सिद्ध झाले होते. तिने बंदी असलेले टॉमिक्सिफिन हे द्रव्य सेवन केल्याचे समोर आले होते. हे भारतीय खेळाडूंना कसले खुळ लागले आहे. वशिल्याने नोकरी मिळते पण प्रामाणिकता व सच्चाईच्या जोरावरच ती टिकते. तसेच क्रीडाक्षेत्रातही आहे. संघात किंवा कोणत्याही खेळात देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळते; पण त्यात यश स्वतःच्याच जीवावर मिळवावे लागते.
वेटलिफ्टिंगपटू संजिता चानू
विविध खेळांत असे अनेक खेळाडू आहेत की ज्यांनी देशाला मोठे यश प्राप्त करून दिले आहे. अशाच काही खेळाडूंमध्ये अग्रक्रमाने घ्यावे लागेल असे नाव म्हणजे संजिता चानू. संजिता ही एक अनुभवी वेटलिफ्टर असून तिने देशासाठी अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजवल्या आहेत. रिओ ऑलिम्पिकमध्ये पदकाने हुलकावणी दिल्याने ती निराश झाली होती. मात्र, ही कसर तिने टोकियो ऑलिम्पिकमध्ये भरून काढली. मात्र, रिओची स्पर्धा झाल्यावर लगेचच करण्यात आलेल्या तिच्या चाचणीत तिनेही बंदी असलेल्या घटकाचे सेवन केल्याचे सिद्ध झाले होते. त्यामुळे तिच्यावरही चार वर्षांची बंदी लावली गेली होती. टोकियोतील स्पर्धेद्वारे तिने पदक जिंकत थाटात पुनरागमन केले. आता तिच्यासमोर यंदाच्या मोसमातील आंतरराष्ट्रीय स्पर्धांसह पॅरिस ऑलिम्पिकही आहे. मात्र, इतक्या मोठ्या खेळाडूला देखिल बंदी असलेल्या घटकांचे सेवन करण्याचा मोह आवरता आला नाही, याचे आश्चर्य वाटते.
1963 साली पहिली चाचणी
जागतिक क्रीडाक्षेत्रात असे मानले जाते की, पहिली उत्तेजक द्रव्य सेवन चाचणी 1963 साली करण्यात आली होती. मात्र, त्याच्याही आधी ब्रिटनमध्ये एका शर्यतीत 1877 साली अब्राहम वुडने आपला प्रतिस्पर्धी खेळाडू रॉबर्ट बार्कले अल्ड्राइसविरुद्ध चांगली कामगिरी व्हावी यासाठी एका उत्तेजक द्रव्याचे सेवन केल्याची कबुली दिली होती. मात्र, त्यावेळी फारसे नियमच अस्तित्वात नसल्याने त्याच्यावर कारवाई झाली नसल्याचे दिसून आले. या इतिहासानंतरची सर्वात मोठी डोपींगची घटना 2011 साली झालेल्या जागतिक मैदानी स्पर्धेत उघड झाली होती. त्यावेळी या स्पर्धेत सहभागी झालेल्या एकूण स्पर्धकांपैकी तब्बल 40 टक्के खेळाडूंनी डोपींग केल्याचे समोर आले होते.
डोपींग म्हणजे काय?
जागतिक उत्तेजक द्रव्य सेवन विरोधी समिती (वाडा) व राष्ट्रीय उत्तेजक द्रव्य सेवन विरोधी समीतीने (नाडा) यांनी अन्य देशांच्या क्रीडा संघटनांकडून मते मागवत अशा काही घटकांवर तसेच स्टेरॉइड्स व उत्तेजक द्रव्यांवर कायमची बंदी घातली आहे. मुळात डोपींग का केले जाते याचे उत्तर म्हणजे आपल्या क्षमतेपेक्षाही जास्त सरस कामगिरी करण्यासाठी घेतलेले औषधांचे सहकार्य. आता त्यात काळानुरूप अनेक बदलही झाले असून बंदी घालण्यात आलेल्या नव्या गोष्टींचीही यादी वेळोवेळी प्रत्येक देशाच्या क्रीडा महासंघांना दिली जाते, तरीही हे प्रकार रोखण्यात आतापर्यंत यश आलेले नाही.
कारवाई अत्यंत कठोर व्हावी
खेळ कोणताही असो खेळाडू आपल्या दैनंदिन सरावाबरोबरच अशा द्रव्यांचे सेवन करतात की, त्यामुळे त्यांच्या कामगिरीचा आलेख वाढला जातो. खरेतर ही चक्क फसवणूक आहे व त्यात दोषी सिद्ध झालेल्या खेळाडूची आजवरची सर्व कामगिरी रद्द केली जावी. तसेच अशा खेळाडूने केलेली फकवणूक जाहीररीत्या सगळ्यांना समजावी म्हणून माध्यमांमध्ये त्याची माहितीही दिली जावी. जसे सैन्यात कोर्टमार्शल असते त्याच धर्तीवर ही कारवाई करताना त्याला देण्यात आलेले पुरस्कारही हिसकावून घेतले गेले पाहिजेत. तसेच अशा खेळाडूला त्यानंतर खेळाशी संबंधित कोणत्याही भूमिकेत काम करण्यासही बंदी लावली गेली पाहिजे. त्याने केलेली फसवणूक हा दखलपात्र गुन्हा नोंदला गेला पाहिजे व त्याच्यावर शिक्षेची अत्यंत कठोर कारवाई झाली पाहिजे. असे घडले तरच नव्या पिढीतील एकही खेळाडू असे करण्यास धजावणार नाही. वाडा काय किंवा नाडा काय त्यांनी बंदी असलेल्या औषधांची तसेच घटकांची जी यादी प्रत्येक देशाला देते त्याची माहिती देशभरात कोणत्याही स्तरावर खेळत असलेल्या खेळाडूंना व त्यांच्या प्रशिक्षकांना व त्या खेळाच्या संघटनेला झाली पाहिजे तरच खेळाडू क्षमता वाढवण्यासाठी आपल्या गुणवत्तेचा व जिद्दीचा वापर करतील उत्तेजक द्रव्यांचा नव्हे.
क्रिकेटमध्येही हे घडते
भारतात धर्म मानल्या जात असलेल्या क्रिकेटमध्येही हे प्रकार घडलेले आहेत. क्रिकेटपटू पृथ्वी शॉ याचे ताजे उदाहरण. त्याने देशांतर्गत स्पर्धेतील सामन्यादरम्यान डोके दुखत असल्याने औषधांच्या दुकानातून एक औषध घेतले व त्याचे सेवन केले. मात्र, या औषधावर बंदी असल्याचे त्याला त्याच्या प्रशिक्षक व संघटनेकडूनही समजले नव्हते. साहजिकच तो चाचणीत दोषी आढळला व त्याच्यावरही निलंबनाची कारवाई झाली होती. अर्थात, क्रिकेटमध्ये आणखीही काही उदाहरण आहेत; पण त्याचे प्रमाण अन्य खेळांच्या तुलनेत कमी आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) जागतिक उत्तेजक द्रव्य सेवन विरोधी समितीशी (वाडा) सहकार्य करार केला असून प्रत्येक स्पर्धेत कोणत्याही वेळी खेळाडूंची डोपींग चाचणी केली जाते. त्याच्या अहवालानंतर कारवाईचे स्वरूप ठरते. क्रिकेटसह अन्य क्रीडा क्षेत्रांनाही ही वाळवी लागली आहे, त्याचा लवकरात लवकर निचरा केला गेला पाहिजे. अन्यथा, संपूर्ण क्रीडाक्षेत्रच डागाळले जाण्याचा धोका आहे. त्यामुळेच डोपींगच्या या ग्रहणातून जागतिक क्रीडाक्षेत्राला कधी मुक्ती मिळणार, हाच काय तो प्रश्न आहे.
अमित डोंगरे