गारवा आपल्याला नेहमीच सुखद वाटत असतो. तर दाह नेहमीच पिडादायक वाटत असतो. त्याचप्रमाणे “क्रोधाग्नी’ हाही आपल्याला त्रासदायकच आहे. याच क्रोधाग्नीला शांत करून आपले आयुष्य सुखद कसे करावे नेमके याच विषयी थोडेसे…
णत्याही मनुष्यास सहा विकार आहेतच. काम, क्रोध, मद, मोह, मत्सर, लोभ या सहा विकारांमधील “क्रोध’ याचाच विचार आपण येथे करणार आहोत. अनुकूल-प्रतिकूल अशा कोणत्याही परिस्थितीत आपण आपले मन शांत ठेवून आपले ध्येय साध्य करावयाचे असते. आपण स्वतःला विचलित होऊ द्यावयाचे नाही. आपले मन विचलित होण्यास “क्रोध’ हेही एक कारण असते. “क्रोध’ हाच आपला शत्रू असतो की जो आपल्या मनात खोलवर दडून बसलेला असतो. याच क्रोधावर आपण विजय मिळवायचा आहे आणि ते शक्य आहे. फक्त आपण आपल्या मनाशी पक्की खूणगाठ बांधावयाची की “चिडायचे नाही.’
बऱ्याच प्रसंगी आपल्या भोवतालचे आपल्याला मुद्दाम क्रोधाच्या अग्नीत लोटू पाहत असतात. अशामुळे आपण चिडून जाऊन काहीतरी चुकीचे कृत्य करून बसतो आणि नेमके हेच आपल्या हितशत्रूंना, विरोधकांना हवे असते. आपण मात्र आपले मन शांत ठेवून अशा विरोधकांचा डाव उधळून लावायचा आहे. क्रोध हा विकार आपल्या प्रत्येकालाच असतो. आपण अगदी साधू संत जरी होऊ शकलो नाही तरी त्यादृष्टीने प्रयत्न केल्यास आपल्यात खूप काही चांगले बदल घडून येऊ शकतात. आपण आपल्या क्रोधावर पूर्णपणे नाही पण अंशतः जरी नियंत्रण मिळविले तरी आपण आयुष्यात खूप काही साध्य करू शकतो.
जेव्हा आपल्या मनाविरुद्ध काही घडते किंवा आपल्या मनाविरुद्ध कोणीतरी मुद्दाम कृती करून आपल्याला चिडवून देत असतो त्यावेळी आपण लगेच क्रोध व्यक्त करणे योग्य नाही. आपण अगदी शांत राहून हसून, घडलेल्या घटनेबाबत नियंत्रित प्रतिक्रिया द्यावयाची. असे केल्याने नुकसान तर काहीच होत नाही. पण समोरच्या व्यक्तीला आपण गाफील ठेवत असतो. आपल्या मनात काय चालले आहे याची जराशीसुद्धा कल्पना समोरच्या व्यक्तीला येऊ द्यावयाची नाही. याच हेतूने आपण आपले वागणे बोलणे हे अगदी नेहमीसारखेच ठेवायचे असते. जणू काही फार काही विशेष घडलेच नाही असे दाखवायचे असते. आपल्या मनात त्या व्यक्तीबद्दल राग आहे ते फक्त आपल्यालाच माहीत असले पाहिजे.
काळ जसा पुढे सरकत जाईल तसे ती व्यक्ती अधिकच गाफिल राहील आणि एक दिवशी अलगदपणे आपल्या हातात येईल. अशा वेळी त्या व्यक्तीला त्याने/तिने केलेल्या कृतीची जाणीव करून द्यावयची. मग भले ती घटना दहा-पंधरा वर्षांपूवीही घडलेली का असेना. अशावेळी आपण शांत डोके ठेवून केलेला वार हा त्याने आपल्याला दिलेल्या त्रासापेक्षा जास्त तीव्रतेचा असतो. असे वागल्याने आपल्याला आणखीनही एक फायदा होऊ शकतो, दरम्यानच्या काळात त्या व्यक्तीकडून आपल्याला काही फायदा करून घ्यावयाचा असेल किंवा काही मदत हवी असेल तर ती मिळू शकते. पण हेच आपण लगेच आपल्या मनातील राग जर ओकून मोकळे झालो तर ती व्यक्ती आपल्यापासून लांब जाईल आणि त्या व्यक्तीला धडा शिकविण्याचीही संधी कधीच मिळणार नाही.
बऱ्याच वेळा असा मनातील राग मनात ठेवल्यामुळे आपल्याला मानसिक त्रास होऊ शकतो. असा मानसिक त्रास आपण करून घ्यावयाचा नाही. यासाठी आपण आपल्या आवडीचे काम करू शकतो. घडलेली घटना वारंवार आठवायची नाही. तसेच ती घटना जिथे घडली तेथे जाणे टाळावयाचे. आपल्याला राग जर अगदीच अनावर झाला टेनिसचा चेंडू हाताच्या पंजात पकडून घट्ट मूठ आवळू शकतो. किंवा तोच चेंडू समोरच्या भिंतीवर जोरजोरात आपटू शकतो. अशा प्रकारे आपल्या रागाला वाट मोकळी करून देऊ शकतो.
क्रोध जसा आपल्याला येत असतो तसाच तो दुसऱ्यालाही येत असतो. आपण फक्त एवढी काळजी घ्यावयाची की आपण कोणाच्या क्रोधास पात्र बनावयाचे नाही. आपल्याला प्रत्येकाच्या मनाप्रमाणे वागणे शक्य नाही. पण मुद्दाम आपण दुसऱ्याला विनाकारण त्रास देऊन किंवा आपल्या अधिकारांचा गैरवापर करून इतरांची मने दुखवायची नाहीत. यामुळे आपण आपला मार्ग सुकर करीत असतो. इतर कोणी आपल्याकडून दुखावली गेलेली व्यक्ती आपल्या प्रभावामुळे कदाचित विरोध करू शकणार नाही; पण त्याचबरोबर आपला संभाव्य काही फायदाही करून देणार नाही.
मुळात आपल्याला क्रोध कशामुळे येतो हे शोधून काढायला हवे. जसे एखाद्या व्यक्तीचा सहवास आपल्याला आवडत नाही. तर अशा व्यक्तीला आपण टाळायला हवे. जर आपल्याला कामाचा अतिरिक्त ताण आल्यामुळे क्रोध येत असेल तर कामाचे नियोजन व्यवस्थित करून ताण येणार नाही याकडे लक्ष द्यावे. बऱ्याच वेळा प्रतिकूल परिस्थितीत काम करावे लागल्याने आपल्याला राग येतो. तेव्हा अशी प्रतिकूल परिस्थिती कशी सुसह्य करता येईल याकडे लक्ष द्यावे. जसे सतत उन्हात काम करावे लागत असेल तर पिण्यासाठी पुरेसे पाणी जवळ ठेवावे. उन्हापासून संरक्षण कसे मिळेल हे पहावे.
बऱ्याच वेळा आपण कामात असताना आपल्या स्वतःकडे लक्ष देत नसतो. बऱ्याच वेळा आपल्याला तहानभूक लागलेली असते; पण कामाच्या व्यापात आपल्याला खाण्यापिण्यासाठी सवडच मिळत नाही. अशा अवस्थेत कामाच्या संदर्भात आपल्याला काही महत्त्वाचे निर्णय घ्यावयाचे असतात किंवा कोणाशी महत्त्वाचे बोलायचे असते. अशावेळी आपल्याला बारीकसारिक बाबी खटकू शकतात आणि आपल्याला राग येऊ शकतो. अशा प्रतिकूल वातावरणात आपण रागाच्या भरात काही चुकीचे निर्णय घेतो, चुकीचे बोलणे करतो. हे सर्व आपण टाळू शकतो. आपण कितीही कामात असलो तरी जठराग्नी शांत करायलाच हवा. जरी भोजन करण्यासाठी सवड मिळत नसेल तरीही आपण केळ, पेरू, बोरे, टमाटे, गाजर काम करता करता खाऊ शकतो. पेलाभर दूध पिऊ शकतो. नाचणीची बिस्किटे खाऊ शकतो आणि कितीही कामात असलो तरी पाणी पिण्यासाठी वेळच मिळत नाही, असे होत नाही. भरपूर पाणी प्यावे. सात्त्विक आहार हा आपले मन शांत ठेवण्यास मदत करतो.
आपण आपल्या मनमंदिराच्या गाभाऱ्यात बसून आपल्या मनोदेवतेला शांत चित्ताने, शांत मनाने क्रोधापासून दूर राहण्याचे पुष्प समर्पित करावे. परिणामस्वरूप आपण शांत व आनंदी मनाने जेव्हा जीवन जगायला लागू तेव्हा मिळणारा आनंद, मिळणारे समाधान हाच आपल्या मनोदेवतेने आपल्याला दिलेला प्रसाद होय.
– अनिकेत भालेराव