योग्यविज्ञान हे प्राचीन शास्र आहे. मानवाने चिंतन, मनन आणि कृती या टप्प्याने आचरण करायला सुरुवात केली तीच योगाची सुरुवात आहे. पतंजली ऋषींनी मनुष्याचा सर्वंकष विकास व्हावा, यासाठी विविध प्रकारच्या योगांची सांगड घालून अष्टांग योगाची निर्मिती केली. पुढे परंपरागत योगाची नवीन विज्ञानाशी सांगड घालण्यात आली. आज योगाचा प्रसार वेगाने होताना दिसत आहे. 21 जून रोजी जगभरात योग दिन साजरा होत आहे, ही बाब स्वागतार्ह आहे. मात्र, केवळ आसने शिकण्यापुरती योगविद्या मर्यादित राहता कामा नये. योगविद्येनुसार आचरण करण्याची सुरुवात स्वतःपासून झाली पाहिजे.
आदिम काळात सुरुवातीला माणूस भूक लागली की अन्नाच्या शोधात जात असे आणि अन्न मिळवून ते खात असे, तेव्हा हे शास्त्र अस्तित्वात नव्हते. कालोघात मनुष्यप्राण्याला भूक लागल्यानंतरच्या अन्नाची तयारी करून ठेवली पाहिजे याची जाणीव होऊ लागली. माणसाचे नागरीकरण सुरू झाले. मानव शेती करू लागला. घर बांधून राहू लागला. तेव्हा योगशास्त्र अस्तित्वात आले. थोडक्यात, मनुष्य जेव्हा विचार करू लागला तेव्हापासून योग अस्तित्वात आला. योगशास्त्रात सर्वांत महत्त्वाची गोष्ट आहे ती आधी विचार करा आणि मग कृती करा. म्हणूनच मानवाने चिंतन, मनन आणि कृती या टप्प्याने आचरण करायला सुरुवात केली तीच योगाची सुरुवात आहे.
योग ही आपली संस्कृती आहे. योगविज्ञानामध्ये जगण्याचा शास्त्रीय विचार केला आहे. ते जगण्याचे शास्त्र आहे. विशिष्ट पद्धतीने जगलो तर त्याचा काय परिणाम होतो याचा विचार योगामध्ये होतो. चिंतायुक्त आणि चिंतामुक्त, सकारात्मक जगण्यातील फरक योगशास्त्रात समजतो. म्हणूनच योग हा जगण्याचा हा एक शास्त्रीय मार्ग आहे. योग म्हणजे जागरुकता. जो मनुष्य योग करतो, त्याचा नियमित सराव करतो त्याच्यामध्ये जागरूकता येते. पूर्वी ऋषीमुनींच्या काळात गृहस्थाश्रम होता.
गुरुकुल पद्धती होती. त्याकाळात शिष्य हे गुरुंच्या घरी किंवा आश्रमात येऊन राहात असत आणि वेगवेगळ्या विद्या शिकत असत. यासाठी एकाग्रता गरजेची होती. अशा प्रकारे एकाग्र होऊन, साधना करून ज्ञानग्रहण करणाऱ्या शिष्यांचा सर्वांगिण विकास होत असे. त्याकाळात योग विद्यार्थ्यांना गुरूंच्या घरीच शिकवला जायचा. वेदाभ्यासही होत असे. निसर्गाशी सुसंगत वागण्याचे सूत्र वेदांनी दिलेले आहे. गायत्री मंत्रातही निसर्गाचा समतोल राखून जगण्याचा संदेश दिला आहे. निसर्गाविरुद्ध वर्तणूक केल्यास तिथे योगाचा उपयोग होत नाही. दिवस हा काम करण्यासाठी आणि रात्रीचा काळ विश्रांतीसाठी हा निसर्गनियम आहे. याविरुद्ध आचरण केल्यास त्याचा त्रास होणारच. पूर्वीच्या काळी मनुष्याचे सर्व विधी हे निसर्गनियमांनुसार होते.
आज काळ बदलला आहे. बदलत्या काळात जगण्याच्या पद्धती बदलल्या आहेत. पूर्वी पहाटे उठून होमहवन, प्रार्थना, पूजा केली जात असे. आज त्याऐवजी सकाळी उठल्यानंतर व्यायाम करणे, फिरायला जाणे, प्राणायाम करणे, योगासने करणे, न्याहारी करणे, भोजन करणे, कामावर जाणे असा दिनक्रम बनला आहे. या जीवनचक्रामध्येही कर्मयोगाचे तत्त्वज्ञान अनुसरता येते. निसर्ग नियमांनुसार कृती करणे, विचार करून कृती करणे, फळाची अपेक्षा न करता कर्म करत जाणे, मिळणारे फळ पाहून पुढची वाटचाल करणे याविषयीचे ज्ञान कर्मयोग सांगतो.
योगाचे असे अनेक प्रकार आहेत. भक्तियोग, हटयोग, राजयोग, मंत्रतंत्र योग असे अनेक प्रकार पूर्वीपासून अस्तित्वात आहेत. या सर्व योगांची सांगड घालण्याचे काम पतंजली ऋषींनी केले. त्यांनी योगाच्या सर्व प्रकारांचा अभ्यास केला आणि त्यातून त्यांनी एक योग्य मार्ग दाखवला. तो मार्ग म्हणजे अष्टांग योग. इसवी सन पूर्व 400 मध्ये पतंजली ऋषींनी नमूद केलेल्या अष्टांग योगामध्ये भक्तीयोग, कर्मयोग, मंत्रयोग, तंत्रयोग, लययोग, हठयोग, राजयोग आदींची मिमांसा केलेली आढळते. या अष्टांगयोगामधून मनुष्याचा सर्वंकष विकास व्हावा, असा पतंजलींचा दृष्टिकोन होता. यासाठी त्यांनी सर्व प्रकारचे योग एकत्र करून त्यांना एका धारेमध्ये गुंफून त्यामध्ये सुसूत्रता आणली आणि अष्टांग योग या प्रचलित योगशास्त्राची देणगी संपूर्ण मानवजातीला मिळाली आहे.
मनुष्याचा “पूर्णरुपेण विकास’ साधण्यासाठी अष्टांग योग आवश्यक आहे, अशी मांडणी त्यांनी केली. हा योग प्रत्येक मनुष्यप्राण्यासाठी होता. “पतंजली योगसूत्र’ या ग्रंथामधून पतंजली ऋषींनी छोट्या छोट्या गोष्टींमधून आपण स्वतःवर कसा ताबा ठेवता येते, आपल्या शरीराला, मनाला क्लेष देणाऱ्या गोष्टी आपल्या आयुष्यातून दूर कशा ठेवता येतील, शरीराची कशी काळजी घेता येईल याविषयीचा शास्रोक्त मार्ग दाखवला. पतंजलींच्या म्हणण्यानुसार चित्तवृत्ती चंचल होण्यापासून रोखणे (चित्तवृत्तीनिरोधः), एकाच गोष्टीवर मन केंद्रित करणे म्हणजेच योग. आपल्या संस्कृतीमध्ये सहा दर्शनशास्त्रे आहेत. त्यातील पतंजलीयोग हे एक महत्त्वाचे दर्शनशास्त्र आहे. आजच्या युगामध्ये योग शब्द वापरताना पतंजली योग असाच उल्लेख केला जातो.
या षड्दर्शनशास्रामध्ये स्वामी विवेकानंदांनी सांगितलेला वेदांत हे एक प्रमुख दर्शन आहे. या दर्शनामध्ये अनेक उपशाखा आहेत. वेदांताने मनुष्याला दिशा दाखवली. लक्ष्य किंवा ध्येय मनात ठेवून जीवन कसे जगले पाहिजे, आजूबाजूला लक्ष विचलित न होता लक्ष्यपूर्ती कशी करायची याचे सूत्र विवेकानंदांनी यातून सांगितले आहे.आपल्याकडील सर्व साधूसंत हे भक्तियोगी, ज्ञानयोगी होते. या साधूसंतांकडून भक्तीभावाची शिकवण मिळाली. हाच भक्तीभाव आपल्या दैनंदिन आचरणामध्ये कसा आणायचा याचा मार्ग पतंजलीने दाखवला होता.
आजच्या पिढीला काही आसने करायला सांगितली किंवा डोळे मिटून बसायला सांगितले तर ते अनेक प्रश्न विचारतात. त्यांना त्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे द्यावयाची असतील तर योगाला विज्ञानाचा आधार द्या.
प्रत्येक गोष्टीला निश्चित आधार पाहिजे. फक्त गुरूने सांगितले म्हणून केले असे करून चालणार नाही. त्यासाठी सिद्धता करून दाखवली पाहिजे. योगशास्त्र शिकण्यासाठी एक व्यवस्थित भाषा असली पाहिजे, त्याला वैज्ञानिक आधार असला पाहिजे हा विचार त्यांनी मांडला. त्यानुसार शास्त्रीय भाषेत योग शिकवण्यासाठी योगेंद्रनाथ अमेरिकेला गेले. तिथे तीन वर्षे काम करून शास्त्रीय संशोधन करून प्रत्येक आसनाचा शरीराला, मनाला कसा फायदा होतो हे त्यांनी सिद्ध करून दाखवले. परंपरागत योगाची नवीन विज्ञानाशी सांगड घालण्याचे अत्यंत महत्त्वाचे कार्य त्यांनी केले. 1918 मध्ये योगेंद्रजींनी मुंबईत दादाभाई नौरोजी यांच्या बंगल्यामध्ये आश्रम स्थापन केला.
हा झाला योगाचा इतिहास. प्राचीनकाळी योगाचा उद्दिष्ट वेगळे होते. त्यावेळी त्यामध्ये अध्यात्मवाद होता. आजच्या काळात भौतिकवाद वाढीस लागला आहे. आज मनुष्यप्राण्याचे सर्व लक्ष पैशावर केंद्रित झाले आहे. मनुष्य धर्माचरण विसरला आहे. कर्तव्ये विसरला आहे. माणूस म्हणून आपण या समाजाचे देणे लागतो, आपण समाजाला योगदान दिले पाहिजे ही भावना आज लोप पावत चालली आहे. वास्तविक, आपल्या ताटात येणारी पोळी तिथपर्यंत येण्यासाठी अनेकांनी आपले कर्तव्य प्रामाणिकपणाने बजावलेले असते. सर्वच गोष्टी एकटा माणूस करू शकत नाही.
प्रत्येक जण आपले कर्तव्य बजावत आहे म्हणून हा जगाचा संसार चाललेला आहे. हे लक्षात घेऊन प्रत्येकाने आपली सहजकर्तव्ये पार पाडली पाहिजेत. ही जाणीव किंवा ही शिकवण आम्ही योगाच्या माध्यमातून देत आहोत. कारण योगशास्त्रामुळे मनाचा तोल, सयंम राखता येईल. आसने, प्राणायाम केल्याने शरीर, मन यांचा समतोल राहील. ऊर्जा मिळेल. मात्र, त्याचा उपयोग स्वार्थी जीवन जगण्यासाठी होता कामा नये. आज मनोबल आणि शरीरबल वाढवणाऱ्या योगशास्त्रामध्येही स्वार्थलोलुपता वाढली आहे. अनेकांना आपल्या व्याधी बऱ्या करण्यासाठी योग शिकायचा असतो तर अनेकांना योगशिक्षक होऊन पैसा कमवायचा असतो. योगशास्त्राची ही अवस्था नक्कीच क्लेशदायक आहे.
असे असले तरीही लोकांमध्ये योगशास्त्राकडे लोकांचा ओढा वाढत आहे, ही बाब स्वागतार्ह आहे. अनेक योगगुरूंमुळे योगाचा प्रसार होत आहे. 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योगदिन म्हणून साजरा होतो. केवळ आसने करण्यापेक्षा योगविद्येचे मर्म जाणून घ्या. योग ही विद्या असून साधनेने ती शिकण्याची गरज आहे. केवळ काही आसने शिकण्यापुरती योगसाधना मर्यादित राहता कामा नये, ही बाब अत्यंत महत्त्वाची आहे. कारण एखाद्या दुष्कृत्य करणाऱ्याने जर या आसनांमधून, प्राणायामामधून ऊर्जा मिळवली तर तो त्याचा वापर पुन्हा दुष्कर्म करण्यासाठीच करणार हे उघड आहे. म्हणूनच पूर्वीच्या काळी शिष्य निवडताना आणि शिष्यांना योगविद्येची शिकवण देताना गुरूंकडून अनेक परीक्षा घेतल्या जात असत.
सरसकट सर्वांना योगविद्येची शिकवण दिली जात नसे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर योगप्रसार करताना ही मूलभूत गोष्ट सर्वांनीच लक्षात ठेवली पाहिजे. योगविद्येचे सखोल ज्ञान घेणे आवश्यक आहे. योगविद्येनुसार आचरण करण्याची सुरुवात स्वतःपासून, स्वतःच्या मनापासून झाली पाहिजे. त्यासाठी सत्य, अहिंसा, अपरिग्रह आणि रोगनिवारण या सर्व बाजूंनी प्रशिक्षण दिले गेले पाहिजे. योगाभ्यासाचे परिणाम अचंबित करणारे आहेत. योगसाधनेने अनेक लोकांच्या स्वभावामध्ये बदल झाल्याचे, त्यांचे मनपरिवर्तन झाल्याचे, त्यांच्या वर्तनात, विचारात सकारात्मक बदल झाल्याचे आम्ही स्वतः पाहिले आहे. हा योगसंस्कार रुजवणे ही काळाची गरज आहे.
(शब्दांकन ः हेमचंद्र फडके)
– हंसा जे. योगेंद्र