बाळूची आज क्रिकेटची मॅच होती. बॅट घेऊन कधी एकदा मैदानावर जातोय, असं त्याला झालं होतं. त्याचे मित्रमंडळ आले. मग बाळूने घराबाहेर पाऊल टाकले. त्याला जाऊन अजून पुरता अर्धा तासही झाला नसेल; तोच स्वारी घरी पुन्हा परत. बरं आला तोही मोठ्या घुश्शातच. आल्याबरोबर त्याने हातातली बॅट कोपऱ्यात रागानेच जोरात आपटली. शमी म्हणाली, “काय झालंय बाळूदा, बोलत का नाहीस? आणि एवढ्या लवकर कसा रे घरी परत आलास? एवढ्यात संपली तुमची क्रिकेटची मॅच?’ बाळू यावर काहीच बोलला नाही. अगदी गप्पच.
बाळूचा अस्वस्थपणा पाहिल्यावर आईबाबांनीही लगेच कारण विचारले. आता मात्र बाळूने तोंड उघडले. सारी हकीगत सांगितली. क्रिकेटची मॅच ज्या संघाबरोबर होती त्यातील एका मुलाशी बाळूची काही कारणावरून बाचाबाची, वादावादी झाली. एकमेकांना अक्षरश: शिव्या दिल्या गेल्या. एकमेकांवर ते धावून गेले. शेवटी बाळूच्या मित्रांनी बाळूला बाजूला नेले. पण बाळूचा मूडच गेला सारा. मग तो मैदानावरून सरळ घरीच आला. बाबा म्हणाले, “काय रे तुम्ही हल्लीची मुलं.
छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडता काय? एकमेकांना शिव्या देता काय? बाळू, त्या मुलाने तुला शिव्या दिल्या; मग तू त्या मुलाला शिव्या दिल्यास. मग तुमच्या दोघांत काय फरक राहिला बरं. तुम्ही दोघेही सारखेच. खेळही बाजूलाच राहिला तुझा. बाळा, असा संताप करून घेणे बरे नव्हे.अरे, शांततेतच मार्ग सापडतो. भांडणात तर आपले श्रम वाया जातात. आजच्या तुझ्या या वागण्यावरून मला महात्मा गांधीजींच्या आयुष्यातील एका प्रसंगाची आठवण झाली बघ.’
शमी लगेच म्हणाली, “बाबा कोणत्या प्रसंगाची? सांगा ना आम्हाला तो प्रसंग.’
“होय, होय, सांगतो मी तुम्हाला तो प्रसंग. 1931 च्या काळी दुसरी गोलमेज परिषद इंग्लडला भरली होती. राष्ट्रीय सभेचे प्रतिनिधी म्हणून गांधीजी या सभेस हजर झाले. भारताच्या घटनात्मक प्रश्नांचा विचार सभेत होणार होता. बोटीचा लांबचा प्रवास, इंग्लंडला भरपूर थंडी म्हणून गांधीजीच्या कार्यकर्त्यांनी उबदार कपडे गांधीजींसाठी बोटीवर चढवले; पण गांधीजींनी मात्र ते कपडे परत पाठवले. कारण त्यांना वाटे माझ्या बांधवांकडे अंग झाकण्यासाठी पुरेसे कपडे नाहीत, मग आपण अंगभर उबदार कपड्यात कसे फिरायचे?
गांधीजी नेसत्या पंचावरच बोटीवर फिरत होते. बोटीवरील कोचावर बसून लिहित होते. त्या बोटीवर असलेल्या प्रवाशांमध्ये एक इंग्रज अधिकारीसुद्धा प्रवास करीत होता. उघडेबंब गांधीजी पाहून त्या इंग्रजाला गांधीजींचा राग आला. त्याला वाटले, काय हा माणूस आहे. नुसता पंचा लावून संपूर्ण बोटीवर हिंडत आहे. काहीच कसं वाटत नाही याला. त्या इंग्रजाने मग रागानेच आपल्याजवळील छोट्या छोट्या तीन कागदांच्या चिटोऱ्यांवर गांधीजींबद्दल अपशब्द, वाईट असे लिहिले आणि ते तीन चिटोरे टाचणीने एकत्र टाचून गांधीजींकडे पाठवले. गांधीजींनी शांतपणे ते चिटोरे वाचले. त्यानंतर त्यांनी चिटोऱ्यांची टाचणी काढून ते कागद पाण्यात सोडून दिले आणि मग त्या माणसाकडे पाहून ते शांतपणे म्हणाले, “थॅंक्यू’!
तो माणूस भलताच चिडला. त्याला वाटले, हा काय असभ्य प्रकार आहे. आपण या माणसाबद्दल एवढे वाईट लिहून पाठवलंय आणि हा माणूस आपल्याला थॅंक्यू म्हणतोय. त्या इंग्रजाने पुन्हा मागचीच कृती केली. त्याने पुन्हा आपल्याजवळील छोट्या तीन चिटोऱ्यांवर गांधीजींना अक्षरश: शिव्या लिहिल्या. मग त्या चिटोऱ्यांना टाचणी लावून ते चिटोरे पुन्हा गांधीजींकडे पाठवले. गांधीजींनी चिटोऱ्यांवरील शब्द शांतपणे वाचले. मग टाचणी काढून ते चिटोरे त्यांनी पुन्हा पाण्यात सोडले आणि त्या माणसाकडे पाहून ते पुन्हा शांतपणे म्हणाले, “थॅंक्यू’! गांधीजींची कमालीची शांतता पाहून त्या माणसाची अस्वस्थता मात्र वाढली. त्याला वाटले, आता मात्र हद्दच झाली. तो माणूस रागारागानेच गांधीजींजवळ गेला आणि म्हणाला, “काय चालवलंय तुम्ही हे?’ गांधीजी म्हणाले, “मी काहीच चालवले नाही, जे काय चालवलंय ते तुम्हीच, मी आपला शांत आहे.’ तो माणूस म्हणाला, “मी दिलेले चिटोरे वाचले?’
गांधी म्हणाले, “हो, अगदी,’
“काय लिहिलं होतं त्यात?’
“शिव्या लिहिल्या होत्या त्यात?’
“मग तुम्हाला एवढ्या शिव्या लिहूनही तुम्ही शांतच, काहीच कसं वाटत नाही तुम्हाला.’
“पण मी त्या शिव्या स्वीकारल्याच नाहीत. मी त्या या महासागराच्या पाण्यात सोडून दिल्या. मला त्या लागल्याच नाहीत. मग मी कशाला विनाकारण रागावू.’
तो इंग्रज पुढे म्हणाला, “मग थॅंक्यू कशाबद्दल?’ गांधीजी म्हणाले, “तुम्ही चिटोरे पाठवताना त्या चिटोऱ्यांना ज्या दोन टाचण्या लावल्या होत्या. त्या मी ठेवून घेतल्या आहेत. त्या दोन टाचण्या तुमच्याकडून मला मिळाल्या म्हणून मी थॅंक्यू म्हणालो.’
गांधीजीमधील परमशांतता पाहून तो माणूस अवाक् झाला. त्या किरकोळ देहयष्टीच्या माणसाची बौद्धिक उंची त्याच्या डोळ्यात सामावत नव्हती. गांधीजींचे शब्द त्याच्या मनात रुंजी घालत होते. गांधीजींशी बोलून त्याला बरंच काही मिळाल्यासारखे वाटले म्हणून त्याने मनःपूर्वक गांधीजींना नमस्कार घातला आणि त्याच्याही तोंडून नकळत शब्द बाहेर पडले “थॅंक्यू।
कसा वाटला प्रसंग?’
बाळू म्हणाला, “बाबा, मी चुकलो. हा प्रेरक प्रसंग सांगितल्याबद्दल बाबा मनापासून थॅंक्यू.’
एकनाथ आव्हाड