– अरुण गोखले
जरा बारकाईने पाहिले तर आपल्या असे लक्षात येते की, जेव्हा गावातून नगरपालिकेची गाडी मोकाट कुत्र्यांना उचलून देण्यासाठी फिरत असते ना तेव्हा ते लोक अशीच कुत्री उचलून गाडीत टाकतात की ज्या कुत्र्यांच्या गळ्यात साखळी नाही किंवा बिल्ला नाही. असं का? तर ती त्या कुत्राच्या गळ्यातली साखळी किंवा बिल्ला जो असतो ना तो या जीवाचा कोणीतरी मालक आहे, याचा कोणीतरी वाली आहे, याची ती खूण असते.
आध्यात्म किंवा परमार्थातसुद्धा ह्याच्या गळ्यात माळ आहे, कपाळी गंधाचा नाम, टिळा, भस्माचा त्रिपुंड आहे, तो जीव हा कोणाचा तरी शिष्य, अनुग्रहित, भक्त आहे, उपासक आहे, नामधारक आहे याची ती खूण असते. संसारात व्यवहारात समाजात जसं स्त्रीच्या कपाळीचं कुंकू आणि तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र हे जसं तिचं संरक्षण कवच असतं, तिचा कोणी तरी मालक आहे, पाठीराखा आहे ह्याची ती निशाणी असते. तसेच परमार्थातही नामाची साखळी/बिल्ला हा जीव कोणत्या ना कोणत्यातरी सांप्रदायाचा, पंथाचा उपासक आहे ही त्याची खूण असते.
आपल्या गळ्यात सद्गुरूच्या नावाचा बिल्ला असेल, भक्तीच्या दास्यत्वाची साखळी, माळ असेल तर आपण बेवारशी, एकटे, मोकाट राहात नाही. तर आपण कोणाच्या ना कोणाच्या तरी उपासक आहोत, ती आपली एक ओळख आपोआप तयार झालेली असते. त्यामुळेच अगदी अंत काळीची यमाची गाडी आपल्याला बेवारस म्हणून मोकाट म्हणून उचलून नेत नाही. नरकात नेऊन टाकत नाही तर आपण शेवटी आपल्याला आपल्या उपास्य देवतेच्या दारातच नेतात.
नामाच्या साखळीने आणि सद्गुरूंच्या नाम बिल्याने अनेक जीवांचा मरणाच्या दारातही कसा उद्धार झाला याची अनेक उदाहरणे आपल्या पोथ्या पुराणात आहेत. आपल्या गळ्यातली सद्गुरूंकडून मिळालेली नामाची माळ, ही आपल्या गळ्यातली बंधनाची साखळी नसते तर ती आपले संरक्षण करणारी आपल्याला हा कोणाचा तरी शिस्य, उपासक नामधारक, सेवक, भक्त आहे याची ओळख प्राप्त करून देणारी असते. जीव आणि शिव, देव आणि भक्त, सद्गुरू आणि शिष्य यांच्यातील ते एक अदृश्य अतूट बंधन असते. त्या नामाच्या साखळीत “तुझा भक्त’ होऊन राहण्यातच खरी सार्थकता असते.