विराट कोहली जेव्हा भारतीय क्रिकेटमध्ये दाखल झाला तेव्हा वीरेंद्र सेहवाग व गौतम गंभीर या दिल्लीच्याच खेळाडूंसारखा उर्मट नव्हता. त्याने सचिनचे शिष्यत्व पत्करल्यावर तर तो ध्यानस्थ वाटला. आपल्या प्रत्येक डावाची रचना त्याने आधीच ठरवली असावी असेच त्याच्या खेळातून सातत्याने दिसले. मात्र, आज त्याची फलंदाजी पाहून वाईट वाटते. भारतीय क्रिकेटला मिळालेले हे वरदान फुकट जाणार का, अशी भीती वाटत आहे. हे ग्रहण ठरावे सूर्यास्त नको.
जागतिक क्रिकेटमध्ये सर डॉन ब्रॅडमन यांचा अपवाद वगळता प्रत्येकालाच बॅडपॅचचा सामना करावा लागला आहे व पुढेही करावा लागेल. आज सोन्याच्या ताटात जेवण करत असलेल्यांनी कोहलीवर शिंतोडे उडवू नयेत. मागे एकदा झिम्बाब्वेचा तत्काली कर्णधार अँडी फ्लॉवर म्हणाला होता, की जगात दोन प्रकारचे फलंदाज असतात, एक सचिन तेंडुलकर व बाकी इतर. या इतरांमधूनच कोणीतरी सचिन होण्याचा प्रयत्न करत होता. जे रोहित शर्माला जमले नाही ते कोहलीने करून दाखवले.
सचिनच्या 100 आंतरराष्ट्रीय शतकांचा कोहलीने सत्तर शतके फटकावत पाठलाग सुरू केला मात्र, अर्ध्यावरती डाव मोडला अशी काहीशी गत झाली व हा पठ्ठ्या याच क्रमांकावर अडकून पडला आहे. जेव्हा सचिनची 99 आंतरराष्ट्रीय शतके झाली होती व शंभरी पार होत नव्हती तेव्हाही असेच चाहते आसुसलेले होते. कधी एकदा त्याच्या शतकांचे शतक होते हे पाहण्यासाठी त्याच्या प्रत्येक सामन्याला प्रचंड गर्दी होत होती व त्याचे शतक प्रत्येक वेळी हुकत होते. सचिन या काळात ज्या पद्धतीने बाद होत होता, ते व आज कोहली ज्या पद्धतीने बाद होत आहे ते पाहून खरेच उदासी येते. इतके मोठे फलंदाज अशा का चुका करतात यावर आपण चर्चेच्या फैरी झाडत आहोत. एकदाचे सचिनने शंभरावे शतक साकार केले व जीव नावाची वस्तू भांड्यात पडली. आता घोर कोहलीने लावला आहे.
ज्या वेगात त्याने शतकांची सत्तरी गाठली तो वेग गेल्या जवळपास तीन वर्षांत इतका मंदावेल असे वाटलेच नव्हते. त्याला धावांसाठी झडगताना पाहून तुफान किंवा गंगा-जमुना-सरस्वतीचा अमिताभ आठवू लागला आहे. ओढून ताणून केवळ दिग्दर्शकाशी मैत्री म्हणून किंवा त्याला कर्जातून बाहेर काढण्यासाठी म्हणून बच्चन साहेबांनी हे असे काही अनाकलनिय चित्रपट केले. आज कोहली जेव्हा नवोदित गोलंदाजाच्या गोलंदाजीवर एखाद्या क्लब दर्जाच्या फलंदाजासारखा बाद होतो तेव्हा तो अशाच काही नव्या गोलंदाजांना त्यांच्या संघातील स्थान पक्के करण्यासाठीच तर बाद होत नाही ना अशी शंका येते.
भारतीय क्रिकेटच्या क्षितिजावर कोहलीचा उदय झाला तेव्हा जगभरातील वेगवान गोलंदाजांविरुद्ध त्याने आघाडी उघडल्यासारखा तो खेळत होता. श्रीलंकेचा मलिंगा असो वा अन्य कोणीही त्याने आपली आक्रमकता कधीही कमी होऊ दिली नाही. तोच कोहली आज ऑफ स्टम्पच्या बाहेर जात असलेल्या चेंडूला सोडून चाललेल्या प्रेयसीला स्पर्श कारावा तसे छेडतो. आपला ऑफ स्टम्प कुठे आहे हे माहीत असलेला फलंदाज सर्वश्रेष्ठ मानला जातो.
कोहलीला ऑफ स्टम्पवर येऊन फटके खेळायला आवडतात. मात्र, आता तो हेच फटके खेळताना सहज झेल देत बाद होताना पाहावत नाही. 2019 साली बांगलादेशविरुद्ध त्याच्या बॅटमधून शतक साकार झाले होते त्यानंतर शतकांचाच नव्हे तर अर्धशतकी खेळींचाही दुष्काळ दिसू लागला आहे. बॅडपॅच आहे व तो जाईल असे म्हणावे तर गेल्या तीन वर्षांपासून हा दुष्काळ जाण्याचे नावच घेत नाही. कधीकाळी ज्याची फलंदाजीची सरासरी 50 पेक्षाही जास्त होती तो आज केवळ विशीच्या सरासरीत फलंदाजी करत आहे. त्याच्यावर तसेच त्याची अभिनेत्री पत्नी अनुष्का शर्मा हिच्यावरही अत्यंत असभ्य भाषेत काही नामवंतांनीही टीका केली मात्र, तरीही त्याने संयम सोडला नाही. टीकाकारांना कोणतेही विपरीत उत्तर त्याने दिले नाही हेच त्याचे सचिनकडून मिळालेले संस्कार व शिष्यत्व म्हटले पाहिजे. ज्याला भारतात क्रिकेटचा देव म्हणतात त्या सचिनलाही अशाच अपयशी कालखंडातून जावे लागले होते. तेव्हा त्याच्या निवृत्तीची वेळ जवळ आल्याचीही टीका झाली. मात्र, त्यानंतर जो सचिन दिसला तो जागतिक क्रिकेटने कधीही पाहिला नव्हता. ऑस्ट्रेलियासारख्या जागतिक क्रिकेटवर अधिराज्य गाजवत असलेल्या संघातील बलाढ्य गोलंदाजांना त्याने कोकरू करून टाकले होते. शेन वॉर्नसह जगभरातील गोलंदाज त्याचे मांडलिक बनल्याचे आपण सगळ्यांनीच पाहिले आहे. सचिनने ज्या पाऊलवाटेचा हमरस्ता केला त्याचा कोहलीने एक्सप्रेस वे तयार केला मात्र, आता कोहलीच ही वाट विसरल्याचे जाणवते.
संघ व सामना कोणताही असो, कसोटी, एकदिवसीय किंवा टी-20 यासाठी निवडल्या जात असलेल्या भारतीय संघात कोहलीचे नाव पहिले लिहिले जात होते व नंतर कर्णधार व बाकी खेळाडूंची नावे येत होती. आज कोहलीचे नाव घेणे पुरुषांनी सातत्याने उखाणा घेण्याइतकी दुर्मीळ गोष्ट ठरत आहे. फलंदाजीला येताना तो निराशाजनक मानसिकतेतून येतो, त्याच्या चालण्यात किंवा खेळपट्टीवर टॅपींग करण्यात तो पूर्वीचा रुबाब व फलंदाजीत वीव्हियन रिचर्डससारखा उद्दामपणा दिसत नाही. नाट्यवाचन स्पर्धेत अभिनय करून थेट अमिताभसमोर उभा राहिलेला अभिनेता कसा वाटतो तसा कोहलीसमोर जगातील प्रत्येक गोलंदाज वाटत होता. आज कोहलीचा दुय्यम अभिनेता झाला असून बाकी फलंदाज भाव खाऊन जात आहेत. मागे एकदा सोशल मीडियावर एक मीम व्हायरल होत होता. कोहली फलंदाजीला गेलेला असताना ड्रेसिंगरूममध्ये फोन येतो. कोहलीशी बोलायचे आहे असे तो फोन करणारा सांगतो. त्यावर कोहली फलंदाजीला गेला आहे, असे फोन घेणारा म्हणतो. त्यावेळी ठीक आहे मी होल्ड करतो, असे फोन करणारा म्हणतो. मला वाटते इतका मोठा उपमर्द करणारा संदेश यापूर्वी कोहलीच्या वाट्याला कधीही आला नसेल.
खूप वर्षांपूर्वी विक्रमादित्य सुनील गावसकर इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत साफ अपयशी ठरल्यावर पुण्यात त्यावेळचे प्रख्यात खेळाडू व प्रशिक्षक कमल भांडारकर सरांकडे आले होते व त्यांना सराव सत्रात पंचाच्या जागी उभे करून आपल्या फलंदाजीतील चुका सांगण्याचे काम सोपवले होते व भांडारकर सरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार खेळ करत गावसकर यशस्वी ठरले होते. सचिननेही ऑस्ट्रेलियाचा बलाढ्य संघ भारतात कसोटी मालिका खेळण्यासाठी येणार हे माहिती झाल्यावर शेन वॉर्नचा सामना करण्यासाठी खास प्रकारचा सराव केला होता. देशातील सर्वात नावाजलेला लेग स्पीन गोलंदाज लक्ष्मण शिवरामकृष्णन यांची मदत घेत लेगसाइडला खेळपट्टी रफ करत सचिनने सराव केला होता. वॉर्नचे चेंडू लेगसाइडला जास्त प्लेस होतात व तेथून फिरकी घेत धोकादायक ठरतात हे त्याने जाणले होते. असा अभ्यास आता कोहलीला करण्याची वेळ आली आहे. लवकरात लवकर त्याने हे करावे अन्यथा त्याच्या कारकिर्दीला धोका नुसता निर्माण झाला नसून त्याचे मळभ जमा होऊ लागले आहे.
भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडही तेच काम कोहलीसाठी करू शकतो जे भांडारकर सरांनी गावसकरांसाठी केले. नेटमध्ये सराव करताना द्रविड यांनाच पंच म्हणून उभे करत आपला सराव पाहण्याची विनंती करायला हवी. चेंडूचा टप्पा व त्याच्याजवळ पाय येतात का, डोके स्थिर राहते का, डावा हाताची बॅटवरची ग्रीप घट्ट राहते का, हे असे काही मुद्दे कोहलीने सोडवले तर त्याला भरात यायला वेळ लागणार नाही. इतकेच नव्हे तर गावसकर म्हणाले तसे कोहली चेंडूवर जाण्याची घाई करत आहे. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतही हेच दिसून आले होते. ऑफ स्टम्पच्या बाहेर जात असलेल्या चेंडूची छेडखानीच त्याला भोवत आहे. काही काळ मिळालेल्या विश्रांतीचा मानसिकता सकारात्मक करण्यासाठी कोहलीने उपयोग करावा व एकदा आपल्या आजवरच्या कामगिरीला विचारात घेत व भविष्यात काय करायचे आहे याचा विचार केला तरी कोहलीला प्रश्नाचे उत्तर सापडेल, जे त्याला गेल्या तीन वर्षांत मिळालेले नाही. कोहलीला सध्या येत असलेले अपयश हे ग्रहण ठरावे सूर्यास्त नव्हे हीच काय ती अपेक्षा आहे.
अमित डोंगरे