आपण आपल्या जीवनात बऱ्याच वेळा अपेक्षाभंगाचा सामना करत असतो. याच अपेक्षाभंगातून आपण आपले जीवन विनाकारण दुःखी करून ठेवत असतो. हे टाळण्यासाठी एक तर अपेक्षाभंग होऊच नये आणि झालाच तर त्याला कसे सामोरे जावे नेमके याच विषयी थोडेसे…
आपण नेहमीच कोणाकडून काहीतरी अपेक्षा ठेवीत असतो. तसेच स्वतःकडूनही जास्त अपेक्षित करत असतो. मात्र आपणास सत्य परिस्थिती काय आहे याची जाणीव असायला हवी. बऱ्याच वेळा आपण भ्रमात वावरत असतो. हा आपला भ्रमाचा भोपळा आपणच फोडायला हवा. जर दुसऱ्याकडून आपला भ्रमाचा भोपळा फुटला तर आपल्याला जास्त त्रास होतो.
आपण कोणाकडून काही अपेक्षा करीत असू तर आपली अपेक्षा रास्त आहे की नाही याची पडताळणी करून घ्यायला हवी. आपण कोणाला आपले काम करण्याप्रीत्यर्थ जर पैसे देत असू तर त्याने आपले काम पूर्ण करावे ही आपली अपेक्षा रास्तच आहे. कोणी आपल्याला फुकट एखादी वस्तू द्यावी ही अपेक्षा रास्त असेलच असे नाही.
आपण बऱ्याच वेळा जास्त अपेक्षा ठेवण्याची चूक करतो. जेवढी जास्त अपेक्षा आपण ठेवू तेवढा मोठा अपेक्षा भंग होण्याची शक्यता असते की ज्याचा आपल्याला खूपच मानसिक त्रास होतो. आपल्याला अपयश पदरी आले तरी ते स्वीकारण्याची आपली मानसिक तयारी हवी. याउलट यश प्राप्त झाले तर ते स्वीकारण्याची विनम्रता आपल्यात हवी. थोडक्यात, आपण स्वतःला ओळखायला हवे, म्हणजे आयुष्यात आपल्याला कधीच निराशेचा सामना करावा लागणार नाही. बऱ्याच वेळा आपण एखाद्या व्यक्तीच्या भरोश्यावर काही कामाचे नियोजन करतो. पण ती व्यक्ती ऐन वेळेस आपल्याला दगा देते आणि आपले सर्व काम व नियोजन चुकते.
ज्या व्यक्तीला आपण कामासाठी गृहित धरले आहे त्या व्यक्तीला आपण सगळी पूर्व कल्पना दिली आहे का? नाहीतर ऐनवेळी ती व्यक्ती कामास नकार देऊ शकते, म्हणूनच आपण कोणालाही गृहित धरून काम करू नये. आपण ज्या व्यक्तीच्या भरोश्यावर कामाचे नियोजन केलेले आहे त्या व्यक्तीच्या मनात काय चाललेले आहे हे जाणून घ्यावे. त्या व्यक्तीला स्पष्टपणे विचारून घ्यावे की दिलेले काम करण्याची तयारी आहे की नाही? जर नसेल तर दुसऱ्या व्यक्तीला आपण जबाबदारी सोपवू शकतो.
आपण दुसऱ्या व्यक्तीसाठी बरेच काही करतो. अगदी आपला वेळ, पैसे खर्च करतो. परंतु त्याची जाणीव ती व्यक्ती ठेवत नाही आणि आपण केलेली मदत विसरून जाते. जेव्हा आपल्याला काही मदतीची आवश्यकता असते त्यावेळी ती व्यक्ती आपल्याला मदत करीत नाही. आपली त्या व्यक्तीकडून असलेली अपेक्षा काही चुकीची नसते पण आपल्याला मात्र मानसिक त्रास होतो. असे जरी घडले तरी आपण झालेल्या अपेक्षाभंगाबद्दल आणि त्या व्यक्तीच्या वागण्याबद्दल जास्त विचार करीत बसावयाचे नाही. इतर कोणा दुसऱ्या व्यक्तीकडून मदत मिळते का ते पाहावे.
एखादी व्यक्ती आपल्यापेक्षा जास्त चांगल्या व अनुकूल परिस्थितीत असते. अशा वेळी ती व्यक्ती आपल्याशी चांगले वागत नाही. आपण मात्र त्या व्यक्तीशी कामा पुरतेच संबंध ठेवावेत. एकदा का आपले काम झाले की त्या व्यक्तीची आपल्या दृष्टीने किंमत शून्य होते. अशावेळी आपण त्या व्यक्तीशी संपर्कच तोडून टाकायचा. दुसऱ्या व्यक्तीने आपल्याबरोबर अगदी चांगलेच वागले पाहिजे अशी जास्त अपेक्षा कधीच ठेवायची नाही.
प्रत्येकाचा आपल्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असू शकतो. जेव्हा आपण इतरांच्या दृष्टीने निरुपयोगी ठरतो त्यावेळी त्यांचा आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो त्याप्रमाणे वागणेही बदलते. यावेळी मात्र आपल्याला मानसिक त्रास होतो. हे टाळण्यासाठी आपण आपले एकमार्गी सरळ वागणे ठेवावे. आपण इतरांना केलेली मदत, केलेले सहकार्य हे करताना परतफेडीची कोणतीही अपेक्षा मनात ठेवू नये.
आपण योग्य व्यक्तीला मदत किंवा सहकार्य करीत आहोत का हेही पडताळून पाहावे. एखादेवेळी आपण चुकीच्या किंवा अयोग्य व्यक्तीला मदत करून जातो नंतर पश्चात्ताप करण्याची वेळ येते. काही व्यक्ती इतरांना त्रास देत असतात, समाज विघातक कृत करीत असतात अशा व्यक्तींना मदत करून त्यांच्याकडून चांगल्या वागणूकीची अपेक्षाच करता येत नाही.
आपण इतरांकडून काही अपेक्षा ठेवत असतो तसेच इतरही बरेचजण आपल्याकडूनही काही अपेक्षा ठेवत असतात. पालक आपल्या मुलांकडून काही अपेक्षा ठेवत असतात. प्रेक्षक गायक, खेळाडूंकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा ठेवत असतात. अनेकजण अनेकांकडून काही अपेक्षा करीत असतात. बऱ्याच वेळा या अपेक्षांचे ओझे इतके जास्त होते की आपल्याला ते पेलवतच नाही. इतरांना अपेक्षित असलेली कामगिरी आपल्याला करणे शक्य होतेच असे नाही. यामुळे आपल्याला खूपच मानसिक त्रास होतो. हा त्रास होऊ नये म्हणून आपण इतरांच्या अपेक्षांच्या पेटीचे झाकण उघडायचेच नाही.
आपण फक्त आपल्या कामावरच लक्ष केंद्रित करावयाचे. अशा एकाग्र मनानेच कामगिरी चांगली होणार आहे. इतर व्यक्तींकडून हसे होवो किंवा गुणगान गायले जावो आपल्याला त्याच्याशी काहीच कर्तव्य नाही. आपले काम पूर्ण होईल तेव्हाच आपण सभोवती काय घडते आहे कोण काय करते आहे याकडे लक्ष द्यायचे. आपली कामगिरी चांगली झाली नाही अपेक्षीत ते साध्य करू शकलो नाही तर आपल्या मनाला प्रश्न करावयाचे ते म्हणजे “माझ्याकडून प्रयत्नांमध्ये कमी पडलो का? आपण आपले 100 टक्के दिले का?’ समाधानकारक उत्तर आपल्या मनाकडून मिळाले म्हणजे झाले. आपण कुठे जर काही पडलो नाही तर ज्या आपल्या हाताबाहेरच्या कारणांमुळे आपल्याला यश मिळाले नाही तर दुःख करीत बसावयाचे नाही.
आपण आपल्या मनाशी एक पक्की खूणगाठ बांधावयाची ती म्हणजे “गो फॉर द बेस्ट अँड प्रिपेअर फॉर द वर्स्ट’ म्हणजेच आपण कोणतेही काम करत असताना जे सर्वोत्तम आहे तेच करण्याचा प्रयत्न करावा; पण त्याच बरोबर वाईटही पदरात पडू शकते याचीही मानसिक तयारी ठेवावी. यामुळे आपण आपल्या आयुष्यात कधीच अपेक्षाभंगाच्या त्रासाला सामोरे जाणार नाही.
आपण आपल्या मनो देवतेच्या गाभाऱ्यात बसून आपल्या सर्वोत्तम कामगिरीचे पुष्प आपल्या मनोदेवतेला अर्पण करावे आणि चांगल्या किंवा वाईट कुठल्याही फळाची अपेक्षा ठेवू नये. आपल्या मनोदेवतेकडून मिळणारे प्रसादरूपी फळ हे चांगलेच असणार व चवीलाही मधूर असणार ज्यामुळे आपण यश-अपयशाला शांत मनानेच स्वीकारू शकू आणि अपेक्षा भंग टाळू शकू.
– अनिकेत भालेराव