लोकसभा निवडणुकांना 8 ते 10 महिने असा कालावधी असला तरी राजकीय पक्षांच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. भाजपने 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी विशेष तयारी सुरू केली आहे. कारण, सलग तिसऱ्यांदा पुन्हा मोदीच पंतप्रधान हे मिशन भाजपने निश्चित केले आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीची तयारी म्हणून भाजपने नुकतीच तेलंगणा, आंध्र प्रदेश, झारखंड आणि पंजाबमध्ये नव्या प्रदेशाध्यक्षांची निवड जाहीर केली. तथापि, विरोधी पक्षांनी एकत्र येऊन केलेली “इंडिया’ ही विरोधी आघाडी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत देशाच्या राजकारणाला एक नवे वळण देणारी ठरू शकते.
देशातील राजकीय पक्षांनी आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, तेलंगणा, मिझोराम या सहा राज्यांत काही महिन्यांनी विधानसभेच्या निवडणुका आहेत. भाजपने 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी विशेष तयारी सुरू केली आहे. कारण, सलग तिसऱ्यांदा पुन्हा मोदीच पंतप्रधान हे मिशन भाजपने निश्चित केले आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीची तयारी म्हणून भाजपने नुकतीच तेलंगणा, आंध्र प्रदेश, झारखंड आणि पंजाबमध्ये नव्या प्रदेशाध्यक्षांची निवड जाहीर केली.
आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी विरोधी पक्षांनी प्रथम पाटण्यामध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर दुसरी बैठक बंगळुरू येथे झाली. या आघाडीत आता जवळपास 26 पक्ष एकत्र आलेले आहेत.
भाजपने विरोधी आघाडीला जशास तसे उत्तर देण्यासाठी दिल्लीत बोलावलेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) घटक पक्षांच्या बैठकीत 38 पक्ष असल्याचा दावा केला. त्यानुसार राष्ट्रीय लोकशाही आघाडीची सुरुवात ही देशात स्थिरता आणण्यासाठी झाली असून महिला, गरीब, वंचित आणि विशेषत: सर्वच घटकांचा विकास हाच “एनडीएचा’उद्देश असून त्यासाठीच आम्ही काम करत आहोत, सर्व जनतेचा आपल्याच आघाडीवर विश्वास हे जगभरातील इतर देशांनीही माहीत असल्याने ते आपल्या सरकारबरोबर मैत्री वाढवत आहे, असे देशाच्या पंतप्रधानांनी सांगितले. तसेच “एनडीए’ हा अटलबिहारी वाजपेयी यांचा वारसा आहे.
आपला देश आगामी 25 वर्षांत विकासाचे लक्ष घेऊन पुढे जात आहे. या काळात “एनडीए’ची फार मोठी भूमिका असेल, एनडीएचा अर्थच, न्यू इंडिया, डेव्हलपमेंट नॅशन आणि ऍस्पिरेशन ऑफ रिजन आहे. ही त्रिशक्ती असून त्यामुळे सर्व जनतेचा आपल्यावर विश्वास आहे. सर्व देश आपल्याकडे एक सकारात्मक शक्ती म्हणून पाहात आहेत. नकारात्मक उद्देश घेऊन जी आघाडी बनत आहे ते कधीच यशस्वी होऊ शकत नाहीत, असे सांगत पंतप्रधानांनी मागील नऊ वर्षांत गरीब आणि वंचित घटकांसाठी राबविलेल्या योजनांची माहिती दिली.
“इंडिया’च्या बैठकामध्ये आता आम्ही 26 पक्ष एकत्र आल्यामुळे पंतप्रधानांचे आणि त्यांच्या भाजपचे धाबे दणाणले असून आमची ही बैठक पाहून त्यांनी 30 पक्षांची बैठक बोलावली. तसेच पंतप्रधानपदाच्या दावेदारीमुळे या महाआघाडीसाठीचे प्रयत्न निष्फळ ठरू नयेत म्हणून कॉंग्रेस अध्यक्षांनी कॉंग्रेसला पंतप्रधानपदात रस नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे भाजपाला रोखणे हाच विरोधकांचा एकमेव उद्देश असल्याचे स्पष्ट केले आहे. इंडिया म्हणजे भारताला वाचवायचे आहे, देशाला वाचवायचे आहे. लोकशाही खरेदी करण्याची सौदेबाजी सुरू आहे. पण आता भारत जिंकणार, भाजप हरणार, इंडिया जिंकणार म्हणजेच देश जिंकणार.
9 वर्षांपूर्वी देशातील लोकांनी बहुमतांनी पंतप्रधानांना जिंकवले. 9 वर्षे त्यांच्याकडे विकास करण्याची संधी होती. पण त्यांनी प्रत्येक क्षेत्र उद्ध्वस्त केले, अर्थव्यवस्था उद्ध्वस्त केली, रेल्वे, विमानतळ, कंपन्या सर्व विकले आणि आज देशात शेतकरी, व्यापारी, युवक, गृहिणी सर्व दु:खी आहेत म्हणून आम्ही एकत्र आलो आहोत आणि हा असा भारत असेल जेथे गरिबाला शिक्षण मिळेल, युवकांना रोजगार मिळेल देशाचा विकास होईल. सध्या देशाचे सर्व धन निवडक लोकांच्या हाती जात आहे. ही लढाई “एनडीए’ विरुद्ध “इंडिया’ अशी आहे. त्यामुळे जेव्हा कोणी इंडिया विरोधात उभा राहतो तेव्हा यश इंडियालाच मिळते, असे विरोधी पक्षांनी सांगितले.
भाजप विरोधी पक्षांची ही एकजूट आगामी सहा राज्यांतील विधानसभा आणि पुढील सार्वत्रिक लोकसभा निवडणूक यामध्ये भाजपला कशा प्रकारे आत्मविश्वासाने पराभव करण्यासाठी यशस्वी होते हे तितकेच महत्त्वाचे आहे. नुकतेच रा. स्व. संघाचे मुखपत्र “ऑर्गनायझर’ने ही आपले मत व्यक्त करून एकट्या पंतप्रधानांच्या नावावर कुठेही भाजपला सहजासहजी विजय मिळण्याची सुतराम शक्यता नाही. त्यातच मोठे राज्य असलेला मध्य प्रदेश भाजपकडून कॉंग्रेसकडे जाण्याचा ओघ सुरू आहे. भाजप राष्ट्रीय पक्ष असूनही उत्तर प्रदेश आणि गुजरात या दोन प्रदेशातच त्यांची चलती आहे.
हा देश विशेषत: धार्मिक असल्याने इथला सामान्य माणूस भोळाभाबडा पापभिरू अन् पराकोटीचा सहनशील आहे. तथापि, जसे रबर प्रमाणाबाहेर ताणले तर तुटते, तसेच इथल्या माणसांच्या सहनशीलतेचा अंत पाहिला तर शेवटी ते बंड करून उठाव करतात हे ही खरं आहे. ईशान्य भारतातील काही राज्यांचा विचार करणे आज आवश्यक असून त्यातील मणिपूर हे राज्य दोन महिन्यांपासून जळत आहे. बलात्काराच्या गंभीर घटना झाल्या आहेत. आजही ही आग विझायला तयार नाही. मैतेई हा मणिपूरमधला बहुसंख्याक समाज. तो सपाट मैदानी प्रदेशात वस्ती करून राहतो.
नागा आणि कुकी हे टोळ्या करून डोंगराळ प्रदेशात वस्ती करणारा ट्रायबल समाज मैती आणि कुकी एकमेकांचे शत्रू बनले आहेत. ते एकमेकांची घरे आग लावून भस्म करत आहेत. एकमेकांची हत्या करताहेत. तिथे लष्कर आहे पण परिस्थिती पुढे ते हतबल आहे. सरकारने नेमलेल्या शांतता आणि सलोखा समितीवर स्थानिक संघटनांनी बहिष्कार टाकलाय. जनता सत्ताधाऱ्यांच्या तेथील आमदारांची घरे पेटवत आहेत. विरोधी पक्षाच्या अनेक नेत्यांनी संसदेत या प्रश्नावरून केंद्र सरकारवर अविश्वास ठरावाची मागणी केली, महागाई, बेरोजगारी, आरोग्य, शिक्षण, खासगीकरणासारखे एकेक मुद्दे घेऊन त्याबाबतचे सरकारचे अपयश याबाबत विरोधी आघाडी “इंडिया’आक्रमक दिसून येते. या सर्व बाबींचा पुढील निवडणुकांवर जनता कोणत्या आघाडीला स्वीकारते हे महत्त्वाचे आहे, हे यथावकाश कळेल.
विरोधकांच्या मते, संसदेत कार्यप्रणाली महत्त्वाची असते तांत्रिकदृष्ट्या हे कायदे मंडळ असले तरी प्रत्यक्षात ते लोकशाही व्यवस्था चालविणारे लोकशाही प्रणालीचे मोठे आग आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पक्षीय अधिनिवेशाच्या बाहेर जाऊन काम करण्याचे वर्तन यावरच संसदीय प्रणाली चालते स्थिरावते; परंतु अलीकडे हे सर्व बदलले आहे असे विरोधकांचे ठाम मत असून, मंत्री, सभागृहाचे नेते गोंधळ घालायला प्रोत्साहन देतात आणि विरोधी पक्षांच्या सदस्याला सभागृहात बोलू दिले जात नाही. त्यांच्या समोरील माइक बंद केले जातात, त्यांची भाषणे ही संसदेच्या कामकाजातून काढली जातात.
त्याचप्रमाणे देशाचे प्रमुख अधिवेशनाच्या काळात संसदेत असतात. पण सभागृहात दिसत नाहीत. ते त्यांच्या खात्याच्या प्रश्नांना उत्तरे देत नाहीत. ते राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेत बोलतात. पण त्यांची शैली निवडणुकीतल्या भाषणासारखी असते विरोधकांची चेष्टा करणे त्यांची खिल्ली उडविणे यावर त्यांचा आजपर्यंतच्या काळापर्यंत अधिक भर राहिला आहे आणि एकूणच सरकारचा विरोधी पक्षांशी असलेला संवाद पूर्णपणे तुटलेला आहे, असे सर्वच प्रमुख विरोधी पक्षांचे मत आहे. याची पुढील राजकारणावर कसा परिणाम होईल हे भविष्यकाळात दिसेल आणि एकूणच होणाऱ्या निवडणुकांमधून विरोधी पक्षाला कसे यश प्राप्त होईल हे पाहणे गरजेचे आहे.
मागील काही वर्षांपासून या देशात अनेक दुभंगरेषा निर्माण झालेल्या आहेत. त्यांना साधण्यासाठी नेतृत्वामध्ये सहनशीलतेची शक्ती असणे अधिक गरजेचे आहे. राजकीय अभिसरण हा एक काळाचा विशेष असतो. त्याची दिशा त्या काळात असणारे सामाजिक सांस्कृतिक नेतृत्व ठरवत असते, त्या त्या काळातल्या अशा नेतृत्वाची समज, भान, परिपक्वता या बदलांची खोली आणि विस्तार निश्चित करीत असते. आधुनिक भारताच्या संदर्भात असे अनेक टप्पे वारंवार आले आहेत. लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी राज्यांचा आणि देशाचा कारभार विधानसभा, विधानपरिषद, लोकसभा आणि राज्यसभा यामध्ये विचारविनियम करून एकमताने चालवतात. राष्ट्राची एकता, एकात्मता टिकवणे आणि माणसामाणसांत बंधुभाव निर्माण करणे हे लोकशाहीचे उद्दिष्ट असते. सरकारचे कामकाज पसंतीस उतरले नाही तर नागरिक सरकारविरोधी मतदान करून सरकार सत्तेवरून उलथवून टाकू शकतात. आणीबाणी नंतर देशात असे घडले होते.
लोकशाहीत लोकांच्या हिताला सर्वाधिक महत्त्व असते. भारतात लोकशाहीच्या नावाखाली आज जे चालू आहे. ते लोकशाही धोरणांशी सुसंगत आहे की नाही याचा धांडोळा घेण्यासाठीसुद्धा वरील मूल्ये नजरेसमोर ठेवणे पुढील निडणुकांच्या विजयासाठी आवश्यक आहे.
लोकसभा निवडणुकांना 8 ते 10 महिने असा कालावधी असला ती आतापासूनच सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन केलेली “इंडिया’अर्थात इंडियन नॅशनल डेमोक्रॅटिक इन्क्ल्युझिव्ह अलायन्स ही विरोधी आघाडी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत देशाच्या राजकारणाला एक नवे वळण देणारी ठरू शकते.
– मोहन एस. मते