भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार कसोटी सामन्यांच्या मालिकेमुळे भारतातील खेळपट्ट्यांचा प्रश्न ऐरणीवर आला. फिरकी गोलंदाजीला साथ देणारी खेळपट्टी तयार करणे गैर नाही; पण लाल मातीचे आखाडे का तयार करता, हा मोठा प्रश्न आहे.
या कसोटी मालिकेतील पहिले तीनही कसोटी सामने अडीच ते तीन दिवसांतच संपले. याला कारण जितके सदोष तंत्राच्या फलंदाजीचे आहे तितकेच अनाकलनीय खेळपट्ट्यांचेही आहे. भारतातीलच नव्हे तर संपूर्ण भारतीय उपखंडातील खेळपट्ट्या पूर्वांपार फिरकी गोलंदाजीलाच साथ देतात हा इतिहास आहे.
मात्र, पूर्वी ज्या खेळपट्ट्या तयार केल्या जात होत्या त्यावर पहिल्या दोन ते तीन दिवस वेगवान गोलंदाजांना सकाळ व संध्याकाळच्या सत्रात मदत मिळायची. इतकेच नव्हे तर फलंदाजांसाठीही नंदनवनच असायचे. चौथ्या दिवसापासून यावर फिरकी गोलंदाजांचेच राज्य सुरू व्हायचे, पण आता पहिल्या दिवसापासूनच फिरकी गोलंदाजीला संपूर्ण साथ खेळपट्टी देत आहे हे या मालिकेद्वारे दिसून आले.
भारतीय फिरकी गोलंदाजीने संपूर्ण क्रिकेट जगतावर एकेकाळी राज्य केले. बलाढ्य संघही भारतात भारतीय संघाला पराभूत करू शकले नाहीत. कधीतरी काही संघांनी भारतात भारतीय संघाला पराभूत केले आहे पण ते अत्यंत विरळाच. आजची स्थिती पाहिली तर जवळपास प्रत्येक संघ मायदेशात जिंकतो. याला कारणही तसेच आहे की आपल्या संघाची जी ताकद आहे त्याला अनुसरूनच खेळपट्टी तयार केली जाते. जेणेकरून आपलाच संघ वरचढ ठरावा, पण या मालिकेसाठी ज्या खेळपट्ट्या तयार केल्या त्या लालमातीचे आखाडे ठरत आहेत. भले भले फलंदाज अत्यंत सामान्य दर्जाच्या फलंदाजासाराखे बाद होताना दिसले.
आज जागतिक क्रिकेटमध्ये इंग्लंड व ऑस्ट्रेलिया वगळता अन्य देशांत पुढे येत असलेले युवा क्रिकेटपटू पाहिले तर लगेचच लक्षात येते की ते टी-20 च्या व्हिटॅमिनवर पोसले गेले आहेत. ना त्यांच्याकडे तंत्र आहे, ना कॉपीबूक क्रिकेट, ना जिद्द त्यामुळे त्यांच्याकडून कसोटी क्रिकेटमध्ये संयमी खेळीची अपेक्षा करणे खरेतर गैर आहे. पण मग दोष कोणाला देणार. क्रिकेट मंडळांना, कर्णधारांना, प्रशिक्षक व संघ व्यवस्थापनाला की काळाला.
सहा दिवसांचे (विश्रांतीचा दिवस धरून) कसोटी क्रिकेट पाच दिवसांवर आले. आता तर काय कसोटी सामनेही पाच दिवस चालत नाहीत तर अडीच दिवसांतच निकाल लागतो. एकदिवसीय क्रिकेट कंटाळवाणे वाटू लागले व टी-20 क्रिकेट जन्माला आले. फास्ट फूड व जंक फूडच्या जमान्यात हॉटेलमधील राइसप्लेट जशी दिसेनाशी झाली तशीच कसोटी क्रिकेटमधील विक्रमादित्य सुनील गावसकर व राहूल द्रविड यांच्यासारखी तंत्रशुद्ध फलंदाजी अदृष्य झाली आहे.
आयसीसी काय करणार?
नागपूर, दिल्ली व इंदूर या तीन ठिकाणी पहिले तीन कसोटी सामने खेळवले गेले. या खेळपट्ट्यांवर कसोटीच्या दर्जाच्या खेळपट्ट्या नव्हत्या असा शेरा आयसीसीने मारला आहे. आता ते यात हस्तक्षेप करणार किंवा निश्चित काही संकेत ठरवणार का हे पाहावे लागेल. परंतु जी भूमिका आयसीसी भारतीय खेळपट्ट्यांबाबत घेईल तीच भूमिका इंग्लंड व ऑस्ट्रेलियातील खेळपट्ट्यांबाबत घेणार का हा सवाल आहे. कारण या दोन देशांचे प्राबल्य आयसीसीमध्ये असते व वर्षानूवर्षे त्यांच्या चुकांकडे आयसीसीने कानाडोळाच केला आहे.
मग ते स्लेजिंग असो, खेळपट्ट्या असो किंवा त्यांच्या खेळाडूंचे वर्तन असो कायम त्यांना पाठीशी घातले जाते. याच प्रश्नावरून विक्रमादित्य सुनील गावसकर यांनीही आयसीसीसह ऑस्ट्रेलिया व इंग्लंडच्या क्रिकेट मंडळांनाही खडे बोल सुनावले आहेत. आपला संघ जेव्हा ऑस्ट्रेलियात जातो किंवा अगदी गेल्या वर्षीही गेला होता, तेव्हा गाब्बा, सिडनी व ऍडलेडला कशा प्रकारच्या खेळपट्ट्या दिल्या होत्या ते ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळ विसरल्याचे दिसते. मात्र, आता आरोप-प्रत्यारोप करण्यापेक्षा आयसीसीने कसोटीसाठी खेळपट्ट्या तयार करत असताना काही निकष निश्चित केले पाहिजेत तरच स्थिती व परिस्थिती सुधारेल.
फलंदाजीची तंत्रशुद्धता संपली का?
कसोटी व एकदिवसीय क्रिकेट रटाळ झाले व टी-20 क्रिकेटचा भडीमार सुरू झाला आहे. त्यामुळे पूर्वी मला देशाकडून कसोटी क्रिकेट खेळायचे आहे असे स्वप्न पाहणारे खेळाडूही गायब झाले. केवळ टी-20 आणि त्याचाच बाजार बनलेले आयपीएल खेळण्याची स्वप्ने उराशी घेत युवा खेळाडू क्रिकेटच्या प्रशिक्षण शिबिरांना जातात हे कटू सत्य आहे. पूर्वी अशा शिबिरांत शॅडो क्रिकेट शिकवले जात होते. यातून खेळाडूला कोणता फटका मारताना स्टान्स, पायांची व डोक्याची स्थिती कशी असावी हे शिकवले जात होते. आता काय स्कुपशॉट, सूर्यापूल, अप्परकट, पंतस्वीप असे फटके लहान मुलांमध्ये लोकप्रिय बनले आहेत. मात्र, हीच धोक्याची घंटा आहे. फॉरवर्ड व बॅकवर्ड डिफेन्स आज कोणत्याही फलंदाजाच्या खेळात दिसत नाही अगदी विराट कोहलीच्या फलंदाजीतही ते दिसत नाही. नावांचा उल्लेख करायचा तर अजून स्टीव्ह स्मिथ व ज्यो रुट यांच्या फलंदाजीत हे गुण दिसतात. त्यातही रुटच्या फलंदाजीत जास्त कारण तो टी-20 लीग किंवा सामने अत्यंत नगण्य संख्येनेच खेळतो.
स्पोर्टी पीचेसची गरज
कसोटी क्रिकेट जगवायचे आहे का हा मुळात प्रश्न आहे. जर जगवायचे व वाचवायचे असेल तर फलंदाज व गोलंदाज या दोघांनाही समान संधी व लाभ मिळेल असे स्पोर्टी पीचेस तयार केले गेले पाहिजेत. पहिले दोन ते तीन दिवस फलंदाज व वेगवान गोलंदाजांना संधी असावी व नंतरचे दोन दिवस फिरकी गोलंदाजांना. कसोटीचा निकाल लागेल अशा खेळपट्ट्या बनवण्याच्या प्रयत्नात लाल मातीचे आखाडे तयार केले जाऊ नयेत. मुंबईतून लाल माती आणायची कर्णधार व प्रशिक्षक सांगेल तशी खेळपट्टी तयार करण्याचे उद्योग ताबडतोब थांबवले पाहिजेत. भारतात फिरकीला साथ मिळतेच त्यामुळे त्यासाठी आणखी काही करण्याची गरजच नसते. फिरकी गोलंदाजामध्ये गुणवत्ता असेल तर तो श्रीलंकेच्या मुथय्या मुरलीधरनप्रमाणे संगमरवरावरही चेंडू फिरवेल.
नागपूर, दिल्ली व इंदूरच्या खेळपट्ट्या पाहिल्या तर कसोटीची खेळपट्टी कशी नसावी हे सहज लक्षात येते. खेळपट्टीवरील गवत पूर्णपणे काढून त्यावर जड रोलरने रोलिंग करणे याबाबत आयसीसीने सगळ्याच देशांच्या क्रिकेट मंडळांना रोखले पाहिजे. पाच दिवसांचा सामना अगदी अपवादात्मक परिस्थितीत अडीच ते तीन दिवसांत संपला तर वेगळा भाग आहे पण संपूर्ण पाच दिवस अत्यंत दर्जेदार क्रिकेट पाहायला मिळावे हीच तर चाहत्यांची अपेक्षा असते. केवळ चौकार व षटकार फटकावणे म्हणजे क्रिकेट नव्हे किंवा गुणवत्ता नव्हे तर जेव्हा संघाला सामना वाचवण्याची गरज असते तेव्हा खेळपट्टीवर भक्कम तंत्रासह ठाण मांडून बसणे ही देखील कसोटी क्रिकेटमधील सर्वात महत्त्वाची कला आहे व ती नामशेष होऊ नये इतकीच अपेक्षा आहे.
अमित डोंगरे