कोणत्याही राष्ट्राचा, प्रदेशाचा पारंपरिक ठेवा ही त्या राष्ट्राची अस्मिता असते. ज्यात पुरातन साहित्य, वस्तू आणि वस्तू यांचा समावेश होत असतो. आपल्या महाराष्ट्राचा विचार करता जुन्या वास्तूंत जाज्ज्वल्य इतिहासाच्या पाऊलखुणा जपणारे गड-किल्ले तसे आपले खरे वैभव. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यकारभाराचे पवित्र स्थान म्हणजे गड.
सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर एकेकाळी दिमाखात उभे असणारे हे गडकिल्ले सध्या जणू अखेरच्या घटका मोजत आहेत. स्वैर बेधुंद व बेजबाबदार जनता आणि स्वार्थाने बरबटलेले राजकारण यांचा ते बळी ठरत आहेत. स्वराज्याच्या भविष्याचा विचार करीत दूरदृष्टीने बांधलेले/जिंकलेले किल्ले परकीयांचे आक्रमण रोखण्यासाठी होते. मात्र याच किल्ल्यांना आता स्वकीयांकडून धोका निर्माण झाला आहे. सध्याची गडकिल्ल्यांची विदारक स्थिती नक्कीच चिंताजनक आहे.
शासनाचा विचार करता या विषयाला आजपर्यंत म्हणावे तेवढे प्राधान्य देण्यात आलेले नाही. मोठमोठ्या कोटींच्या घोषणा, कागदावरचे पॅकेजेस आणि प्रसिद्धीचा हव्यास यातच हा विकास अडकून पडला आहे. तरी इतिहासप्रेमींच्या आक्रमक भूमिकेनंतर शिवनेरी व रायगडासारख्या महत्त्वाच्या किल्ल्यांची डागडुजी करण्यात आली आहे. यातही पर्यटनातून उत्पन्नाचे साधन निर्माण करण्यावरच अधिक भर दिसून येतो. अद्यापही तिथे मोठ्या प्रमाणात काम होणे गरजेचे आहे. तसेच या किल्ल्यांव्यतिरिक्त इतर किल्ल्यांचे काय, हे प्रश्नचिन्ह दिवसेंदिवस अधिकच गडद होत चालले आहे. या सरत्या दिवसांगणिक किल्ल्यांची प्रकृतीही तितकीच ढासळत चालली आहे. शासनाच्या प्रयत्नाबाबत विचार करता अनेक किल्ले लालफितीच्या कारभारात अडकलेले दिसतात. काही मोजकेच किल्ले शासनाच्या अखत्यारीत, काही पुरातत्त्व विभागाकडे, काही महसूल विभागाकडे तर काही खासगी मालकीचे आहेत. असे असताना काही स्वयंसेवी संघटना मात्र स्वयंस्फूर्तीने गड वाचविण्याचे प्रयत्न करीत आहेत याचेच विशेष कौतुक आहे.
कोसळलेल्या भिंती, ढासळलेले बुरूज, गवताने झाकोळलेल्या वाटा, काटेरी झुडुपांचा उच्छाद, तुकड्यात पडलेल्या तोफा, छत उडालेली मंदिरे, तलावातील अस्वच्छ पाणी आणि कचऱ्याचा ढीग अशी दुर्दशा झालेली आहे. याच का त्या वास्तू ज्या इतिहासाच्या साक्षीदार ठरल्या? पुढच्या पिढीने याच इतिहासाकडे पाहत मोठे व्हायचं का? महाराजांना हे असेच स्वराज्य अपेक्षित होते का?
खरंतर या गडकिल्ल्यांच्या भविष्याबाबत छत्रपती शिवरायांची तत्कालीन दूरदृष्टी संशोधन करण्यासारखी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञेनुसार मराठा साम्राज्यातील अष्टप्रधान मंडळातील अमात्य अर्थात अर्थमंत्री रामचंद्र पंत यांनी मोडी लिपीत “आज्ञापत्र’ नावाचा ग्रंथ लिहिला.
ज्यामध्ये भविष्यवेधी अशी शिवछत्रपतींची किल्ल्यांसंबंधीची दूरदृष्टी मांडली आहे. यात लिहिल्याप्रमाणे, संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग. दुर्ग नसता मोकळा देश परचक्र येताच निराश्रय, प्रजा भग्न होऊन देश उद्ध्वस्त होतो. देशच उद्ध्वस्त झाल्यावरी राज्य असे कोणास म्हणावे? ज्यापेक्षा राज्यसंरक्षण करणे आहे, त्यापेक्षा अधिकोत्तर साधनी स्वत: गडकिल्ल्यांची उपेक्षा न करिता, परम सावधपणे असतील त्या गडकिल्ल्यांची थोर मजबुती करावी. ज्यास राज्य पाहिजे त्यांनी गडकोट हेच राज्य, गडकोट म्हणजे राज्याचे मूळ, गडकोट म्हणजे खजिना, गडकोट म्हणजे सैन्याचे बल, गडकोट म्हणजे राज्यलक्ष्मी, गडकोट म्हणजे आपली वसतीस्थळे, गडकोट म्हणजे सुखनिद्रागार किंबहुना गडकोट म्हणजे आपले प्राणसंरक्षण असे पूर्ण चित्तात आणून कोणाचे भरवशावर न राहता त्यांचे संरक्षण करणे व नूतन बांधण्याचा हव्यास स्वत:च करावा. अशाप्रकारे गडकिल्ल्यांच्या भविष्याबाबत आग्रहाने लिहिलेले आहे.
गडकिल्ले अभेद्य व मजबूत राहण्यासाठी विशेष प्रयत्न होणे गरजेचे आहेत. शासनाने कागदावरच्या घोषणांना कृतीतून बळकटी द्यायला हवी. गड-किल्ले संवर्धन, दुरुस्तीबरोबरच राज्यातील किल्ल्यांबाबतचे स्वतंत्र गॅझेट काढणे गरजेचे आहे. नेतेमंडळींनी केवळ सण-उत्सवाला चमकोगिरीसाठी हजेरी न लावता गडाला वरचेवर भेटी देऊन कामाचा आढावा घ्यायला हवा. ऐतिहासिक वस्तूंसाठी सुसज्ज अशी संग्रहालये बांधली पाहिजेत. पुरातत्त्व खात्याशी समन्वय साधत देखरेख ठेवायला हवी. स्थानिक स्तरावरील शिवप्रेमींच्या समित्या स्थापून त्यांच्यावर देखरेखीची जबाबदारी सोपवायला हवी. गडकोटांवरील पर्यावरण संवर्धनासाठी विशेष प्रयत्नही व्हायला हवेत.
शासनाबरोबरच दुसरी बाजूही तितकीच निर्णायक ठरणारी आहे.
ती म्हणजे सर्वसामान्य जनता, शिवप्रेमी, पर्यटक आणि स्थानिकांनीदेखील पुढाकार घेण्याची. केवळ ट्रेक, भटकंतीच्या नावाखाली फोटोसेशन न करता इतिहास समजून तो घराघरात पोहोचविणे गरजेचे आहे. आजकाल मीडिया अधिक पावरफुल झाली आहे. त्यामुळे एक हॅशटॅग कधी चळवळ बनून परिवर्तनाची लाट आणेल हे समजणारही नाही. जबाबदारी, जागरूकता आणि पुढाकार ही त्रिसूत्री या चळवळीचे उत्तम अस्त्र ठरू शकते. गडावर भ्रमंतीसाठी गेले असताना हुल्लडबाजीला आला घालणे, आजूबाजूचा कचरा उचलणे व येताना गडाखाली आणून कचराकुंडीत टाकणे. तटबंदी व भिंतीवरील झाडेझुडपे उपटून टाकावे. महत्त्वाचे म्हणजे पावसाळ्यात जाताना विविध देशी झाडांचे बियाणे नेऊन चौफेर पसरावेत. जेणेकरून फुटलेला एक अंकुर हिरवळीला निमित्त ठरू शकतो.
सागर ननावरे