आपल्या मराठी मातीच्या संस्कृतीचा सुगंध आगळाच आहे. सणावारांमध्ये उठून दिसणारी अशीच एक सुंदर परंपरा म्हणजे स्त्रियांनी घेतलेले उखाणे! हे उखाणे पती-पत्नीच्या नात्यांचे अनेक नाजूक पदर तसेच हळूवारपणे उलगडतात.
पूर्वीच्या काळी स्त्रिया त्यांच्या पतीचं नाव घेत नसत. समस्त पती जात जसं कौतुकानं आपल्या पत्नीचं नाव घेते तसं नवऱ्याचं नाव घेणं हा तर स्त्रियांचा हक्कच! तेच नाव नवऱ्याच्या वयाचा मान ठेवून त्याचं नाव उखाण्यात गुंफून घेतलं की दोन्ही हेतू साध्य होतात. म्हणून असेल कदाचित ही उखाण्यांची परंपरा! चैत्रातलं डाळपन्ह्याचं हळदीकुंकू असो किंवा रथसप्तमीतलं तिळगुळाचं हळदीकुंकू! येणाऱ्या सुवासिनी उखाणे गुणगुणतच येतात.
हळदीकुकवाचं घर येणाऱ्या सुवासिनींच्या उखाण्यांनी आणि त्यानंतरच्या चेष्टा मस्करींनं दणाणून जातं. घरात भरून उरलेली ती सकारात्मकता पुढच्या वर्षीच्या हळदीकुंकवापर्यंत पुरते. कुठलंही शुभकार्य असो पूजेचा शुभारंभ करणारी स्त्री उखाणा घेते. तिनं हौसेनं उखाणा घेतला तर ठीकच नाहीतर इतर माऊल्या तिला त्यांच्या लाडीक हट्टाला बळी पाडतात. कुणी तिच्या कानाला लागून तिला उखाणा सुचवू पाहते. साऱ्यांचा हौशी हट्ट तिला मोडवत नाही. हो-ना करता करता ती एखाद्या झक्कपैकी उखाण्यात आपल्या नवऱ्याचं नाव गुंफून टाकते. मग एकापाठोपाठ एक साऱ्याचजणी आपली प्रतिभाशक्ती वापरू लागतात. कधी गोड-नाजूक तर कधी थरथरत्या-किनऱ्या आवाजात उखाण्यांचे थरावर थर पडू लागतात.
गावाकडच्या शंकरकाकांची बायको इतकी लाजरी, की बिचारी शंकरपाळ्यांनाही कधी शंकरपाळ्या म्हणाली नाही. म्हणून उखाण्यात नाव घ्यायचा पहिला मान नेहमी तिचाच! मोहनबापूंच्या बायकोनं करंजीचं पीठ भिजवताना मोहन घातलं असलं तरी इतरांना मात्र ती मोहन घातलं असं न सांगता “तेल उकळून घातलं’ असंच सांगायची. तिनं उखाण्यात “मोहनराव’ असं म्हणावं म्हणून बाकीच्या माऊल्यांचा काय तो कल्ला! अर्थात त्यातही मजा आहे.
जुनीजाणती-आयुष्यभरात कित्येक पावसाळे झेलून म्हातारपण आलेली बाई नवऱ्यानं आयुष्यभर दिलेली साथ आठवून सद्गतीत होत उखाणा घेते. संसारात लोणच्यासारखी मुरलेली मध्यमवयीन बाई आत्मविश्वासाने आणि न लाजता उखाणा घेते. नवऱ्याचं नाव तिच्या मुखात सवयीचं होऊन गेलेलं असतं. नवं नवं लग्न झालेली तरूण पत्नी लज्जेनं आरक्त होत हळूवारपणे उखाणा घेते. नवऱ्याचं नाव उखाण्यात गुंफताना तिला होणाऱ्या गुदगुल्या सगळ्यांनाच जाणवत असतात. उखाणा घेण्याच्या पद्धती आणि बाज वेगळा असला तरी उखाणा गोडच असतो हे मात्र नक्की!
कांडून-कुटून केला गोळा, पंचमीनं उघडला डोळा
गौरीचे निवडले गहू-डाळ, पुढं आला दसरा महाळ
दसऱ्याचं घेतलं सोनं, दिवाळीचं होईल राहणं,
दिवाळीची केली आरती, पुढं संक्रांत आली नेनती
संक्रातीचं पुजलं सुगड, शिवरात्र आली उघड
शिवरात्रीचा पुजला पाट, शिमगा आला गजघाट
पाडव्याची उभारली गुढी, आख्खितीनं टाकली उडी
आख्खितीचं पुजलं करं, बेंदूर आला म्होरं,
बेंदराचे पुजले बैल, आखाडपारणं होईल
बारा सणांची हौस करायला माहेरी येईन
आणि …रावांबरोबर सासरी सुखानं राहीन
हा मराठी वर्षातल्या बारा महत्त्वाच्या सणांचं वर्णन करणारा उखाणा! असे एक ना अनेक! आपल्या संस्कृतीचं अस्खलित वर्णन करणारे ते उखाणे जणू संस्कृतीचे चकचकीत आरसेच आहेत.
शिवरायांनी राज्य केले शक्तीपेक्षा युक्तीने
मावळ्यांनी जीवन अर्पिले राजांवरच्या भक्तीने
मुघलांचेही डोळे दिपले स्वराज्याच्या व्याप्तीने
…रावांचे नाव घेते संसारातल्या तृप्तीने
अशा अनेक उखाण्यांतून आपला जाज्ज्वल्य इतिहास अभिमानाने उभा ठाकतो. आमच्या गावी एका बड्या घरात कुठलासा एक लग्नसोहळा दणक्यात पार पडला. लग्नमंडपाबाहेर दोनेक हजार माणसांनी हात धुतले. जेवणानंतर खास पानसुपारीचा कार्यक्रम ठेवला होता आणि या पानसुपारीच्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य काय होतं ठाऊक आहे… पानसुपारीला उपस्थित बायाबापड्या साऱ्यांनीच उखाणे घ्यायचे. तिथंच मग उखाण्यांचीही जुगलबंदी असते हे नव्यानं समजलं.
कुणी म्हणे “ताट-वाट्या सिल्व्हर पेले, …राव माझे बुलेट वाले!’ तेही चाल लावून ठसक्यात! मग तिच्यावर कडी म्हणून पुढची म्हणे… “तुमची बुलेट झाली आता जुनी! होंडा सिटीतून फिरत्यात …राव माझे धनी!’
त्यातली कुणी दिवसभर स्वयंपाकघरात राबणारी, कुणी ऑफिसात मान मोडून काम करणारी, कोणी उन्हातान्हात चिखलमातीत रापून जाणारी पण उखाणा घेताना प्रत्येक स्त्री सारखीच. तिथं प्रत्येकीच्या प्रतिभाशक्तीला धुमारे फुटतात. तसंही उखाण्याला व्याकरणाचं शुद्ध-अशुद्धतेचं बंधन नसतं, बरं का! त्यात सातासमुद्रापलीकडून येऊन मराठीत डुबकी मारणारे आणि पुन्हा मराठीतच डुंबण्याचा हव्यास धरणारे इंग्रजी शब्दही घुसू लागलेत. पण येऊद्यात त्यांना… तेही शोभतात! जसं की, “इंग्रजीमध्ये चंद्राला म्हणतात मून, …रावांचं नाव घेते …घराण्याची सून!’
पुरुषांनाही उखाण्याचं वावडं नाही. पण तरीही बरेचसे नवरे “भाजीत भाजी मेथीची …’ या एकाच उखाण्यावर स्वतःचा अवघा लग्नसोहळा उरकून घेतात. हरकत नाही. सणावाराच्या स्वयंपाकात मेथीच्या भाजीला स्थान नसलं तरी हीच मेथीची भाजी लग्नाकार्यात नवरेमंडळींना सावरून घेते.
हल्ली तर उखाण्यांच्या स्पर्धाही होतात. तिथेही पिढ्यान्पिढ्या चालत आलेले, लांबलचक उखाणे ऐकायला मिळतात. ते प्रतिभासंपन्न, अर्थपूर्ण उखाणे ऐकून आपलाच इतिहास उखाण्यांच्या रूपाने पाऊलखुणा मागे ठेवून गेला असावा, असा सार्थ विश्वास वाटू लागतो. म्हणूनच उखाण्यांच्या स्पर्धा हा संस्कृती संवर्धनाचाच एक प्रगल्भ उपक्रम आहे.
घास भरवताना, मुंडावळ्या बांधताना, शेल्याची गाठ मारताना, कंकण सोडताना, पूजेला बसताना प्रसंगानुरूप यमक जुळवलं जातं. नावं गुंफली जातात, उखाणे घेतले जातात आणि प्रसंग अविस्मरणीय केला जातो. “चांदीच्या सुपात केशरी गहू, लग्नच नाही झालं …नावं कोणाचं घेऊ?’ म्हणत अविवाहित मंडळीही हौशा-गौशा-नवशांसोबत उखाण्यांच्या गंगेत आपलेही हात धुऊन घेतात.
– प्रज्ञा जोशी-कुलकर्णी