मुंबई : राज्यामध्ये लॉकडाऊनच्या काळात काही गुन्हेगार व समाजकंटक गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र सायबर विभागाने कठोर पाऊले उचलली असून राज्यात ३४१ गुन्हे दाखल केले आहेत, अशी माहिती महाराष्ट्र सायबर विभागाने दिली.
तसेच सध्या लॉकडाऊनच्या काळात कोणत्या भागात काय सुरु राहणार यावर बरेच मेसेज सोशल मीडियावर (व्हाट्सॲप, फेसबूक इत्यादी) फिरत आहेत तसेच कुठला जिल्हा कुठल्या झोन मध्ये येतो आहे. ते दर्शविणारे आलेख व चार्टस पण त्या मेसेजेसद्वारे पाठविले जात आहेत.
महाराष्ट्र सायबर सर्व नागरिकांना विनंती करते की, तुम्हाला असे काही मेसेजेस किंवा फोटोज किंवा पोस्ट कोणी पाठविल्या तर कृपया त्या लगेच फॉरवर्ड करू नयेत. आधी सदर मेसेजेसची सत्यता पडताळून बघा, मगच फॉरवर्ड करा. या कोरोना महामारीच्या काळात चुकीची माहिती व अफवा पसरविणे कायद्याने गुन्हा आहे. त्यामुळे असे मेसेज कोणाला पाठवू नये.
सर्व नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, केंद्र व राज्य सरकार वेळोवेळी जे नियम व आदेश प्रसिद्ध करतील त्याचे पालन करा व गरज नसल्यास कृपया घराच्या बाहेर पडू नका.