कापूरहोळ – भोर, वेल्हा तालुक्यातील सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सर्वत्र पूर स्थिती निर्माण झाली आहे. पुणे-सातारा महामार्गवरील नीरा नदीवरील सारोळा (ता. भोर) येथील पुलावर पाणी आल्याने महामार्गावरील वाहतूक बंद केल्याची अफवा पसरल्याने वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरत आहे. मात्र, ही अफवा असून नीरा नदीवरील पुलावर पाणी आलेले नाही. त्यामुळे नागरिकांनी अफवांना बळी पडू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
पुणे-सातारा महामार्गावरील वाहतूक सुरळीतपणे सुरू आहे. या महामार्गावर उभारण्यात येत असलेल्या उड्डाणपुलामुळे साईडपट्टीवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. परिणामी, वाहतूक संथ गतीने सुरू आहे. सारोळा, नसरापूर, वर्वे येथे जागोजागी वाहतूक कोंडी होत आहे. मात्र, महामार्ग पूर परिस्थितीमुळे बंद असल्याच्या अफवा पसरविल्या जात असल्यामुळे संभ्रमाचे वातावरण तयार झाले आहे.
निरादेवघर, भाटघर, गुंजवणी या तिन्ही धरणातून विसर्ग होत असून वीर धरणातून 1 लाख 80 हजार प्रति सेंकद क्युसेसने पाण्याचा विसर्ग होत आहे. त्यामुळे नदीकाठच्या अनेक गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. वीर धरणाच्या उंची लक्षात घेऊन महामार्गावरील सारोळा येथील नीरा नदीवर जुन्या पुलाची बांधणी केली होती. तो पूल सध्या वापरात नाही. महामार्गावरील सध्या सुरू असलेल्या नवीन पुलाची उंचीही जुन्या पुलापेक्षा दोन फूट जास्त आहे. त्यामुळे पुलावरून पाणी जात नाही.
सध्या कोल्हापूर व कर्नाटक येथे महामार्गावरील पुलावर पाणी आले आहे. धांगवडी येथे अवजड वाहनांना पंधरा-वीस मिनिटे थांबण्यात येत आहे. काही वेळानंतर महामार्ग पोलीस गाड्या सोडत आहेत. त्यामुळे धांगवडी-कापूरहोळ मार्गावर दोन्हीही बाजूंनी तीन किमीपर्यंत वाहनांची रांग लागली आहे. वाहतूक कोंडी झाल्याने अनेकांना सारोळा येथील महामार्गवरील पाणी आल्याची अफवा पसरली आहे. मात्र, यावर विश्वास न ठेवण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.