मुंबई – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत महाराष्ट्रातील महायुतीच्या जागावाटपाचा तिढा गत आठवड्यातच जवळपास निकाली निघाला होता. पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या काही बड्या नेत्यांनी ऐनवेळी हस्तक्षेप केल्यामुळे हे जागावाटप रखडल्याची माहिती आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच नावाने निवडून येणार असतील तर मग त्यांना विनाकारण जास्त जागा का द्यायच्या? असा सवाल त्यांनी या प्रकरणी उपस्थित केल्याचा दावा सूत्रांनी केला आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा गत आठवड्यात महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत महायुतीच्या जागावाटपावर चर्चा केली.
त्यात महायुतीतील सर्वच घटकपक्षांचे विद्यमान खासदार, मतदार संघातील प्रत्येक पक्षाची ताकद व तिन्ही पक्षांनी केलेल्या सर्व्हेक्षणाच्या आधारावर जागावाटप जवळपास निश्चित करण्यात आले होते. विशेषतः महायुतीत वाद असणाऱ्या जागांवर शहा यांच्या उपस्थितीत मुंबईत झालेल्या बैठकीत तोडगाही निघाला होता.
भाजपच्या दिल्लीतील नेत्यांच्या परवानगीने हे जागावाटप जाहीरही होणार होते. पण ऐनवेळी संघाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी या जागावाटपावर आक्षेप घेतला. यामु्ळे जवळपास निश्चित झालेले जागावाटप वादाच्या भोवऱ्यात सापडले, असा दावा सूत्रांनी केला आहे.
सद्यस्थितीत देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पसंती आहे. शिंदे यांच्या विद्यमान खासदारांपैकी काही खासदारांना पुन्हा उमेदवारी दिल्यास त्यांना निवडून आणण्यात भाजपला प्रचंड त्रास सहन करावा लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जागा धोक्यात टाकण्याऐवजी तिथे भाजपच्या उमेदवारांना संधी द्यावी.
असे केल्यास या जागा सहजपणे निवडून आणता येणे शक्य आहे. यामुळे मोदींसोबत सर्वाधिक खासदार संसदेत पोहोचवण्यास मदत होईल, असा मुद्दा संघाने या प्रकरणी उपस्थित केला आहे. यामुळेच महाराष्ट्रातील सत्ताधारी महायुतीचे जागावाटप रखडले आहे, असे सूत्रांनी सांगितले आहे.
शिंदे – अजित पवार गटात नाराजी
दुसरीकडे, महायुतीच्या जागावाटपाचा तिढा अद्याप न सुटल्यामुळे शिवसेनेच्या शिंदे व राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात नाराजी पसरली आहे. त्यातच जागावाटपात एकेरी आकड्याच्या जागा मिळण्याची चिन्हे असल्यामुळे या पक्षांचे नेतृत्व निराश झाल्याचीही माहिती आहे.
महायुतीच्या जागावाटपात किरकोळ जागा मिळाल्या तर पक्ष संघटनेत नाराजी पसरून अनेक नेते घरवापसी करतील, अशी भीती या नेत्यांना वाटत आहे, असे सूत्रांनी सांगितले आहे.